অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रंगपंचमी

रंगपंचमी

फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदोत्सव साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला ‘रंगपंचमी’ हे नाव प्राप्त झाले आहे. या प्रसंगी विविध रंगांची चूर्णे पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडविले जाते. रंग उडविण्याचा उत्सव महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जात असला, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाच्या निर्मितीमागचे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहे. परंतु वसंत ऋतू, मदन, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यातुविधी इत्यादींशी हा उत्सव निगडित असावा. धर्मसिंधु या ग्रंथाच्या मते फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतारंभाचा उत्सव सुरू होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंदसोहळा साजरा केला जातो. ‘हा उत्सव सध्या प्राकृत लोक वद्य पंचमीपर्यंत साजरा करतात’, अशी माहितीही या ग्रंथाने दिली आहे. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे, असे दिसते. पुराणकथेनुसार शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाळले होते. त्यानंतर त्याने अनंगरूपाने त्याला पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे, हा देखील या उत्सवामागचा हेतू असण्याची शक्यता आहे. पौर्णिमान्त मास मानण्याच्या पद्धतीमध्ये ⇨होळी पौर्णिमा ही वर्षाची अखेरची तिथी ठरल्यामुळे होळीनंतर नव्या वर्षाला प्रारंभ होतो व त्यानुसार रंगपंचमी हा नववर्षाच्या स्वागताचा उत्सवही असण्याची शक्यता आहे. जीर्ण झालेली सृष्टी होळीमध्ये जळून नष्ट झाली असून आता नव्या सृष्टीचा उदय झाला आहे, असेही या आनंदोत्सवातून सूचित केले जात असावे. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी सासुरवाडीकडून जावयाचे जे बारा सण साजरे होतात, त्यांमध्ये रंगपंचमीचा अंतर्भाव आहे. त्या दिवशी नववधूला केशरी रंग उडविलेली नवी साडी सासरकडून मिळते. मराठ्यांच्या कारकीर्दीत सरदार वगैरे प्रतिष्ठित लोक रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करीत असत, असे शाहीर वगैरेंच्या वर्णनावरून दिसते. रंगपंचमीनिमित्त भरलेल्या दरबारात छोट्या जिजाईने पाच वर्षे वयाच्या शहाजी भोसले यांच्या अंगावर गुलाल उधळल्यामुळे त्यांचे पति-पत्नीचे नाते सूचित होऊन पुढे त्यांचा विवाह झाला, अशी वर्णने शाहिरांनी केली आहेत. काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी ‘बगाड’ घेण्याची पद्धत आहे.

 

साळुंखे, आ. ह.

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 2/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate