भेसळ ही बाजाराला लागलेली कीड आहे. या किडीने समाजाला पोखरण्याआधी तिचे उच्चाटन होणे गरजेचे आहे. त्याकरिता एफडीएला अधिक सक्षम करावे लागेल.
खाद्य पदार्थांतील मागणी आणि पुरवठ्यात वारंवार तफावत आढळून येते. ही तफावत कधी उत्पादनातील कमीमुळे, तर अनेक वेळा व्यापाऱ्यांच्या कृत्रीम तुटवड्यामुळे देखील असते. मात्र ही तफावत भेसळीच्या माध्यमातून पूर्ण करून संबंधित व्यापारी नफा कमावतात. आंबा, पेरू, चिकू आदी फळे पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड हे रसायन सर्रासपणे वापरले जाते. भाजीपाल्यास आकर्षक रंग अथवा आकार वाढविण्यासाठी विविध रसायनांचा प्रयोग व्यापारी करतात.
सणावाराला दूध, खवा, मिठाईतील भेसळ ही नित्याचीच बाब झाली आहे. अन्न, औषध आणि सौंदर्य प्रसाधने यांतील भेसळ ही थेट ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. मात्र भेसळ करताना नफेखोरांकडून मानवी आरोग्याचादेखील विचार केला जात नाही. सुरक्षित, भेसळमुक्त, दर्जेदार अन्न आणि औषधे हा ग्राहकांचा अधिकार आहे. हा अधिकाराचे संरक्षण करण्याकरिता अन्न व औषध प्रशासन (एफडीए) ही संस्था राज्यात कार्यरत आहे. दिवसेंदिवस भेसळीचे प्रकार वाढत असताना त्यांना वेळीच प्रतिबंध घालायलाच हवा.
कोणत्याही गैरप्रकाराला आळा घालण्यासंबंधित विशिष्ट उद्दिष्ट ठेवून एखादी यंत्रणा उभी केली, तर त्यास आवश्यक सोईसुविधा, पुरेसा निधी आणि आवश्यक मनुष्यबळ पुरविणे हे शासनाचे काम आहे. आणि अशी यंत्रणा ग्राहक हितार्थ गैरप्रकाराला आळा घालणारी असेल तर ती शासनाची आद्य जबाबदारीच ठरते.
अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई हे प्रयोगशाळेच्या नमुना तपासणीवरच अवलंबून असते. अशा वेळी जिल्ह्याच्या ठिकाणी नाहीतर किमान विभागवार तरी प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे. प्रस्तावित पुणे, औरंगाबाद आणि नाशिक येथील प्रयोगशाळा अत्याधुनिक सोईसुविधेनिशी तत्काळ सुसज्ज करायला हव्यात. असे झाल्यास अहवालप्राप्तीसाठी सध्या होणारा विलंब टाळून तत्काळ कारवाई करता येईल. दुधासह इतरही खाद्य पदार्थांच्या "स्पॉट टेस्टिंग'साठी फिरत्या प्रयोगशाळा राज्यात कमीच आहेत. त्याही एफडीएच्या मागणीनुसार त्यांना मिळायला हव्यात. खाद्य पदार्थातील भेसळ ही तालुका, गाव पातळीवर पोचली आहे.
भेसळीची चर्चा मात्र मोठ्या शहरांतच होते. हा विभाग गाव, तालुक्यापर्यंत पोचविण्याकरिता आवश्यक विस्तार करण्याबाबत शासनाने विचार करायला हवा. एफडीएमधील 27 टक्के जागा रिक्त असल्याचे कळते. या जागाही ताबडतोब भरायला हव्यात. आवश्यक मनुष्यबळाच्या पूर्ततेशिवाय कोणताही विभाग प्रभावी काम करू शकत नाही, हे शासनाने जाणायला हवे. भेसळ रोखण्याकरिता उत्पादक, वितरक, ग्राहक आदींमध्ये व्यापक प्रबोधनाची आवश्यकता आहे.
याकरिता सर्वसमावेशक फोरम स्थापन्याची आयुक्तांची कल्पना चांगलीच म्हणावी लागेल. भेसळ ही बाजाराला लागलेली कीड आहे. या किडीने समाजाला पोखरण्याआधी तिचे उच्चाटन होणे गरजेचे आहे. त्याकरिता एफडीएला अधिक सक्षम करावे लागेल.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...