पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाचे महत्त्व अधोरेखित आहेत. हे नव्याने सांगणे नको. सध्याच्या काळात जागतिक पातळीवर हवामानातील बदल आणि वैश्विक उष्णतेत होणारी वाढ या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचार मंथन होत आहे. त्यानुसार होणारी तीव्रता व होणारा परिणाम कमी करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून शासन पातळीवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
राज्याचे वित्त व नियोजन तथा वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनात राज्यात 1 जुलै रोजी सर्वत्र 2 कोटी वृक्ष लागवड करण्याचा महासंकल्प साकारत आहे. त्याबद्दलचा हा लेख....
वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ (Global Warming), हवामानातील बदल (Climatic changes) याबाबत जागतिकस्तरावर मोठ्या प्रमाणात विचारमंथन सुरू झाले आहे. यांची तीव्रता व परिणामकारकता कमी करण्याचा भाग म्हणून शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून सन 2016 मधील पावसाळ्यात वन महोत्सव कालावधीमध्ये 01 जुलै 2016 रोजी, या एकाच दिवशी किमान 02 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून ही एक लोकचळवळ आहे. भावी पिढीला प्राणवायू जर हवा असेल तर आजच्या प्रत्येक मनुष्याने एक तरी वृक्ष लावलाच पाहिजे. अन्यथा भविष्यात होणारा ऱ्हासास आपण जबाबदार आहोत हे विसरुन चालणार नाही. आज आपण वृक्ष लागवड केली तरच भावी पिढी आपणांस माफ करेल. राज्याच्या ज्या भागात कमी वृक्ष आहेत तेथील पाण्याचे दुर्भिक्ष आपण पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे हे नव्याने सांगणे नको.
वनमहोत्सवातील वृक्ष लागवड करण्यास वने व सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येईल. याचा लाभ सर्व संबंधित विभागांनी घ्यावा. जिथे अडचण असेल तिथे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत रोपे देण्याचा प्रयत्नही होईल. साधारणत: सहजरित्या व कमी पाण्यावर जगणारी, लवकर वाढ असणारी झाडे लावणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने आंबा, चिंच, आवळा, जांभूळ, करंज, कवठ, काजू, फणस, वड, पिंपळ, कडूलिंब, पळस, क्यॉशिया, रेन ट्री, गुलमोहर, चाफा ही झाडे अपेक्षित आहेत.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील माप दंडानुसार भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादन/वनीकरण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगतीशील आणि विकासामध्ये अग्रगण्य राज्य आहे. राज्यातील वृक्ष आवरणाचे प्रमाण सर्वसाधारणपणे 20% आहे. जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदललेले निसर्ग आणि ऋतुचक्र, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ या माध्यमातून गेल्या काही वर्षात निसर्ग आपल्याला जाणीव करुन देत आहे. पर्यावरणाचे असंतुलन, असमतोल, वाढते प्रदूषण आणि त्यातून होत असलेले पर्यावरणीय बदल ही यामागील महत्त्वाची कारणे आहेत. मानवी जीवनास या पर्यावरणीय बदलास सामोरे जावे लागत आहे याचे भान ठेवावे.
त्यामुळे या निमित्ताने एकच आवाहन करावेसे वाटते की, राज्यशासन राबवित असलेल्या 2 कोटी वृक्ष लागवडीच्या या उपक्रमात राज्यातील प्रत्येकाने आपापल्या परीने सहभागी व्हावे आणि पर्यावरणाच्या महत्त्वपूर्ण अशा या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा. आता एकच लक्ष 1 जुलैला 2 कोटी वृक्ष.
लेखक - डॉ.राजू पाटोदकर
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/4/2020