जेव्हा डॉक्टर एखाद्या रुग्णास तपासतो तेव्हा ही एक वैयक्तिक पातळीवरची बाब असते. एकूण डॉक्टरी उपचार हे जीवशास्त्रीय पातळीवरच असल्याने वैयक्तिक उपचाराचे स्वरुप जवळजवळ पूर्ण शारीरिक-मानसिकच असते. त्या रुग्णाचा तेवढा आजार संपला की झाले! पण अनेक आजारांची कारणे आणि उपायही केवळ वैयक्तिक किंवा शारीरिक पातळीवरचे नसतात. आजारांची कारणपरंपरा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक घटकांमध्ये गुंतलेली असते. उदा. लिंगसांसर्गिक आजारांच्या मागे 'जंतू' हे कारण आहे पण त्यामागे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक कारण परंपराही आहे. म्हणून लिंगसांसर्गिक आजार हटवायचे असतील तर या सगळयाच पातळयांवर प्रयत्न करावे लागतील. अशी उपाययोजना केवळ वैयक्तिक नसते, तर ती सामूहिक स्वरुपाची असते.
आजारांवर विचार आणि उपाययोजना करताना वैयक्तिक आणि केवळ जीवशास्त्रीय पातळीच्या पलीकडे जावे लागते. आरोग्यासाठी सामूहिक आणि अनेकपदरी विचार व कृती करणे यालाच 'सामाजिक आरोग्यशास्त्र' असे म्हणता येईल. यात अनेक उपविषय येतात.
सामाजिक आरोग्यशास्त्रात रोगप्रतिबंधक आणि आरोग्यवर्धक उपायांचा महत्त्वाचा घटक आहे. रोगप्रतिबंध म्हणजे रोग-आजार टाळणे. पण हे म्हणजे केवळ लसीकरण नाही. आयुर्वेदामध्ये आणि लोकपरंपरांमध्येही अनेक प्रतिबंधक आणि आरोग्यवर्धक उपाय अंतर्भूत आहेत. उदा. वात, पित्त, कफ प्रकृती विचारातून आणि आहारविहारातून अनेक आजार टाळता येतात अशी आयुर्वेदाची साधार मांडणी आहे. यातल्या अनेक गोष्टी सांस्कृतिक-सामाजिक जीवनात एकरूप होऊन गेल्या आहेत. उदा. लहान मुलांना अंगाला व टाळूला तेल चोळणे, डाळतांदूळ एकत्र शिजवणे इत्यादी. आधुनिक विज्ञानाने तर सार्वजनिक आरोग्यशास्त्रात क्रांती केली आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...