অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोषण व वाढ

पोषण व वाढ

  1. पोषण व वाढीविषयीच्या माहितीचा प्रसार व तिचा अवलंब करणे महत्वाचे का आहे?
  2. प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास पोषण व वाढीसंबंधीची माहिती मिळण्याचा हक्क आहे?
  3. सहाय्यक माहिती - पोषण व वाढ
    1. महत्वाचा संदेश : लहान मुलाची किंवा मुलीची व्यवस्थित वाढ होऊन वजन वेगाने वाढले पाहिजे. दोन जन्मापासून वर्षांपर्यंतच्या मुलांचे वजन दर महिन्यास करा. दोन महिन्यांमध्ये वजन वाढले नसल्यास, काहीतरी घोटाळा आहे असे समजा.
    2. महत्वाचा संदेश : बाळाला पहिल्या सहा महिन्यांमध्ये आहार व पाण्‍याच्‍या स्‍वरूपात फक्त आईच्‍याच दुधाची गरज असते. सहा महिन्यांनंतर आईच्या दुधाच्‍या जोडीला बाळाला इतर अन्नपदार्थांची देखील गरज असते.
    3. महत्वाचा संदेश:सहाव्या महिन्यापासून दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना, आईच्या दुधाच्‍या जोडीला, दिवसातून पाच वेळा खायला द्या.
    4. महत्वाचा संदेश: आजारपणे व विशेषतः डोळ्यांचे विकार टाळण्यासाठी मुलांना अ जीवनसत्वाची गरज असते. अ जीवनसत्वाचा पुरवठा करणारे पदार्थ अंडी, दूध व दुधाचे पदार्थ, फळे आणि भाज्या, तेले, विशेष रीतीने विकसित केलेले अन्न किंवा अ जीवनसत्वाच्या गोळ्या हे होत.
    5. महत्वाचा संदेश: शारीरिक व मानसिक सामर्थ्‍यासाठी मुलांना लोह म्हणजे लोहतत्‍व-समृद्ध अन्नपदार्थ - लिव्हर, मांस, अंडी, मासे, विशेष रीतीने विकसित केलेले अन्न किंवा आयरनच्‍या गोळ्या किंवा लोहपूरक पोषके द्या.
    6. महत्वाचा संदेश: मुलांमधील आकलनशक्तीचा विकास न होणे किंवा विकास मंद गतीने होणे ह्यासारख्या गंभीर गोष्टी टाळण्यासाठी आयोडिनयुक्त मिठाचा वापर करा.
    7. महत्वाचा संदेश: आजारपणात, मुलांनी नियमितपणे जेवले पाहिजे. आजारपणातून उठलेल्या मुलास, त्यापुढील आठवडाभर दररोज कमीत कमी एक जास्तीचे जेवण द्या.

पोषण व वाढीविषयीच्या माहितीचा प्रसार व तिचा अवलंब करणे महत्वाचे का आहे?

अर्ध्यापेक्षा जास्त बालमृत्यू कुपोषणामुळे होतात. कारण कुपोषणाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. गुणवत्तारहित आहार, वारंवार होणारे आजार आणि लहान मुलांची पुरेशी किंवा मुळीच काळजी न घेण्याने त्यांचे कुपोषण होते.

एखादी गर्भवती स्‍त्रीचे कुपोषण झाल्‍यास किंवा  तिचे मूल वयाच्या पहिल्या दोन वर्षांच्‍या दरम्यान कुपोषित राहिल्यास अशा मुलाची शारीरिक तसेच मानसिक वाढ व विकास धिम्‍या गतीने होतो. ह्याची कोणती ही भरपाई मूल मोठे झाल्यावर करता येत नाही - असे मूल जन्मभर तसेच राहते.

वाढीच्या दिवसांत सुरक्षित व आपलेपणाचे वातावरण, पोषक आहार, रोगांपासून संरक्षण आणि वाढ व विकासास अनुकूल परिस्थिती मिळणे हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे.

प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास पोषण व वाढीसंबंधीची माहिती मिळण्याचा हक्क आहे?

