राज्यामध्ये आरोग्य विभागातर्फे 10 फेब्रुवारी हा जागतिक जंतनाशक दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त 1 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक औषध देऊया, सशक्त व सुदृढ करुया...जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये 1 ते 14 वयोगटातील जवळपास 68 टक्के मुले असून त्यातील 28 टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून (कृमी) धोका आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव. या कृमीदोषांचा संसर्ग मुलांना दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक असून, मुलांना आरोग्याच्यादृष्टीने अशक्त करणारा आहे. कृमीदोषामुळे रक्तक्षय आणि कुपोषण तर वाढतेच. परंतु त्यामुळे बालकाची बौध्दिक व शारीरिक वाढही खुंटते.
भारतामध्ये 6 ते 59 महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येकी 10 बालकांमागे 7 बालकांमध्ये रक्तक्षयाची लागण होते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. 15 ते 19 वर्षे वयोगटातील 56 टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व 30 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. पाच वर्षांखालील कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या बालकांची टक्केवारी सुमारे 34 टक्के आहे. मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमिदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात सुमारे 28 टक्के आहे. बालकांमधील कृमिदोषाचे प्रमाण कमी व्हावे व बालक सशक्त व सुदृढ बनावे यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन वर्षातून दोनदा, 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट रोजी राबविण्यात येतो. 1 ते 6 वर्षे वयोगटातील सर्व बालके, 6 ते 19 वर्षे वयोगटातील शाळेत जाणारी व शाळेत न जाणाऱ्या मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी (औषध) देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे.
10 फेब्रुवारी रोजी ज्या बालकांना जंतनाशक औषध देण्यात आले नाही, अशा बालकांना 15 फेब्रुवारी रोजी जंतनाशक औषध देण्यात येते. महाराष्ट्रात उस्मानाबाद, नांदेड, भंडारा, गोंदिया, नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका, पालघर जिल्ह्यातील वसई, वाडा व पालघर तालुका व नागपूर ग्रामीण भाग वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये 1 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक औषध देण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच वसई-विरार व नांदेड महानगरपालिका वगळता सर्व महानगरपालिका क्षेत्रात ही जंतनाशक औषध मोहीम राबविली जाणार आहे.
राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानीत, महानगरपालिका व खाजगी अनुदानीत 84 हजार 925 शाळा, 1 हजार 95 आश्रमशाळांमधून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण व शहरी भागातील 1 लाख 10 हजार अंगणवाडी, मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘जंतापासून मुक्त, होतील मुले सशक्त’ हे घोषवाक्य या मोहिमेसाठी निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग व आदिवासी कल्याण विभाग सहभागी झाले आहेत. जंतनाशक मोहिमेमध्ये 1 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांना 200 मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी पावडर करुन पाण्यात विरघळून देण्यात येते. 2 ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना 400 मि.ग्रॅ. गोळी पावडर करुन व पाण्यात विरघळून देण्यात येते. 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना 400 मि.ग्रॅ. गोळी चाऊन खाण्यास किंवा पावडर करुन पाण्यात विरघळून देण्यात येते. 6 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना 400 मि.ग्रॅ. गोळी चाऊन खाण्यास देण्यात येते. जंतनाशक औषध लाभार्थ्यांलाच दिले जावे यासाठी मोहिमेमध्ये देण्यात येणाऱ्या औषधाची गोळी लाभार्थ्यांच्या अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या हातामध्ये किंवा संबंधितांना घरी घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
ज्या बालकांमध्ये कृमिदोष मोठ्या प्रमाणावर आहे अशांना औषधामुळे मळमळणे, डोकेदुखी अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. परंतु त्यामुळे घाबरु नये. हे जंतनाशक औषध केंद्र सरकारने आरोग्यविषयक सर्व तपासण्या करुन उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे ते सर्वार्थाने सुरक्षित आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेमध्ये सहभागी होणे सर्व पालकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. पालकांनी आपल्या मुला-मुलींना या मोहिमेमध्ये जंतनाशक औषध घेण्यास प्रवृत्त करावे, येणारी पिढी सशक्त आणि सुदृढ करावी, असे आवाहन अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (कुटूंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य) डॉ.अर्चना पाटील यांनी केले आहे.
लेखक - जयंत कर्पे,
माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.