অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विलग्नीकरण

विलग्नीकरण : ज्या प्रक्रियेद्वारा व्यक्ती आणि समूह काही लक्षणांच्या संदर्भातील साम्य आणि भेद यांच्या आधारावर आपले वेगळे अस्तित्व प्रस्थापित करतात, त्या प्रक्रियेस ‘विलग्नीकरण’ असे म्हणतात. विलग्नीकरण ही व्यक्तिव्यक्तींत तसेच गटागटांत असणारे सामाजिक अंतर हे समाजमान्य पद्धतीने भौतिक अंतराद्वारा दर्शविणारी प्रक्रिया आहे. याचे उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णियांसाठी असलेली वेगळी वसतिस्थाने, चर्च, शाळा ह्या होत. या प्रक्रियेचा प्रमुख उद्देश हा भिन्न म्हणून मानल्या गेलेल्या व्यक्तींचा संपर्क वर्ज्य करणे हा असतो.

विलग्नीकरणाचे निकष आणि प्रकार

विलग्नी करणाची प्रक्रिया तीन प्रकारच्या निकषांवर व त्यांच्या मिश्रणावर अवलंबून असते. जैविक (शारीरिक), सांस्कृतिक आणि सामाजिक हे ते निकष होत जैविक निकष हे वंशभेद आणि लिंगभेद यांवर आधारित असतात. वंशाच्या जैविक संकल्पनेत त्वचेचा रंग, चेहरा, नाक, केसाचे स्वरूप, उंची इ. लक्षणांचा विचार केला जातो. या लक्षणांच्या आधारे निग्रो, रेड इंडियन, चिनी, यूरोपीय इ. लोकसमूहांना अलग अलग वांशिक गट म्हणून ओळखण्यात येते. असे वांशिक गट अमेरिकेतील महानगरांमध्ये अलग अलग वसाहतींत राहताना दिसतात. हे जैविक निकषावर आदारित विलग्नीगकरणाचे उदाहरण होय. समान भाषा बोलणारे, समान धर्म आचरणारे लोक अन्य भाषिक आणि अन्य धर्मीय लोकांपासून आपले अलग अस्तित्व वेगळी प्रार्थनास्थळे, वेगळी सभागृहे, वेगळ्या वसाहती, वेगळ्या शाळा इ. घटकांद्वारे जोपासतात. हे सांस्कृतिक निकषावर आधारलेले विलग्नीकरण होय. समव्यवसायी, तसेच समान सामाजिक दर्जा असणाऱ्या लोकांमध्येही आपापला अलग गट करून राहण्याची प्रवृत्ती दिसते. ही प्रवृत्ती सामाजिक निकषावर आधारलेल्या विलग्नीकरणाची सूचक आहे, तसेच या तीन मूलभूत निकषांच्या मिश्रणाने तयार झालेल्या संमिश्र निकषाच्या आदारेही समाजात विलग्नीकरण होत असते.