  1. लहान मुलाची किंवा मुलीची व्यवस्थित वाढ होऊन वजन वेगाने वाढले पाहिजे. जन्मापासून दोन वर्षांपर्यंत मुलांचे वजन दर महिन्यास करा. दोन महिन्यांमध्ये वजन वाढले नसल्यास, काहीतरी घोटाळा आहे असे समजा
  2. बाळाला पहिल्या सहा महिन्यांमध्ये फक्त आईचे दूधच गरजेचे असते, कोणते ही इतर अन्न व पाणी त्यास देऊ नये. सहा महिन्यांनंतर, आईच्या दुधा बरोबरच, बाळाला इतर अन्नपदार्थांची देखील गरज असते
  3. सहाव्या महिन्यापासून दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना, आईच्या दुधा बरोबरच, दिवसातून पाच वेळा खायला द्या.
  4. आजारपणे व विशेषतः डोळ्यांचे विकार टाळण्यासाठी मुलांना अ जीवनसत्वाची गरज असते. अ जीवनसत्वाचा पुरवठा करणारे आईच्‍या दुधाव्‍यतिरिक्‍त इतर पदार्थ म्हणजे अंडी, दूध व दुधाचे पदार्थ, फळे आणि भाज्या, तेले, विशेष रीतीने विकसित केलेले अन्न किंवा अ जीवनसत्वाच्या गोळ्या.
  5. शारीरिक व मानसिक ताकदीसाठी मुलांना लोह म्हणजे लोहतत्‍वसमृद्ध अन्नपदार्थ - लिव्हर, मांस, अंडी, मासे, विशेष रीतीने विकसित केलेले अन्न किंवा लोहाच्या गोळ्या द्या.
  6. आकलनशक्तीचा विकास न होणे किंवा एकंदर विकास मंद गतीने होणे ह्यासारख्या गंभीर गोष्टी टाळण्यासाठी आयोडिनयुक्त मिठाचा वापर करा.
  7. आजारपणात मुलांनी नियमितपणे अन्न खाल्ले पाहिजे. आजारपणातून उठलेल्या मुलास त्यापुढील आठवडाभर एक जास्तीचे जेवण द्या.

सहाय्यक माहिती - पोषण व वाढ

महत्वाचा संदेश : लहान मुलाची किंवा मुलीची व्यवस्थित वाढ होऊन वजन वेगाने वाढले पाहिजे. दोन जन्मापासून वर्षांपर्यंतच्या मुलांचे वजन दर महिन्यास करा. दोन महिन्यांमध्ये वजन वाढले नसल्यास, काहीतरी घोटाळा आहे असे समजा.

बाळाच्या विकासाचे व एकंदर वाढीचे महत्‍वपूर्ण लक्षण म्हणजे त्याचे नियमितपणे वाढणारे वजन होय. आरोग्यकेंद्राला दिलेल्या प्रत्येक भेटीचे वेळी मुलाचे वजन केले पाहिजे.

पहिले सहा महिने फक्त आईच्या दुधावरच वाढलेल्या मुलांची प्रकृती सामान्‍यपणे चांगली दिसते. स्तनपान करविल्याने आजारांपासून मुलांचे संरक्षण होते तसेच त्यांची शारीरिक व मानसिक वाढ आणि विकास उत्तम रीतीने होतो. त्यांच्या तुलनेमध्ये आईचे दूध न मिळणारी मुले कमी वेगाने शिकतात.

दोन महिन्यांत मुलाचे वजन वाढले नसल्यास त्यास अधिक किंवा अधिक पोषणयुक्त अन्नाची गरज असू शकते किंवा ते आजारी असेल किंवा त्याची जास्त काळजी घेण्याची गरज असू शकेल. अशावेळी बाळाकडे अधिक लक्ष देऊन पालक व आरोग्यसेवकाने ह्या मागील कारण शोधले पाहिजे. बाळाच्या वाढीचा एक तक्ता उर्फ ग्रोथ-चार्ट बनवून प्रत्येक वेळी वजन केल्यानंतर वाढत्या वजनानुसार त्यावर खुणा करा. ह्या खुणा किंवा ठिपके जोडल्यास एक रेषा तयार होऊन ती बाळाचे वाढते वजन दाखवेल. रेषा वरील दिशेने चढत असल्यास बाळाची वाढ चांगली आहे असे समजा. परंतु रेषा आडव्या किंवा खालील दिशेने जात असल्यास काहीतरी गडबड आहे.

