অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

2 कोटी वृक्ष लोकसहभागाने वनमहोत्सव

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाचे महत्त्व अधोरेखित आहेत. हे नव्याने सांगणे नको. सध्याच्या काळात जागतिक पातळीवर हवामानातील बदल आणि वैश्विक उष्णतेत होणारी वाढ या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचार मंथन होत आहे. त्यानुसार होणारी तीव्रता व होणारा परिणाम कमी करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून शासन पातळीवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.

राज्याचे वित्त व नियोजन तथा वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनात राज्यात 1 जुलै रोजी सर्वत्र 2 कोटी वृक्ष लागवड करण्याचा महासंकल्प साकारत आहे. त्याबद्दलचा हा लेख....

वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ (Global Warming), हवामानातील बदल (Climatic changes) याबाबत जागतिकस्तरावर मोठ्या प्रमाणात विचारमंथन सुरू झाले आहे. यांची तीव्रता व परिणामकारकता कमी करण्याचा भाग म्हणून शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून सन 2016 मधील पावसाळ्यात वन महोत्सव कालावधीमध्ये 01 जुलै 2016 रोजी, या एकाच दिवशी किमान 02 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून ही एक लोकचळवळ आहे. भावी पिढीला प्राणवायू जर हवा असेल तर आजच्या प्रत्येक मनुष्याने एक तरी वृक्ष लावलाच पाहिजे. अन्यथा भविष्यात होणारा ऱ्हासास आपण जबाबदार आहोत हे विसरुन चालणार नाही. आज आपण वृक्ष लागवड केली तरच भावी पिढी आपणांस माफ करेल. राज्याच्या ज्या भागात कमी वृक्ष आहेत तेथील पाण्याचे दुर्भिक्ष आपण पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे हे नव्याने सांगणे नको.

वृक्ष लागवडीसाठी झाडे



वनमहोत्सवातील वृक्ष लागवड करण्यास वने व सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येईल. याचा लाभ सर्व संबंधित विभागांनी घ्यावा. जिथे अडचण असेल तिथे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत रोपे देण्याचा प्रयत्नही होईल. साधारणत: सहजरित्या व कमी पाण्यावर जगणारी, लवकर वाढ असणारी झाडे लावणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने आंबा, चिंच, आवळा, जांभूळ, करंज, कवठ, काजू, फणस, वड, पिंपळ, कडूलिंब, पळस, क्यॉशिया, रेन ट्री, गुलमोहर, चाफा ही झाडे अपेक्षित आहेत.

देखभाल व संगोपन



या मोहिमेंतर्गत लागवड केलेल्या झाडांचे, रोपांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान 80% ते 90% पेक्षा अधिक राहावे यासाठी देखील शासनाने काळजी घेतली आहे. किमान पहिल्या 4 वर्षापर्यंतच्या खबरदारीसाठी असलेल्या कामाचे सनियंत्रण, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर गठीत केलेल्या समित्याद्वारे होईल. तसेच जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरील समित्या पालकमंत्री, संबंधित तालुक्याचे आमदार आणि ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखालील समित्या वृक्षारोपणाच्या संरक्षणासाठी त्यांच्या क्षेत्रामधील जनतेला आवाहन करुन त्यांना या कार्यक्रमात सामावून घेण्याबाबत सहकार्य मिळविले जाईल. यासाठी देखील सर्व संबंधितांनी पुढाकार घ्यावा. लागवड झालेल्या झाडांचे संगोपन करावे व ही झाडे जगवावी.

20 विभागांचा सहभाग



महत्त्वाकांक्षी अशा या उपक्रमात राज्य शासनाच्या महसूल, पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य व्यवसाय, नगरविकास, सहकार व पणन, सांस्कृतिक कार्य, उच्च व तंत्र शिक्षण, गृह, परिवहन, उद्योग, ऊर्जा, विधी व न्याय, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, जलसंधारण, शालेय शिक्षण व क्रीडा, आदिवासी विकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, कृषी या 20 विभागांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. या विभागामार्फत अत्यंत नियोजनबध्दरितीने वृक्ष लागवडीसाठीचे कार्य सुरु असून त्यावर दैनंदिन सनियंत्रण केले जात आहे. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी स्वत: या उपक्रमावर लक्ष ठेऊन आहेत.

कोकणात 25 लाख वृक्षांची लागवड



कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात मिळून 25 लाखा पेक्षा अधिक वृक्ष लागवड 1 जुलैला करण्यात येईल. यातील 10 हजार वृक्ष छत्रपती शिवरायांच्या रायगड किल्ल्यावर लावले जातील, असे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी नुकतेच मंत्रीमहोदयांना आश्वासित केले. मात्र हा उपक्रम अधिक यशस्वी होण्यासाठी लोकसहभागाची अत्यंत आवश्यकता आहे. या कार्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबर स्वयंसेवी व अशासकीय संस्था, खाजगी उद्योजक, उद्योजकता सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत उपक्रम तसेच सहकारी संस्था, विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारी मंडळे व संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महत्त्वाचे म्हणजे लोकप्रतिनिधीचा यातील सक्रिय सहभाग त्यामुळेच हे शिवधनुष्य सहज उचलले जाऊ शकेल असे वाटते. या सर्वांच्या मदतीने हे कार्य सुरु आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील माप दंडानुसार भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादन/वनीकरण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगतीशील आणि विकासामध्ये अग्रगण्य राज्य आहे. राज्यातील वृक्ष आवरणाचे प्रमाण सर्वसाधारणपणे 20% आहे. जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदललेले निसर्ग आणि ऋतुचक्र, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ या माध्यमातून गेल्या काही वर्षात निसर्ग आपल्याला जाणीव करुन देत आहे. पर्यावरणाचे असंतुलन, असमतोल, वाढते प्रदूषण आणि त्यातून होत असलेले पर्यावरणीय बदल ही यामागील महत्त्वाची कारणे आहेत. मानवी जीवनास या पर्यावरणीय बदलास सामोरे जावे लागत आहे याचे भान ठेवावे.

त्यामुळे या निमित्ताने एकच आवाहन करावेसे वाटते की, राज्यशासन राबवित असलेल्या 2 कोटी वृक्ष लागवडीच्या या उपक्रमात राज्यातील प्रत्येकाने आपापल्या परीने सहभागी व्हावे आणि पर्यावरणाच्या महत्त्वपूर्ण अशा या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा. आता एकच लक्ष 1 जुलैला 2 कोटी वृक्ष.

लेखक - डॉ.राजू पाटोदकर
स्त्रोत : महान्युज

 

अंतिम सुधारित : 7/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate