शवसंलेपन प्रक्रियेत सर्वप्रथम शवाच्या नाकपुड्यांमधून किंवा डोळ्यांच्या खोबणीतून तीक्ष्ण हत्यार डोक्यात घुसवून मेंदूचे तुकडे बाहेर काढत व त्या पोकळीत रेझिनमध्ये भिजविलेले लिननचे तुकडे भरले जात. नंतर पोटाचा छेद घेऊन आतील अवयव काढले जात. फक्त हृदय ठेवत, कारण त्याला विचार करण्याचे इंद्रिय मानत. पोटाची पोकळी पामच्या दारूने व कुटलेल्या मसाल्याने स्वच्छ करून, शिवून नॅट्रॉनमध्ये बहात्तर दिवस ठेवत असत. त्यानंतर ते शव धुऊन व गोंदात भिजविलेल्या लिननच्या पट्ट्यांनी बांधून मानवी देहकाराशी मिळत्याजुळत्या, सुशोभित लाकडी पेटीमध्ये ठेवून देत. ही पद्धत फार खर्चाची होती. या पद्धतीने मेरेसांख राणीची ममी तयार करायला २७२ दिवस लागले. कमी खर्चाच्या शवसंलेपन प्रक्रियेत पिचकारीने शवाच्या गुदद्वारातून सेडार तेल भरले जाते व नॅट्रॉनचा उपयोग करून गुदद्वार बंद केले जाते. ठारावीक काळानंतर ते उघडले जाते, तेव्हा पोटातील सर्व अवयवांचे द्रवरूपात रूपांतर होऊन ते बाहेर फेकले जातात. या प्रक्रियेत पोट फाडावे लागत नाही. नॅट्रॉनमुळे मांस नष्ट होते व फक्त त्वचा व हाडे उरतात. शव मधामध्ये बुडवून ठेवण्याचीही पद्धत होती. सिकंदर बादशहाचे शव काचेच्या पेटीत मधामध्ये बुडवून लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते.
भारताच्या पूर्वेतिहासात राजस्थान, सिंध आणि बलुचिस्तानात उघड्यावर ठेवलेली मृत शरीरे बाहेरील उष्ण आणि कोरड्या वातावरणामुळे शुष्क झाल्याची नोंद मिळते. झाडाच्या फांदीवर लटकवलेली अगर घराच्या छपरावर ठेवलेली काही नवजात अर्भकांची सुरकुतलेली शरीरे आढळून आली आहेत. तसेच ज्या व्यक्तींना नकळत किंवा जाणूनबुजून आर्सेनिक (एक विषारी मूलद्रव्य) दिले गेले, अशा व्यक्तींचे मृतदेह कोरडे होण्यास वेळ लागत नाही. आर्सेनिकामुळे त्वचेखालील मृदू अवयव कोरडे होऊन त्वचा आणि हाडे एकत्र येत असल्यामुळे 'शवसंलेपन' ह्या क्रियेसाठी आर्सेनिक लेड सल्फाइड आणि पोटॅशियम कार्बोनेट ह्यांचे प्रवाही मिश्रण मृत शरीराच्या जांघेतील रोहिणीत अगर महारोहिणीमध्ये अंतःक्षेपित करण्याची पद्धतही प्रचलित आहे.
आधुनिक काळात १०% फॉर्मालीन व २०% ग्लिसरॉन (वा स्पिरिट) आणि ग्लिसरीनचे मिश्रण मृत व्यक्तीच्या मानेवर उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये अंतःक्षेपित करतात व त्याच वेळी डाव्या बाजूच्या रक्तवाहिनीमधून प्रवाही द्रव्य बाहेर शोषून घेतले जाते. या प्रक्रियेने शव सहा महिने टिकवता येते. त्याचप्रमाणे शव टिकवण्यासाठी बर्फाचा व शवागाराचा उपयोग केला जातो.
शवसंलेपन ही क्रिया केलेली मृत शरीरे विशेषतः वैद्यकीय महाविद्यालयांत शवविच्छेदनासाठी उपयुक्त ठरतात. तसेच परदेशात मृत पावलेल्या व्यक्तीचे शव अंत्यंसंस्कारासाठी स्वदेशी आणण्यापूर्वी तसेच शवावरील अंत्यंसंस्कार करण्यास फार वेळ लागणार असेल, तर शवसंलेपनाची क्रिया करावी लागते.
यंदे, विश्वास
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/14/2020