बाळाचे वजन नियमितपणे वाढत नसल्यास किंवा त्‍याची वाढ नीट होत नसल्‍यास काही महत्‍वाचे प्रश्‍न विचारात घ्‍यावे लागतील:

  • मूल दिवसातून किती वेळा खाते आहे?  मुलाने दिवसातून 3 ते 5 वेळा खाल्ले पाहिजे. मूल अपंग किंवा अक्षम असल्यास त्याला खाण्यासाठी जास्त वेळ द्या व त्याला मदत करा.
  • मुलाला पुरेसे अन्न मिळते आहे ना? पहिले दिलेले अन्न संपवून मुलाने जास्त मागितल्यास त्याला खायला द्या.
  • मुलाच्या आहारामध्ये ‘वाढीस’ पोषक व ‘शक्तिदायक’ पदार्थांचे प्रमाण कमी आहे का?  धान्ये, डाळी, मांस, अंडी, शेंगा, मेवा इ. मुळे बाळाची वाढ चांगली होते. किंचित तेलाने देखील शक्ती मिळते. लाल पामतेल किंवा जीवनसत्वयुक्त इतर तेले देखील शक्तीचे उत्‍तम स्‍त्रोत आहेत.
  • बाळाला खाणे नकोच आहे का? एखाद्या विशिष्ट पदार्थाची चव त्याला आवडत नसेल, तर त्याऐवजी दुसरा पदार्थ द्या. त्याला हळूहळू नवनवीन पदार्थ खायला शिकवा.
  • बाळ आजारी आहे का?  छोटी जेवणे वारंवार खाण्यासाठी आजारी मुलाचे मन वळवा. आजारपणातून उठलेल्या मुलास त्यापुढील आठवडाभर एक जास्तीचे जेवण द्या तर अगदी लहान बाळास जास्तीचे स्तनपान करवा. मूल वारंवार आजारी पडू लागल्यास त्याला प्रशिक्षित आरोग्यसेवकाकडे घेऊन जा.
  • बाळ मुळातच आजारी पडू नये ह्यासाठी त्याला अ जीवनसत्वाचा पुरेसा पुरवठा होतो आहे का?  आईच्या दुधात अ जीवनसत्व भरपूर असते. अ जीवनसत्वाचा पुरवठा करणारे इतर पदार्थ म्हणजे लिव्हर, अंडी, दूध व दुधाचे पदार्थ, लाल पामतेल, पिवळ्या तसेच नारंगी रंगाची फळे आणि भाज्या व हिरव्या भाज्या. विकसनशील देशांच्या काही भागांत ह्या गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्यास त्या भागातील मुलांना, वर्षातून दोनदा, अ जीवनसत्वाची गोळी द्या.
  • आईच्या दुधाला पर्यायी समजले जाणारे पदार्थ त्याला बाटलीने पाजले जात आहेत का?  बाळाचे वय सहा महिन्यांपेक्षा कमी असल्यास त्याला आईचे दूधच देणे उत्तम कारण त्यामध्ये अनेक पोषकद्रव्ये असतात. वरचे दूध द्यायचेच असले तर ते स्वच्छ कपातून द्या, बाटलीमधून नको.
  • अन्नपाणी स्वच्छ आहे ना?  स्वच्छता नसेल तर मूल आजारी पडणारच. कच्च्या वस्तू धुवून किंवा शिजवून घ्या. शिजवलेले अन्न शक्य तितक्या लवकर खा. असे अन्न नंतर पुन्हा खाते वेळी नीट गरम करा.
  • पाण्याचा स्त्रोत सुरक्षित आणि स्वच्छ असावा व तो तसा ठेवण्याची काळजी घ्या. पिण्याचे पाणी नियमितपणे स्वच्छ ठेवलेल्या, क्लोरिनने निर्जंतुक केलेल्या स्त्रोतापासून बंद नळाने आणा. जर पाणी तलाव, विहिरी, हातपंप इ.पासून आणलेले असेल तर पाणी उकळून निर्जंतुक करून घेता येते.
  • मानवी मलमूत्र शौचालयामध्येच टाकले जाते का?  ते जमिनीत पुरले जाते का? मलमूत्र उघड्यावरच असल्यास त्यामुळे मुलांना जंत व इतर रोग होऊ शकतात. आरोग्यसेवकाकडून मुलांना कृमिप्रतिरोधक औषध द्या.
  • मूल बराच वेळ एकटेच किंवा आपल्या मोठ्या भावंडांसोबतच असते का?  अशा मुलांना मोठ्या माणसांच्या सहवासाची गरज ही असते - विशेषतः जेवणाच्या वेळी.

महत्वाचा संदेश : बाळाला पहिल्या सहा महिन्यांमध्ये आहार व पाण्‍याच्‍या स्‍वरूपात फक्त आईच्‍याच दुधाची गरज असते. सहा महिन्यांनंतर आईच्या दुधाच्‍या जोडीला बाळाला इतर अन्नपदार्थांची देखील गरज असते.

बाळाच्या जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये त्याच्या जिवाला धोका असू शकतो. अशा वेळी फक्त आईचे दूध दिल्याने त्याला अतिसार व इतर आजारांपासून संरक्षण मिळते. सहा महिन्यांनंतर मुलाला वरचे अन्नपाणी सुरू करा. स्तनपान दुसर्‍या वर्षापर्यंत चालू ठेवा.

सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाचे वजन वाढत नसेल तर त्यास अधिक वेळा स्तनपान द्या.

  • आईचे दूध पिणार्‍या व सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाला इतर कोणत्या ही पातळ पदार्थाची गरज नसते, अगदी पाण्याची देखील नाही.
  • आईचे दूध पिणार्‍या व सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाचे वजन वाढत नसेल तर ते आजारी असू शकेल किंवा त्याला दूध कमी पडत असेल. आरोग्यसेवक बाळाची तब्येत तपासून बाळ जास्त दूध कसे पिईल ह्या विषयीच्या उपायांचा  सल्ला आईला देऊ शकतो.

सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळाच्या आहारामध्ये, आईच्‍या दुधाच्‍या जोडीला शिजवलेला भाजीपाला, डाळी व फळे, थोडेफार तेल, अंडी, मासे, मांस, चिकन व दुधाच्या पदार्थांचा समावेश असला पाहिजे ज्यायोगे त्यास सर्व प्रकारची जीवनसत्वे व खनिजे मिळतील. आहारामध्ये जेवढी विविधता असेल तेवढी चांगली.

  • सहा महिने ते 1 वर्ष ह्या काळात वारंवार आणि इतर अन्नपाणी देण्याच्या आधी बाळास आईचे दूध द्या.
  • सहा महिन्यांनंतर बाळ रांगू लागते, वरचे अन्न खाऊ लागते व त्‍याला जंतुसंसर्ग होण्‍याचा धोका वाढतो. त्याचे हातपाय व अन्‍न स्‍वच्‍छ ठेवावे.
  • 12 ते 24 महिने वयाच्या मुलामुलींना जेवणानंतर तसेच त्यांच्या इच्छेनुसार स्तनपान द्यावे.

महत्वाचा संदेश:सहाव्या महिन्यापासून दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना, आईच्या दुधाच्‍या जोडीला, दिवसातून पाच वेळा खायला द्या.

वयाच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये मूल कुपोषित राहिल्यास पुढील संपूर्ण आयुष्यभर त्याचा शारीरिक व मानसिक विकास धिम्‍या गतीने होतो.

उत्तम तब्येतीसाठी लहान मुलांना, आईच्या दुधाच्‍या जोडीला, विविध प्रकारच्या पोषक अन्नाची गरज असते, उदा. मांस, मासे, अंडी, फळे व भाज्या इ.

मोठ्या माणसाच्या तुलनेमध्ये मुलांचे पोट लहान असते. त्यामुळे ती एका जेवणामध्ये खूप खात नाहीत. मात्र त्यांची शारीरिक गरज अधिक आणि अखंड खेळण्याचा उत्साह भरपूर असल्यामुळे त्यांनी दिवसातून बर्‍याच वेळा खाणे आवश्‍यक आहे.

भाज्यांचा लगदा, बारीक केलेले मांस, अंडी, मासे ह्यांचा मुलांच्या आहारामध्ये जास्तीत जास्त वेळा समावेश करा. कमी प्रमाणात तेल ही वापरा. लाल पामतेल किंवा जीवनसत्वयुक्त इतर एखादे तेल उत्तम.

एकाच सामायिक ताटात वाढले तर, लहान मुलांना पुरेसे अन्न न मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक मुलास पुरेसे अन्न मिळावे ह्यासाठी त्याला वेगळे ताट द्या. मुलास गरजेनुसार खाणे मिळाल्याची पालकांनी किंवा संगोपनकर्त्‍यांनी खात्री करावी.

लहान मुलांना खाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागते तसेच ताट-भांडे हाताळण्याची योग्य पद्धत शिकवावी लागते. अपंग मुलास खाण्यापिण्यासाठी कदाचित मदत करावी लागेल.

महत्वाचा संदेश: आजारपणे व विशेषतः डोळ्यांचे विकार टाळण्यासाठी मुलांना अ जीवनसत्वाची गरज असते. अ जीवनसत्वाचा पुरवठा करणारे पदार्थ अंडी, दूध व दुधाचे पदार्थ, फळे आणि भाज्या, तेले, विशेष रीतीने विकसित केलेले अन्न किंवा अ जीवनसत्वाच्या गोळ्या हे होत.

बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत, आईच्या दुधामधून त्याला पुरेसे अ जीवनसत्व मिळते.  ह्यासाठी आईच्या शरीरामध्ये तिच्या आहारातून किंवा  गोळ्यांमधून पुरेसे अ जीवनसत्व पोहोचलेले असले पाहिजे. सहा महिन्यांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना इतर खाद्यपदार्थ किंवा पूरक अन्नाद्वारे अ जीवनसत्व मिळवण्याची गरज असते.

लिव्हर, अंडी, दुधाचे पदार्थ, फॅटी फिश लिव्हर तेल, पिकलेले आंबे व पोपया, गोड रताळी, हिरव्या पालेभाज्या, गाजर इ. मध्ये अ जीवनसत्व भरपूर आढळते.

मुलांना अ जीवनसत्व कमी पडत असल्यास त्यांना रातांधळेपणा येऊ शकतो. संध्याकाळी व रात्री कमी दिसणार्‍या मुलांना अ जीवनसत्वाची गरज असणार. अशा वेळी आरोग्यसेवकाकरवी त्यांना अ जीवनसत्वाच्या गोळ्या द्या.

काही देशांमध्ये, खाद्यतेलात किंवा अन्नपदार्थांमध्ये अ जीवनसत्व मिसळले जाते. बाजारात गोळ्या व द्रवाच्या रूपात ही अ जीवनसत्व मिळते. तर काही देशांमध्ये सहा महिने ते पाच वर्षे वयाच्या सर्व मुलामुलींना वर्षातून दोनदा अ जीवनसत्वाच्या गोळ्या दिल्या जातात.

अतिसार व गोवर ह्या आजारांमध्ये मुलांच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाण एकदम घसरते. अधिक वेळा स्तनपान करविल्याने अ जीवनसत्वाची भरपाई होऊ शकते. सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना फळे, भाज्या, अंडी, दुधाचे पदार्थ व लिव्हर दिल्याने ह्याची भरपाई होऊ शकते. 14 दिवसांपेक्षा जास्त काळ अतिसार झालेल्या किंवा गोवर झालेल्या मुलांना आरोग्यसेवकाकरवी अ जीवनसत्वाची गोळी द्या.

महत्वाचा संदेश: शारीरिक व मानसिक सामर्थ्‍यासाठी मुलांना लोह म्हणजे लोहतत्‍व-समृद्ध अन्नपदार्थ - लिव्हर, मांस, अंडी, मासे, विशेष रीतीने विकसित केलेले अन्न किंवा आयरनच्‍या गोळ्या किंवा लोहपूरक पोषके द्या.

लोहाच्या कमतरतेमुळे होणार्‍या – ऍनिमिया - ह्या रोगामुळे शारीरिक व मानसिक विकासावर वाईट परिणाम होतो. ह्याची लक्षणे म्हणजे जीभ, हाताचे तळवे व ओठांच्या आतील बाजूची त्वचा फिकट दिसणे. थकवा जाणवणे तसेच धाप लागणे. पोषण न मिळाल्याने होणारा जगभरातील प्रमुख आजार म्हणजे पंडुरोग होय.

  • अर्भके व बाळांमध्ये आढळणार्‍या अल्‍प पंडुरोगामुळे त्यांची बौद्धिक वाढ खुंटण्याचा धोका असतो.
  • दोन वर्षांखालील मुलांमधील पंडुरोगामुळे त्यांना तोल सांभाळणे व सुसंगत किंवा  समतोल हालचाली करणे जड जाते. अशी मुले एकलकोंडी व संकोची स्वभावाची असू शकतात. ह्यामुळे त्यांची संवाद क्षमता कमी होऊन त्यांच्या बौद्धिक विकासामध्ये अडथळे येऊ शकतात.
  • गर्भवतींना पंडुरोग झाल्यास जन्‍म देते समयी गंभीर रक्तस्त्राव किंवा जंतुसंसर्गाची शक्यता असते आणि हे प्रसूतीसमय-मृत्‍यूचे कारण देखील ठरते. पंडुरोगी आईची मुले कमी वजनाची व स्वतः पंडुरोगी असू शकतात. लोहपूरक पोषके दिल्‍याने आई व बाळाचा पंडुरोगापासून बचाव होतो.

