भविष्यात स्वत:चे पायावर भक्कमपणे उभे राहून जबाबदार नागरीक होण्यासाठी शालेय जीवन अत्यंत महत्वाचे असते. ज्या शाळेमधून आपण शिक्षण घेतो, त्या शाळेचा उद्धार आपल्या वर्तनानुरूप होत असतो. त्यामुळे मनुष्याच्या आयुष्यात ‘शाळा कुठली’ हा प्रश्न महत्व अधोरेखीत करीत असतो. शाळेचा परीसर जर रमणीय, स्वच्छ व उत्साहवर्धक असेल, तर शाळेमध्ये मन रमते. समजण्याची मानसिक स्थिती चांगल्याप्रकारे राहते. अशा रमणीय परीसराची साथ विद्यार्थ्यांना मलकापूर तालुक्यातील धरणगांवच्या जिल्हा परिषद शाळेचा परीसर देत आहे. शाळेच्या सुंदर व रमणीय परीसराची दखल स्वच्छ विद्यालय स्पर्धेतून केंद्र शासनाने घेतली आहे. ही शाळा आदर्श ठरल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर शाळेने झेंडा रोवला आहे.
‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या 50 हजार रूपयांच्या राष्ट्रीय पुरस्काराने शाळेचा सन्मान करण्यात आला आहे. हा सन्मान पटकाविणारी अमरावती विभागातील ही एकमेव शाळा आहे. या शाळेमुळे मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याचा देशाच्या राजधानीत गौरव झाला आहे. नुकताच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते शाळेला पुरस्कार देवून नवी दिल्लीमध्ये सन्मानीत करण्यात आले. या सोहळ्याला शाळेचे मुख्याध्यापक अनिल खर्चे व विद्यार्थी आयुष पाटील उपस्थित होते.
जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या धरणगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने स्पर्धेचे सर्व निकष पूर्ण केले. त्यामुळे राज्यस्तरावर ही शाळा पोहोचली. राज्यातून 15 शाळांमध्ये धरणगांवचा समावेश असून देशातील 172 शाळांची राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी निवड झाली. या शाळेमध्ये रानपाखर रंगमंच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. तसेच परीसरात केलेल्या रंगछटा व संदेश शाळेचे वेगळेपण अधोरेखीत केले आहे. शाळेच्या यशाबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदाचे कौतुक होत आहे. शाळेच्या या यशामागे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, उपाध्यक्षा मंगलाताई रायपुरे, पंचायत समिती सभापती संगीताताई तायडे, उपसभापती सीमा बगाडे यांचे मार्गदर्शन आहे.
धरणगांवची लोकसंख्या जवळपास 7 ते 8 हजार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जो आता एसियन हायवे झालेला आहे. त्या महामार्गावरील एक मोठे गाव आहे. हे गांव जवळपासच्या 10 ते 15 गावांना जुळलेले आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अशा स्वच्छ वातावरणात शिकायला मिळत असल्यामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कॉन्व्हेटच्या युगात जिल्हा परीषद शाळा आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करीत असताना, धरणगांवच्या शाळेने स्वच्छ शाळा ठेवून विद्यार्थी संख्या वाढविण्यावर भर दिला असल्याचे महत्वाचे आहे. धरणगांवची शाळा जिल्ह्यामध्ये अन्य शाळांनी प्रेरणादायी ठरली आहे. देशाच्या राजधानीत गौरव झाल्यामुळे शाळा पाहायला दुरवरून नागरिक येत आहेत.
पुरस्कार मिळाल्याबरोबर शाळेची वार्ता दुरपर्यंत पोहोचली. गावातील वातावरणही त्यामुळे शैक्षणिक होवून गेले. धरणगांवातील नागरिक बाहेर भेटल्यावर त्याला शाळेची विचारणा होत आहे. या शाळेच्या लौकिकामुळे, आपलाही गौरव झाल्याची भावना या नागरिकांमध्ये आहे. जिल्हा परीषद शाळेने धरणगांवचे नाव देशाच्या राजधानीत गौरवांकीत केले आहे.
लेखक: निलेश तायडे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 3/8/2024