रखरखीत तमदलगेच्या उत्तरेला असणाऱ्या ओसाड माळरानात जलयुक्त शिवार अभियानातून येथील बहाद्दर शेतकऱ्यांनी कष्ट आणि जिद्दीने फोंड्या माळरानात फुलशेती विकसित करुन आर्थिक परिवर्तनाचे नवे पर्व निर्माण केले आहे. तमदलगे येथील शेतकरी महावीर देसाई यांनी तर ओसाड, खडकाळ रानात जलयुक्त शिवार अभियानातून फुलशेतीतून हरित क्रांती घडविली आहे.
गेल्या तीन वर्षापासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान ही प्राधान्यक्रमाची योजना शासनाने पूर्ण ताकदीने राबविली असून या योजनेच्या यशस्वीतेमुळे गावागावात जलक्रांती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कृषि विभागाने सर्व संबंधित विभागांच्या सहकार्यातून हे अभियान प्रभावीपणे राबविले आहे. तमदलगे सारख्या टंचाईग्रस्त गावातही जलयुक्त शिवार अभियानातून साखळी सिमेंट बंधारे बांधून साठलेल्या पाण्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत 2 ते 3 फुटाने वाढ होऊ शकली. जलयुक्त शिवार अभियानातून तमदलगे येथील शेतकरी महावीर दादा देसाई यांनी आपल्या जमिनीत जलसंधारणाच्या प्रणालीव्दारे पाणीसाठी करुन फुलशेतीबरोबरच ज्वारी तसेच गव्हासारखी पिके घेतली.
संपूर्ण महाराष्ट्र 2019 पर्यंतटंचाईमुक्त करण्याच्या दिशेने राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले असून कोल्हापूर जिल्हयातही या अभियानांर्तगत पहिल्या दोन वर्षात 89 गावांची निवड करुन जलसंधारणाच्या प्रणाली राबविल्यामुळे या गांवात जलक्रांती होण्यास मदत झाली आहे. तमदलगे कोल्हापूर सांगली रस्त्यावर वसले असले तरी गावाच्या उत्तरेस डोंगराळ आणि ओसाड जमीन आहे. दुष्काळी पट्ट्यातील या शेतीस निसर्गावरच अवलंबून राहायला लागायचे. पण जेव्हापासून जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले तेव्हापासून या गावाचे रुपच पालटले आहे, त्यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या या शेतीला जलयुक्त शिवार अभियान एक वरदान ठरले आहे.
तमदलगे गावात जलयुक्त शिवार अभियानातून ओढ्यावर साखळी सिमेंट बंधारे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. या ओढ्यावर माथा ते पायथा या प्रणालीनुसार 5 सिमेंट बंधारे बांधून चांगला पाणीसाठा केला गेला. यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणी पातळीत 2 ते 3 फुटाने वाढ झाली. या ओढ्यालगत श्री. देसाई यांची शेती आहे. पण पूर्वापार दुष्काळी छायेत असलेल्या या शेतीतून शेती उत्पन्न निघत नव्हती. मात्र जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रणालीमुळे विहिरींची पाणीपातळी वाढल्याने शेतीपीके घेणे श्री. देसाई यांना शक्य झाले. श्री. देसाई यांनी आपल्या शेतामध्ये कोरडवाहू शेती अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून 2 हजार घनमीटर क्षमतेचे 100 टक्के अनुदानातून शेततळेही घेतले आणि या शेततळ्यामध्ये आपल्या विहिरीतील पाणी साठवून ते टिबक सिंचनाद्वारे ऊसशेती, फुलशेतीस देऊ लागले.
जलयुक्त शिवार अभियानाने श्री. देसाई यांच्या शेता शेजारील बंधाऱ्यामुळे तसेच शेततळे व विहिर यामुळे शाश्वत पाणी साठे निर्माण झाल्याने त्यांनी आपल्या शेतात फुलशेती, ऊसशेती व भाजीपाला शेती विकसित करण्यावर भर दिला. त्यामुळे फोंड्या माळरानात डोंगर कपारीतही आज फुलशेती लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे.
कोरडवाहू अभियानातून 50 टक्के अनुदानातून श्री. देसाई यांनी पाईपलाईन, 5 एकरासाठी ठिबक सिंचन, इलेक्ट्रीक मोटर पंप असे शेतीपुरक साहित्य उपलब्ध करुन घेतले. कृषी विभागाकडून शेती विकासासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि शेतीची पध्दती याची माहिती घेवून बागायती शेती करण्यावर भर दिला. जलयुक्त शिवार अभियानामुळे थोरल्या ओढ्याशेजारी त्यांच्या विहिरीला पाण्याचा चांगला स्त्रोत निर्माण झाल्याने त्यांच्या स्वमालकिच्या शेतामध्ये ऊसशेती अतिशय दर्जेदारपणे केली आहे. त्यामुळे डोंगर कपारीत ऊसशेतीचा त्यांचा प्रयोग इतरांच्या दृष्टीने कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय ठरला आहे. याबरोबरच डोंगर कपारी फुलशेती विकसित करुन आर्थिक उत्पन्नचा नवा मार्ग शोधला आहे.
महावीर देसाई यांनी आपल्या शेतीमधील 15 गुंठे क्षेत्रात गलांडा फुलशेती विकसित केली असून दरवर्षी जवळपास 5 टन गलांडा फुलाची विक्री होत असून या फुल विक्रीतून त्यांना दरवर्षी लाखाहून अधिक उत्पन्न मिळते. आयुष्यभर शिक्षकीपेशा इमाने इतबारे करुन सेवा निवृत्तीनंतर फोंड्या मालरानात फुलशेती करुन नव्या विश्वात किमया घडविण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची साथ लाभली. ओसाड माळरानात गलांडा फुलाची शेती फुलली. यापुढेही आणखीन 10 गुंठे शेतातही फुलशेती विकसित करण्यावर भर दिला आहे. तसेच नजिकच्या काळात कृषि पर्यटन वाढीसाठी नवा प्रयोग करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
लेखक - एस.आर.माने,
माहिती अधिकारी, कोल्हापूर.
माहिती स्रोत :महान्यूज
अंतिम सुधारित : 1/28/2020