लिव्हर, मांस, अंडी व डाळींमध्ये लोहतत्‍व असते. खास बनवलेले अन्न देखील लोहाचा पुरवठा करते. मलेरिया आणि हुकवर्म यांच्‍यामुळे देखील ऍनिमिया होऊ किंवा वाढू शकतो.

  • मलेरियापासून बचाव करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे योग्य कीटकनाशक फवारलेल्या मच्छरदाणीत झोपणे.
  • कृमींचा प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशातील मुलामुलींना वर्षातून दोन-तीन वेळा कृमिप्रतिरोधी औषध द्या. आरोग्य व स्वच्छतेच्या चांगल्या सवयींमुळेदेखील जंत होत नाहीत. मुलांना शौचालयाजवळ किंवा मुतारीजवळ खेळू देऊ नका. हात नेहमी स्वच्छ आहेत ना हे पहा. जंतांचा संसर्ग होऊ नये ह्यासाठी त्यांनी बूट घालावेत.

महत्वाचा संदेश: मुलांमधील आकलनशक्तीचा विकास न होणे किंवा विकास मंद गतीने होणे ह्यासारख्या गंभीर गोष्टी टाळण्यासाठी आयोडिनयुक्त मिठाचा वापर करा.

मुलामुलींची योग्य वाढ व विकास होण्यासाठी आयोडिनच्‍या अल्‍प प्रमाणाची आवश्यकता असते. त्यांना पुरेसे आयोडिन न मिळाल्यास किंवा गर्भवती असताना त्यांच्या आईलाच आयोडिन कमी पडले असल्यास मुलाची ऐकण्याची, बोलण्याची किंवा मानसिक क्षमता जन्‍मजात कमी असू शकते. शारीरिक किंवा मानसिक विकास उशीराने सुरू होऊ शकतो.

आहारात आयोडिन कमी असल्याचे प्रमुख लक्षण म्हणजे मानेवर सूज येऊन होणारा गॉयटर हा रोग. गर्भवतीस गॉयटर झालेला असल्यास गर्भपात, मृत बाळाचा जन्म किंवा  मुलाच्या मेंदूमध्ये जन्मतःच व्यंग असणे इ. शक्यता वाढतात.

साध्या मिठाऐवजी आयोडिनयुक्त मीठ वापरल्याने गर्भवतींना व मुलांना आवश्‍यक तेवढे आयोडिन मिळते. आयोडिनयुक्त मीठ उपलब्ध नसल्यास आरोग्यसेवकाकडून स्त्रिया व मुले यांनर देण्‍यासाठी आयोडिन देणारे पूरक पदार्थ घ्या.

महत्वाचा संदेश: आजारपणात, मुलांनी नियमितपणे जेवले पाहिजे. आजारपणातून उठलेल्या मुलास, त्यापुढील आठवडाभर दररोज कमीत कमी एक जास्तीचे जेवण द्या.

मुले आजारी असल्यास, विशेषतः त्‍यांना अतिसार किंवा गोवर झाल्यास, त्‍यांची भूक कमी होते आणि त्‍यांनी खाल्‍लेल्‍या वापर कमी प्रभावी ठरतो. वर्षातून बरेचदा असे झाल्यास मुलाची वाढ मंदावते व थांबतेच.

आजारी मुलास खाण्यासाठी उद्युक्त करणे अतिशय गरजेचे आहे. हे काम कठीण असते कारण अशा मुलाची खाण्याची इच्छाच कमी झालेली असते. अशावेळी मुलाला आवडीचे पदार्थ दर काही वेळाने थोडेथोडे देत रहा. जादा स्तनपान करविल्यास विशेषत: आवश्‍यक आहे.

आजारी मुलास जास्तीचे पाणी प्यायला लावा. अतिसार झालेल्या मुलांना जलशुष्कता उर्फ डीहायड्रेशन झाल्यास त्यांची अवस्था वाईट होते. पुष्‍कळशा प्रमाणात पेये घेतल्‍याने डीहायड्रेशन पासून बचाव होतो.

आजारपण व मंदावलेली भूक काही दिवसां नंतरदेखील कायम राहिल्यास, त्याला आरोग्यसेवकाकडे न्या. मुलाचे घटलेले वजन पुन्हा वाढून, आजारी पडण्यापूर्वी होते त्याच्या आसपास आल्याशिवाय ते त्या आजारातून बाहेर आले आहे असे मानता येणार नाही.

स्त्रोत : UNICEF

अंतिम सुधारित : 5/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate