स्वाईन फ्लूमुळे संपूर्ण देशात एक घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तथापि, वेळेत व योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. आजवर आपण स्वाईन फ्लूमुळे किती रुग्ण दगावले हेच ऐकून घाबरतो पण बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या किती तरी पटीने अधिक आहे. त्यामुळे घाबरून न जाता फ्लू सदृश्य लक्षणे दिसताच ताबडतोब जवळच्या शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधणे क्रमप्राप्त आहे. सर्दी, ताप, खोकला झाल्यास आणि डॉक्टरांची औषधे घेऊनही बरे वाटले नाही तर लगेच टॅमीफ्लू गोळ्या घ्यायच्या अशी नवीन मार्गदर्शक तत्वे केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वीकारली आहेत. निदान होईपर्यंत दर दिवसाला दोन वेळा टॅमीफ्लू घेता येते. त्यामुळे स्वाईन फ्लूला घाबरण्याचे कारण नाही. शासनाकडे औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व त्या उपाययोजना शासनाने हाती घेतल्या आहेत. राज्यातील सर्व उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
स्वाईन फ्लू प्रतिबंध व नियंत्रणासाठी मुख्यत्वे खालील उपाय योजना राबविण्यात येत आहेत.
- फ्लू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण
- फ्लू सदृश्य रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार
- राज्यातील 128 उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना
- उपचार सुविधा असणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांना स्वाईन फ्लू उपचाराची मान्यता
- राज्यातील 4 शासकीय प्रयोगशाळांमार्फत मोफत निदान सुविधा
- रेलिगेअर आणि डॉ. लाल पॅथॉलॉजी लॅब तसेच इतर खाजगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी तज्ज्ञ समित्यांची स्थापना
- अन्न व औषध विभागामार्फत सर्व एक्स शेड्यूल धारक औषध दुकानांमध्ये ऑसेलटॅमीवीर उपलब्ध
- शासकीय आणि खाजगी डॉक्टरांच्या स्वाईन फ्लू कार्यशाळा
- फ्लू परिस्थितीचा दैनंदिन आढावा
- नागपूर येथील परिस्थितीचा केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीमार्फत आढावा आणि मार्गदर्शन
- फ्लू प्रतिबंधासाठी जनतेचे आरोग्य शिक्षण
स्वाईन फ्लू हा आजार इन्फ्ल्युएंझा ए एच 1 एन 1 या विषाणूपासून होतो. सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी ही या आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत. आजारी व्यक्तीच्या शिंकण्या-खोकण्यातून उडणाऱ्या थेंबावाटे हा आजार पसरतो.
सर्व साधारणपणे या आजाराचे स्वरुप हे सौम्य असते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या आजाराला न घाबरता हा आजार पसरु नये यासाठी खबरदारी घ्यावयाची गरज आहे.
अतिजोखमीच्या व्यक्ती- मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, दमा, फुप्फुस- मूत्रपिंडांचे आजार इतर आनुवंशिक आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये आणि गर्भवती मातांमध्ये हा आजार गंभीर रुप धारण करताना दिसतो. लठ्ठ व्यक्तींमध्येही गुंतागुंत आढळून येते.
इन्फ्ल्युएंझा टाळण्यासाठी
- वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवा.
- पौष्टिक आहार घ्या
- लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या अशा आरोग्यदायी घटकांचा आहारात वापर करा.
- पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
- भरपूर पाणी घ्या.
- शिंकताना, खोकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार विनविलंब सुरु करा. फ्लूवरील उपचार 48 तासांच्या आत सुरु झाल्यास ते अधिक गुणकारी ठरतात.
इन्फ्ल्युएंझा टाळण्यासाठी हे करु नका
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
- फ्लूची लक्षणे असतील तर हस्तांदोलन करु नका
- आपल्याला फ्लू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
फ्लू रुग्णाची घरगुती काळजी
बहुतांश फ्लू रुग्ण हे सौम्य स्वरुपाचे असतात. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे अशा फ्लू रुग्णांची घरी कशी काळजी घ्यावी, हे माहित असणे आवश्यक आहे.
- घर मोठे असेल तर रुग्णाकरिता वेगळी खोली निश्चित करावी.
- रुग्णाने शक्यतो बैठकीच्या खोलीत, ज्या ठिकाणी सर्व कुटूंबिय असतील तेथे येणे टाळावे.
- रुग्णाने स्वत: नाकावर साधा रुमाल बांधावा.
- रुग्णाची सेवा शक्यतो कुटूंबातील एकाच व्यक्तीने करावी.
- रुग्णाने घरात जर कोणी अति जोखमीचे आजार असणारे असतील तर त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये.
- घरात ब्लिच द्रावण तयार करावे. याचा उपयोग रुग्णाचा टेबल, खुर्ची, रुग्णाचा स्पर्श होतील असे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा.
- रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतस्तत: टाकू नयेत.
- रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात / ब्लिच द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत.
- रुग्णाचे अंथरुण पांघरुण टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत.
- रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ घ्यावेत.
- रुग्णाने धुम्रपान करु नये.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
- दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या कराव्यात तसेच गरम पाण्यात निलगिरी तेल / मेथॉल टाकून त्याची वाफ घ्यावी.
- ताप आणि फ्लूची इतर लक्षणे मावळल्यानंतर किमान 24 तासापर्यंत घरी रहावे.
- धाप लागणे, श्वास घेताना छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, ताप न उतरणे अशी लक्षणे आढळल्यास तसेच लहान मुलांमध्ये चिडचिड करणे, खाण्यास नकार, उलट्या अशी लक्षणे दिल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे. आकाश जगधने/संजय ओरके
माहिती स्रोत: महान्यूज, शनिवार, ०७ मार्च, २०१५.