<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; ">हा दिवस १४ मे किंवा दुस-या आठवड्यातील शेवटच्या दिवशी साजरा करतात.</p> <p style="text-align: justify; ">पृथ्वीच्या कलण्यामुळे ऋतू बदलतात आणि उत्तरेकडील गोठवणा-या थंडीपासून सुटण्यासाठी अनेक प्रकारचे पक्षी हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून, आपल्याकडे म्हणजे कटिबंधीय उष्ण प्रदेशात साधारण २ महिन्यांसाठी येतात.</p> <h3>मूळ संकल्पना व सुरुवात</h3> <p style="text-align: justify; ">जगातील सर्व पक्षी एकाच दिवशी अर्थातच स्थलांतर करीत नाहीत. हा दिवस, २००६ सालापासून, मे महिन्याच्या दुस-या आठवड्याच्या शेवटचा दिवशी साजरा केला जात असतो. स्थलांतरीत पक्ष्यांना अधिवास आणि संरक्षण पुरवणे या मूळ संकल्पनांचा प्रसार आणि जाणीव होणे ही बाब येथे महत्त्वाची ठरते.</p> <h3>अधिक माहिती</h3> <p style="text-align: justify; ">स्थलांतरीत पक्ष्यांसंबंधीची माहिती भूगोलाच्या पुस्तकांतही आदळते. आर्क्टिक टर्नसारखे पक्षी १० हजार किलोमीटर्स अंतरावर जातात. आपल्याकडे रोहित (फ्लेमिंगो), सायबेरियन क्रेन (सारस) अशासारखे मोठे पक्षी येतात. भारताच्याही हिमालयीन राज्यातील थंडी टाळण्यासाठी काही पक्षी इथे येतात. अशा सर्व लहान मोठ्या पक्ष्यांना योग्य अधिवास पुरवणे व या काळात त्यांना संरक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, त्यांचा अभ्यास करण्याची वर्षातील ही एकमेव संधी असते. स्थलांतरीत पक्ष्यांची गणती, त्यांचा माग ठेवण्यासाठी सांकेतिक वाळा (रिंग) घालणे इ. स्थलांतरित पक्ष्यांच्या निरीक्षण व नोंदी ठेवून त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करणे, त्यांना शिका-यापासून वाचविणे, त्यांचे रक्षण करणे तसेच त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती आणि त्यांचे महत्व सांगणे अशा गोष्टी आपण या दिनानिमित्त करू शकतो.</p> <p style="text-align: justify; "> </p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६</p> </div>