विलग्नीकरण कशा प्रकारे घडून येते ह्याच्या आधारावर विलग्नीकरणाचे निरनिराळे प्रकार होतात. विलग्नीकरण उत्स्फूर्त असू शकते, किंवा ते पूर्वनियोजित जाणीवपूर्वक घडवून आणलेले असते. भारतीय नगरांमध्ये निरनिराळ्या जातींचे मोहोल्ले उत्स्फूर्तपणे तयार झालेले दिसतात. याउलट दक्षिण आफ्रिकेतील नगरांमध्ये नगराचा मध्यवर्ती भाग हा गौरवर्णियांकरिता राखून ठेवलेला असतो, नगराच्या सीमेजवळील अथवा त्या पलीकडील भाग कृष्णवर्णियांकरिता ठेवलेला असतो. विलग्नीकरण स्वच्छेने घडून येते, किंवा ते सक्तीने केले जाते. मध्यमवर्गीय, कनिष्ठवर्गीय यांच्या अलग वसाहती स्वेच्छेने घडून येतात. याउलट दक्षिण आफ्रिकेतील नगरातल्या निरनिराळ्या वांशिक गटांच्या अलग वसाहती शासनाच्या सक्तीने तयार होतात. विलग्नीकरण आधुनिक औद्योगिक महानगरांत जसे दिसून येते, तसेच ते औद्योगिकपूर्व यूरोप, आशिया, मध्यपूर्वेकडील आणि इस्लामी राज्यकर्त्यांनी स्थापिलेल्या नगरांमध्येही दिसून येते. विलग्नीकरण हे जसे प्रगत समाजात, तसेच अप्रगत आदिवासी समाजातही दिसते. विलग्नीकरण हे जसे मर्यादित स्वरूपाचे असू शकते, तसेच ते सर्वकष स्वरूपही धारण करू शकते. दक्षिण आफ्रिकेतील वर्णविद्वेषावर आधारलेली वांशिक पृथक्‌वासनाची प्रथा (अपार्थाइट) तसेच पारंपारिक भारतीय समाजव्यवस्थेतील ग्रामीण भागांत दलितांना गावकुसाबाहेर राहण्याची सक्ती करणारी अस्पृश्यतेची प्रथा ही सर्वकष विलग्नीकरणाची उदाहरणे होत.

विलग्नीवकरण ही अंशात्मक स्वरूपात प्रत्येक समाजात अस्तित्वात असणारी प्रक्रिया आहे. विलग्नीकरणाची तीव्रता अथवा मात्रा कमी असल्यास ते निरूपद्रवी प्रकाराचे असते व त्यातून फक्त सामाजिक अंतर अथवा वेगळेपणा दर्शविले जाते. अशा प्रकारचे आंशिक वा निरूपद्रवी विलग्नीकरण व सामाजिक एकात्मता यांत फारसा परस्परविरोध संभवत नाही. परंतु विलग्नीकरण अत्याधिक मात्रेचे वा तीव्रतेचे असल्यास-म्हणजेच सर्वंकष असल्यास-त्याद्वारे एखाद्या विशिष्ट गटाचे अन्य समाजापासूनचे केवळ सामाजिक अंतरच प्रकट होते असे नसून, त्याबरोबरच त्या विशिष्ट गटाबद्दल इतर समाजाला वाटणारे पूर्वग्रह, द्वेषभावना, शोषणाधारित हितसंबंध व ते जपण्यासाठी केलेला दमननीतीचा वापर इ. सामाजिक ऐक्याला बाधा आणणाऱ्या प्रवृत्तीही प्रकट होतात. असे विलग्नीकरण समाजातील प्रबळ वर्गाने दुर्बळ घटकावर लादलेले असते व त्यामुळे प्रबळ वर्गाचे हितसंबंध जोपासले जातात. या प्रक्रियेत प्रकटपणे प्रबळ गटाकडून दुर्बळ गटावर जसा बळाचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे अशा विषमतेचे समर्थन करणारी नैतिक वा धार्मिक श्रद्धाप्रणालीही निर्माण केली जाते व त्यामुळे दुर्बळ गटातील लोकांच्या मानसिकतेवर ताबा मिळविला जाऊन, अशा सामाजिक व्यवस्थेत असणाऱ्या त्यांच्या विरोधावरही मानसिक नियंत्रण ठेवले जाते. मानवेतिहासात अशा सर्वंकष, पराकोटीच्या विलग्नीकरणाच्या ज्या व्यवस्था निर्माण झाल्या; त्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील वर्णविद्वेषावर आधारलेली विलग्नीकरण प्रथा, त्याचप्रमाणे अमेरिकेतील वांशिक विलग्नीकरण, भारतातील जातिसंस्थेत अनुस्यूत असलेली विलग्नीकरण प्रथा, धार्मिक ऱ्हासामुळे देशोधडीस लागलेल्या ज्यू धर्मीयांच्या वाट्यास आलेली विलग्नता आदींचा उल्लेख करता येईल. या विलग्नीकरण व्यवस्थांच्या वैशिष्ट्यांचा थोडक्यात मागोवा घेणे उचित ठरेल

वांशिक भेदभाव व विलग्नीकरण

शासनाने प्रचारात आणलेली वांशिक पृथक्‌वासनाची वा ‘वर्णविद्वेषा’ची प्रथा ‘अपार्थाइट’ (अलगता) म्हणून ओळखली जाते. द. आफ्रिकेतील सत्ताधारी गोऱ्या लोकांनी कृष्णवर्णियांवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. १९४८ मध्ये ‘अपार्थाइट’ हे देशाचे अधिकृत धोरण म्हणून मलान या पंतप्रधानाने ठरवले. या धोरणानुसार वांशिक भेदभावाला अधिकृतता प्राप्त होऊन कृष्णवर्णियांवर कायद्यानेच अन्यायकारक बंधने लादली गेली. त्यांतून काळा-गोरा हा वर्णभेद विकोपाला गेला. कृष्णवर्णियांसाठी वेगळी वसतिस्थाने निर्माण केली गेली. तसेच त्यांना आपल्याबरोबर ओळखपत्र ठेवण्याची सक्ती केली गेली. सार्वजनिक सुविधांचेदेखील विलग्नीकरण होऊन कृष्णवर्णियांना सर्व सुविधा नाकारण्यात आल्या. भिन्न वंशियांमध्ये कमीत कमी सामाजिक संबंध यावेत, अशा प्रकारची ही योजना होती. शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रांतदेखील अनेक निर्बंध घातल्यामुळे कृष्णवर्णियांना अत्यंत अन्यायकारक दडपणशाहीला तोंड द्यावे लागले. या धोरणाविरूद्ध जगातील इतर देशांनी आपला निषेध नोंदविला. दक्षिण आफ्रिकेला १९६१ मध्ये राष्ट्रकुलामधून काडून टाकण्यात आले व संयुक्त राष्ट्रांनी अपार्थाइटला कडवा विरोध केला. १९७६ नंतर गोऱ्यांविरूद्ध अनेक प्रकारच्या निषेध चळवळी सुरू झाल्या. १९९० नंतर राज्यकर्त्यांनी आपली धोरणे बदलून २६ दशलक्ष पीडित कृष्णवर्णियांवरील निर्बध कमी करायला सुरूवात केली व त्यांच्या नागरी हक्कांबाबतच्या मागण्या रास्त ठरविल्या. १९९० मध्येच ‘आफ्रिकन नॅशनल काँग्रेस’ या कृष्णवर्णियांच्या पक्षावरील बंदी उठवून त्यास कायदेशीर मान्यता देण्यात आली व सत्तावीस वर्षे तुरूंगात डांबलेल्या नेल्सन मंडेला  या नेत्याची सुटका करण्यात आली. १९९४ पासून नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत व अपार्थइटचे काळे पर्व आता संपुष्टात आले आहे.

अमेरिकेतील वांशिक विलग्नीकरण

अमेरिकेतील वांशिक भेदभावाचा इतिहास पाहता तेथील कृष्णवर्णियांची समस्या १८६० नंतर जवळजवळ शंभर वर्षे उग्र स्वरूपात होती. दक्षिणेत दास्य (गुलामगिरी) प्रथा तळागाळापासून जोपासण्यात आली होती. दास बाळगणे ही श्रीमंतीची व प्रतिष्ठेची बाब समजली जात असे. गुलामांसाठी स्वतंत्र कायदे होते व ते अत्यंत जाचक होते. गुलामांनी चर्चशिवाय इतरत्र मित्रांना भेटायचे नाही, अंधारात बाहेर जावयाचे नाही, अशा प्रकारचे कडक निर्बंध होते. त्यांना शस्त्रास्त्रे बाळगण्याची मनाई होती. गुलामांची राजरोस विक्री चालत असे व पशवी पद्धतीने त्यांना राबवून घेऊन त्यांचे विलग्नीकरण करण्यात येत असे. गुलामगिरीच्या अमानुष प्रथेविरूद्ध धार्मिक व नैतिक प्रबोधन सुरू झाले व या कारणांमुळे प्रथम अठराव्या शतकात लोकमत जागृत होऊ लागले. विशेषतः या शतकाच्या उत्तरार्धात गुलामगिरीविरूद्धच्या चळवळी, भाषणे, साहित्य इत्यादींमुळे त्यास जोराची चालना मिळाली. अंकल टॉम्स कॅबिन ही या पार्श्वभूमीवरची हॅरिएट बीच स्टो या लेखिकेची कादंबरी अत्यंत प्रभावी ठरली. १८६१-६५ यांदरम्यान अमेरिकेमध्ये भीषण यादवी युद्ध झाले. १८६३ मध्ये अब्राहम लिंकन यांनी गुलामांच्या मुक्ततेचा जाहीरनामा प्रसिद्ध करून सु. ४० लक्ष निग्रो गुलामांची मुक्तता केली.

१८६५ नंतर घटनेद्वारा गुलामगिरीच्या अमानुष प्रथेला कायद्याने मूठमाती देण्यात आली. तथापि कायद्यातील या बदलांमुळे वास्तव परिस्थिती फारशी बदलली नाही. श्वेतवर्णियांमध्ये वंशश्रेष्ठत्वाची भावना बळावत गेली व पुढील जवळजवळ पन्नास वर्षे निग्रोंना कनिष्ठ दर्जा दिला गेला. निग्रोंना अलग ठेवण्याकरिता ‘अलग पण समान’ हे अन्यायकारक धोरण राबवण्यात येत होते. मात्र १९५४ नंतर ते रद्द करण्यात आले व वांशिक दृष्ट्या एकात्म शिक्षणपद्धतीचा व समान नागरी हक्कांचा पुरस्कार अमेरिकेतील न्यायसंस्थांनी याच काळात केला. मार्टिन ल्यूथर किंग (१९२९-६८) या निग्रो धर्मोपदेशक नेत्याने वर्णविरोधी चळवळीची सूत्रे हाती घेतली. महात्मा गांधींच्या विचारसरणीने प्रेरित होऊन, किंग यांनी ‘काँग्रेस फॉर रेशल इक्वॉलिटी’ ही संघटना कार्यरत केली. त्यांनी श्वेतवर्णियांना पूर्वग्रह व विलग्नीकरण बाजूला सारून निग्रोंना समानतेचे वागवण्याबद्दल आवाहन केले. १९६४ साली राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांनी नागरी हक्काचे विधेयक पारित करून वर्णभेदावर व विलग्नी करण घटनेद्वारा बंदी घातली. मात्र आधुनिक अमेरिकेत विलग्नीकरणाची मानसिक प्रवृत्ती अजूनही पूर्णतः नष्ट होऊ शकलेली नाही.

भारतीय समाजातील जातिव्यवस्था व विलग्नीकरण

पारंपारिक हिंदू समाजात सु. तीन हजार वर्षांपासून वर्णव्यवस्थेच्या व जातिसंस्थेच्या रूपाने उच्चनीच श्रेणींनी बद्ध अशी समाजरचना स्थिरावत गेली आहे. त्यात विलग्नवतेच्या काही प्रवृत्ती दिसून येतात. जातिसंस्था स्थिर होत असताना (इ. स. पू. सु. ९ वे-८ वे शतक) ‘चांडाल’ नामक अस्पृश्य जातीचा उल्लेख स्मृतिग्रंथांत (गौतम, आपस्तंब, वसिष्ठ इ. धर्मसूत्रांत) येतो. समाजामध्ये विषमता आल्याचे हे निदर्शक होते. चांडाळांची वस्ती गावाबाहेर असावी, त्यांची भांडी वापरू नयेत, त्यांच्याशी कसलाही करार करू नये, प्रेताप्रमाणे त्यांना अपवित्र मानावे, असे मनुस्मृतीमध्ये म्हटले आहे. त्यांचे दर्शन व संभाषण हेही प्रायश्चित्तार्ह मानले गेले. सर्व गलिच्छ आणि हीन कामे त्यांना करावी लागत. पुढील काळात जातिप्रथेतील भेदभाव अधिक कठोर झाले व अस्पृश्य जातींना बऱ्याच सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक निर्बधांना तोंड देत जगावे लागले. त्यांची वस्ती गावठाणापासून दूर, अलग ठेवली गेली. परिणामी समाजात स्पृश्य आणि अस्पृश्य यांमधील विषमतेची व अलगपणाची दरी वाढतच गेली.

