आखाडा म्हणजे साधूंची निवासाची आणि भोजनाची सोय. या आखाड्यांमध्ये महंत व साधूंचे म्हणून काही अधिकार असतात. याबाबत माहिती करून घेतल्याशिवाय आखाड्यांबाबत जाणून घेण्यात काहीच अर्थ नाही. मुळात प्रश्न हा निर्माण होतो की आखाड्यांची निर्मिती कशासाठी झाली. यवनांचे वाढते धार्मिक आक्रमण रोखण्यासठी जगद्गुरू श्री शंकराचार्यांनी सर्व आखाड्यांचे एकत्रीकरण केले. आखाडे म्हणजे अखंड भावनेतून सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी संस्था. शंकराचाऱ्यांनी चार टोकांना चार धर्मपीठाची स्थापन करून हिंदुधर्मात नवचैतन पेरले. प्रत्येक आखाड्याकडे वेगवेगळी जबाबदारी देण्यात आलेले असते. जसे दिंगबर आखाड्याकडे शस्त्रधारी साधू असतात. दिंगबर आखाड्यातील साधू हिंदूधर्माच्या संरक्षणासाठी युद्धात उरतले. तर अनेक इतर आखाड्यांकडे धर्मप्रसार, शिक्षण व प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली.
नाशिकमधील आखाडे हे वैष्णवपंथीय आहेत. राम आणि श्रीकृष्णाची उपासना करणारे आखाडे म्हणजे वैष्णपपंथीय आखाडे. पंचवटी व तपोवन परिसरात तीन वैष्णवपंथीय साधूंचे आखाडे आहेत. यात दिंगबर आखाडा, निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाडा यांचा समावेश होतो. यातील दिंगबर आखाड्यांची बैठक नाशिकमध्ये आहे. तर निर्वाणी व निर्मोही या आखाड्याची बैठक काशी व हरिद्वार येथे आहे. नाशिक सिंहस्थात स्नानासाठी येणाऱ्या दिंगबर, निर्वाणी, निर्माही या तीन आखाड्यांचे (अनी) १८ उपआखाडे आहेत. दिंगबरचे दोन आखाडे, निर्वाणीचे ९ आखाडे, निर्माहीचे ७ आखाडे आहेत. निर्वाणी आखाड्याची एक अनी म्हणजे एक उपआखाडा नाशिकमध्ये आहे. त्याला खाकी आखाडा म्हटले जाते. तर हे सर्व आखाडे चार संप्रदायाचे आहेत. वैष्णवपंथीय साधूंचेही चार संप्रदाय असतात. रामानंदी, नि:मार्ग, विष्णुस्वामी, गौदिया असे चार संप्रदाय आहेत. याला रामानंद, नि:मार्ग, बल्वाचार, माध्यगोदेश्वर असेही म्हटले जाते. रामानंदी, नि:मार्ग, विष्णुस्वामी हे तीन संप्रदाय हे कृष्णाचे, तर चौथा गौदिया रामाचा उपासक आहे. कपाळाला साधू जो गंधलेपन करतात त्याच्या प्रकारावरूनही साधू व आखाडे ओळखले जातात. तसेच भस्म लावण्याच्या पद्धतीवरूनही आखाड्याची आणि संप्रदायाची ओळख निर्माण झालेली आहे. तर यांचे ६५० खालसा स्नानासाठी सिंहस्थात गोदातिरी येतात. यात दिंगबर आखाड्याचे ३५० खालसे आहेत. निर्वाणीचे ७५ तर निर्मोहीचे १७५ खालसे आहेत. प्रत्येक खालशामध्ये किमान शंभर साधू ते दोन हजार साधू असतात.
सिंहस्थात गावोगावहून येणारे साधू याच आखाड्यात उतरतात. केवळ सिंहस्थातच नव्हे तर इतरवेळेसही देशभरातून येणारा त्या-त्या आखाड्यांचा साधू इथल्या संप्रदाय आखाड्यात राहू शकतो. त्याला सर्व सोयी सुविधा पुरविणे, आवश्यक ती सामुग्री उपलब्ध करून देणे ही येथील स्थानधारी म्हणजे स्थानिक महंतांची जबाबदारी असते. अनेक वाद सोडविणे, निर्णय घेणे व सोयीसुविधांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या आखाड्यांचे आचार्य, महंत व उपासक करतात हेच या आखाड्यांचे वैशिष्ट्य आहे.
लेखक : रमेश पडवळ
इमेल : rameshpadwal@gmail.com
संपर्क : 8380098107
अंतिम सुधारित : 7/28/2023
सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नानाला महत्त्व आहे. जगभर...
`समुद्रमंथन’ ही कथा नाशिकच्या कुंभमेळ्याशी अधिक जव...
सिंहस्थ हा महाकुंभ असल्याने यात नेहमी काही ना काही...
वैष्णवपंथीयांचा सर्वांत मोठा आखाडा म्हणून दिगंबर आ...