वय आणि श्रमाच्या मानाने योग्य आहार मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे,पण हा हक्क प्रत्यक्षात उतरत नाही. भारतासारख्या देशांत निदान निम्मा समाज दारिद्रयरेषेखाली राहतो. कुपोषण हे या समाजाचे अंग बनलेले आहे. उरलेल्या समाजातील काही टक्के लोकांना अतिपोषणामुळे येणारे आजार जडतात. कुपोषण म्हणजे पोषणाची कमतरता किंवा अतिरेक. आपल्या देशाच्या संदर्भात कुपोषण म्हणजे बहुशः अन्नाची कमतरता हाच अर्थ घेतला जातो. कुपोषणाचे (कमतरता) दोन प्रकार आणखी सांगता येतील. एक म्हणजे विशिष्ट अन्नघटकांची उणीव (उदा. 'अ'जीवनसत्त्वाचा अभाव) आणि दुसरा म्हणजे सर्वच प्रकारचे अन्न कमी पडणे. या दोन्ही प्रकारचे कुपोषण दारिद्रयरेषेखाली मोठया प्रमाणात दिसते, पण त्यातल्या त्यात आहार कमी पडणे हाच प्रकार मुख्य आणि महत्त्वाचा आहे. अन्न कमी पडल्यामुळे होणारे कुपोषण.देशातले एकूण अन्नधान्य उत्पादन आता तरी आपल्या सध्याच्या लोकसंख्येस पुरेल असे आहे.एखाद्या वर्षी उत्पादन कमी पडले तरी मागील वर्षाच्या साठयातून काम निभवता येते.
सर्वसाधारणपणे धान्योत्पादन पुरेसे आहे, पण तेलबियांचे उत्पादन कमी पडते, तसेच दूधउत्पादन शहरांचा हिशेब करता पुरेल इतके आहे, पण दरडोई पुरवठा अजूनही पुरेसा नसल्याने बहुसंख्य समाजाला (विशेषतः खेडयात) दूध मिळणे अवघड आहे. पण समजा अन्नधान्य उत्पादन पुरेसे असले तरी सर्व लोकांना ते दोन्ही वेळ पुरेसे का मिळत नाही ? याचे कारण श्रमजीवी लोकांच्या हातात पुरेशी क्रयशक्ती नसणे. याची कारणे व्यापक सामाजिक-आर्थिक दुरवस्थेत आहेत.
जेथे घरात आजचा दिवस घालवण्यापुरतीही क्रयशक्ती नसते अशा घरात जेवढे तुटपुंजे आहे त्यात आधी पुरुष जेवतो, मग मुलगा, मग मायलेकी अशा क्रमाने खायला मिळते. खरे तर स्त्रिया काही कमी काम करत नाहीत. ग्रामीण कुटुंबात पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत स्त्रिया अविश्रांत काम करतात. शहरातील नोकरदार स्त्रीचीही अशीच स्थिती असते. एकूण श्रमाचा निम्मा वाटा तरी स्त्रियांचा असतो. पुरुष 'कर्ता' असतो ही पुरुषप्रधान समाजाने लादलेली समजूत आहे. अशा परिस्थितीत ब-याच वेळा घरची स्त्री शिळेपाके खाऊन किंवा उपाशी झोपते. स्त्रिया, वृध्द यांचे हाल असतात. कुपोषणाचे अनेक प्रकारचे आजार अगदी घरोघरी दिसतात. निम्म्या लोकसंख्येत कुपोषणाच्या काठाकाठाने चाललेले जीवन असते. एखादा आजार, आर्थिक संकट आले, की ही काठावरची शरीरे लगेच कुपोषणाच्या खाईत पडतात. पाच वर्षाखालील अर्धा टक्का मुले अतिकुपोषित (उघड) आणि सुमारे 40 टक्के कुपोषणाच्या सीमरेषेवर अशी आकडेवारी आहे. आदिवासी, दलित, मागासवर्गीय यांमध्ये तर हे प्रमाण जास्त आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व ...
महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार व्दारा व ...
आई’ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वात्सल्याचा झरा.....
लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये मानव वंशा...