अतिशूद्र व अस्पृश्य यांना गावाबाहेर राहून हालअपेष्टांचे जीवन जगावे लागे. कर्मकांडाच्या व तथाकथित पवित्र्याच्या कल्पनांचा अतिरेक व वरिष्ठ जातींचा सत्तालोभ यांमुळे सामाजिक विषमता आणि अस्पृश्यांची विलग्न्ता पारंपारिक हिंदू समाजात शतकानुशतके अबाधित राहिली. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर अस्पृश्यता निवारणाची सामाजिक चळवळ जोमाने सुरू झाली. ब्रिटिशांच्या राजवटीत मानवतावादी दृष्टिकोनातून म. जोतीबा फुले, स्वामी दयानंद सरस्वती, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी तसेच इतर अनेक समाजसुधारकांनी या अन्यायकारक प्रथेविरूद्ध सामाजिक आंदोलने करून समाजजागृती घडवून आणली. तद्वतच अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी अनेक कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या (उदा., १८५० चा जाति-अन्याय-निवारक अधिनियम). भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट केल्याचे घोषित करण्यात आले. १९५५ मध्ये संसदेने ‘अस्पृश्यता (गुन्हा) अधिनियम’ हा सर्वकष अधिनियम जारी करून कायद्याने अस्पृश्यता सार्वजनिक जीवनातून हद्दपार केली. .

ज्यू धर्मीयांचे विलग्नीणकरण

ज्यू धर्मीयांच्या विलग्नीकरणाला वास्तविक वांशिक भेदाचा आधार नाही. शतकानुशतके आपल्या धर्मिक समुदायातच विवाहसंबंध होत राहिल्यामुळे ज्यू धर्मीयांमध्ये काही समान शारीरिक लक्षणे निर्माण झाली आहेत. परंतु निग्रो वा नॉर्डिक वंशियांप्रमाणे ज्यू लोकसमूह हा वेगळा वांशिक गट नव्हे. मानववंशापेक्षा सांस्कृतिक दृष्ट्या ज्यू लोक हे सर्व समाजांत सर्व काळी अलग, अभेद्य व वैशिष्ट्यपूर्ण राहिले आहेत. त्यांच्या सांस्कृतिक अलिप्तेचे व सामाजिक एकोप्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचा प्राचीन धर्म होय. हा धर्माभिमान व त्यातून येणारी अस्मिता यांमुळे ते अन्य धर्मीय समाजाच्या द्वेषाचे व विरोधाचे लक्ष्य बनले, असे म्हटले जाते. ख्रिस्ती धर्म रोमचा अधिकृत धर्म बनल्यानंतर (चौथे शतक) ज्यू लोकांना दुय्यम दर्जाचे लेखण्यात येऊन त्यांना सर्वसामान्य नागरिकांचे हक्क नाकारण्यात आले. ज्यू धर्म स्वीकारणे, ज्यूंशी विवाहसंबंध ठेवणे हे गुन्हे मानले गेले. सांस्कृतिक अलिप्ततेमुळे शहरातील त्यांच्या वस्त्याही अलग पडल्या. अशा वस्त्या घेटो म्हणून ओळखल्या जात.

ज्यू लोकांना उच्च सामाजिक स्थान मिळू नये आणि त्यांचे आर्थिक, राजकीय व सामाजिक हक्क मर्यादित व खालच्या पातळीवर राहावेत, म्हणून समाजातील बहुसंख्याकांकडून संघटित रीत्या प्रयत्न केले जाते. परिणामी वारंवार स्थलांतरामुळे ज्यूच्या वाट्याला विस्थापितांचे तिरस्करणीय जिणे आले. काल्पनिक वंशभिन्नतेवर आधारलेले पूर्वग्रह, ज्यू लोकांकडे येशू ख्रिस्ताचे मारेकरी म्हणून पाहण्याचा ख्रिस्ती लोकांचा दृष्टिकोण व प्रचलित राजकीय-सामाजिक-आर्थिक परिस्थिती या कारणांमुळे वेगवेगळ्या काळांत वेगवेगळ्या देशांत ज्यूविरोधवादाने (अँटी-सेमिटिझम) प्रखर रूप धारण केले. या पार्श्वभूमीवर थीओडोर हेर्ट्‌झल याने सर्वत्र विखुरलेल्या व छळ सोसणाऱ्या ज्यू लोकांना एकत्र आणून त्यांचे एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याच्या हेतूने १८९७ मध्ये पहिली ‘झायनिस्ट काँग्रेस’ बाझेल येथे भरवली व पॅलेस्टाइनमध्ये ज्यू लोकांचे राष्ट्र निर्माण करण्याचा उद्देश जाहीर केला. त्यातून ज्यू राष्ट्रीय आंदोलन निर्माण झाले व अखेरीस ज्यू लोकांचे इझ्राएल हे स्वतंत्र राष्ट्र १९४८ साली अस्तित्वात आले. राजकीय व भौतिक दृष्ट्या हे विलग्नीकरण अनिवार्य होते.

सामाजिक विलग्नीकरण

कोणत्याही समाजात सार्वजनिक जीवनात अनेक प्रकारचे भेदभाव पाळले जातात, तसेच सत्ताधिकारांचे विषम वाटप होताना दिसते. अनेक देशांत अंतर्गत भेदभावांमुळे गंभीर स्वरूपाचे राजकीय प्रश्न, प्रसंगी हिंसाचार व यादवी माजल्याचे दिसून येते. जपानमध्ये स्थलांतरित कोरियन समुदायाला विलग्न  करून त्यांना कनिष्ठ दर्जा दिला जातो. आफ्रिकेतील रूआंडा या राष्ट्रात १९९४ पासून तुर्त्सी जमात व हुतू जमात यांमध्ये राजकीय व आर्थिक शोषणाच्या परिणामी यादवी चालू आहे. हुतूंचे आर्थिक व सामाजिक विलग्नीकरण करून त्यांना कायम दारिद्र्य व अत्याचार यांचे बळी केले गेले. त्याचे पर्यवसान या रक्तरंजित यादवी युद्धात झाल्याचे दिसून येते

समाजात विलग्नीकरणाची प्रक्रिया ही काही अंशी अनिवार्य असली, तरी जेथे दोन समुदायांना बळाच्या किंवा इतर अन्यायकारक मूल्यांच्या आधारे प्रयोजनपूर्वक वेगळे ठेवले जाते; तेथे असंतोष, उद्रेक तसेच अनेक समस्या निर्माण होतात. धार्मिक, वांशिक, जातीय अथवा लिंगभेदांवर आदारित असे विलग्नीकरण हे सत्ताधाऱ्यांचे शस्त्र आहे व प्रबळ सत्ताधारी वर्गाकडून अल्पसंख्याक दुर्बल घटकांवर अत्याचारी धोरणे लादली जातात, हे कटू सत्य आधुनिक समाजातदेखील आढळते.

 

संदर्भ : 1. Avra, W. D. Segregation, Integration, and the Constitution, 1964.

2. Beteille, Andre, Ed. Social Inequality, Harmondsworth, 1969.

3. Gillin, J. L; Dittmer, C. G.; Colbert. R. J.; Kastler, N. M. Social problems, Bombay,1965.

4. Peach, Ceri and Others, Ed. Ethnic Segregation in Cities, 1982.

5. Rose, peter, The Subject is Race, London, 1968.

 

लेखक - अनुपमा केसकर  / त्रि. ना. वाळुंजकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate