অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भूस्खलनाचे आपत्ती व्यवस्थापन

भूस्खलनाचे आपत्ती व्यवस्थापन

उत्तराखंडमध्ये 2013 व माळीणमध्ये 2014 मध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे, दरडी कोसळल्याने तसेच जमीन खचल्याने भाविक व नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. अचानक आलेल्या या आपत्तींमुळे भाविक व नागरिक गोंधळून जाणे स्वाभाविक आहे. मात्र, अशी परिस्थिती येऊच नये व जर अशी आपत्ती आली तर त्यातून कसा मार्ग काढायचा याबद्दलची ही माहिती…
उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रिनाथ, गंगोत्री हा परिसर अत्यंत डोंगराळ असा प्रदेश आहे. पूर्वी या परिसरात दाट झाडी होती. पर्यावरणाचा समतोल बऱ्यापैकी राखला गेला होता. भाविकांचे जथ्थे‍च्या जथ्थे‍ पूर्वी इतक्‍या मोठ्या प्रमाणात येत नव्हते. मात्र, अलीकडे ट्रॅव्हल्स कंपन्या विविध पॅकेज टूर आयोजित करत असल्याने धार्मिक पर्यटनाकडे लोक आकर्षिले जाऊ लागले आहेत. पर्यटनाच्या नावाखाली चांगले रस्ते तयार झाले. मोठमोठी हॉटेल्स, लॉजेस या परिसरात उभारली गेली आहेत. छोटीमोठी धरणे, पाण्याच्या योजना सुरू झाल्या आहेत. हे सर्व करीत असताना तेथे सोयी-सुविधा देण्याच्या नावाखाली अनेक प्रकल्प उभे करण्यात आले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. डोंगर फोडून बांधकामे करण्यात आली. खोदकाम मोठ्या प्रमाणात झाल्याने जमीन भुसभुशीत झाली. त्यामुळे भूस्खलन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. डोंगरमाथ्यावर, नदीकाठी बांधकामामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणे साहजिकच आहे. त्यामुळे ढगफुटी अथवा जोरदार पावसामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून रस्ते बंद झाले. इमारती कोसळल्या आणि मोठी जीवित व वित्तहानी झाली. नैसर्गिक आपत्ती मग ती कोणतीही असो, त्यामुळे वित्त व जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होते.
उत्तराखंडमध्ये मोठी आपत्ती येऊन संपूर्ण देश हादरला. केदारनाथ, बद्रिनाथ, गंगोत्री याक्षेत्रात ढगफुटी होऊन महाप्रलयामुळे प्रचंड पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर आले. मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. दरडी कोसळल्या. पुरात गावे नष्ट झाली. इमारती कोसळल्या, हजारो लोक मृत्यमुखी पडले. हजारो जखमी झाले, हजारो बेपत्ता आहेत. या आपत्तीची कारणे अनेक आहेत. त्यापैकीच मोठ्या प्रमाणात दरडी कोसळणे आणि भूस्खलन होणे ही होय. या दोन्ही घटना पावसाशी निगडित आहेत. पाऊस पडल्यास जमिनीत व जमिनीवर पाण्याचा प्रचंड भार व दाब तयार होतो. ओहोटी लागल्यावर या पाण्याचा वेगाने निचरा होतो. याशिवाय हे पाणी अतिरिक्त दाबामुळे खोलवर झिरपते. विदारित खडक (मुरुम, माती) व मूळ खडक यांच्या संपर्क रेषेपर्यंत पोचते. तेथून खालचा खडक एकसंध असल्याने पाझर घटतो. परिणामी हे पाणी या संपर्करेषेत राहिल्याने घर्षण कमी होते आणि संपूर्ण वरचा भाग खाली सरकून भूस्खलन होते. अशी शास्त्रीय कारणमीमांसा आहे. मुळातच पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्यापेक्षा पृष्ठभागाखालून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने प्रचंड प्रमाणात भूस्खलन होते. पाणी माती आपल्याबरोबर वाहून नेते. त्यामुळे डोंगराखाली पोकळ्या तयार होतात. कडा खचतात. त्यामध्ये पाणी अधिक प्रमाणात मुरते व त्या रुंदावतात आणि स्थिरावतात. पुन्हा मोठा पाऊस झाल्यास मात्र याच भेगा पाणी खोलवर मुरण्यास मदत करतात आणि मोठ्या भूस्खलनास कारणीभूत ठरू शकतात. निसर्गामध्ये भूस्तर खाली आणण्याचे काम सातत्याने चालू असतेच. अनेक वर्षे विदारणाच्या प्रक्रियेतून तयार झालेला अवसाद साठून राहिलेला असतो. अतिवृष्टीमुळे त्यांच्या क्षरणाच्या विस्थापनाच्या प्रक्रियांना गती मिळते. त्यामुळे या घडामोडीचे आकारमान वाढते. म्हणजेच ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळेच काल स्थीर वाटणारे डोंगर आज खचलेले दिसतात.
सर्वसाधारणपणे डोंगरमाथ्यावरील भूभागाचे विघटन होऊन त्याची माती पावसाच्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर दगडगोटे घेऊन येते. याशिवाय डोंगराच्या वरच्या भागाला मोठ्या प्रमाणावर पूर्व-पश्‍चिम अशा भेगा पडतात. त्यामुळे डोंगरमाथे कमकुवत होतात. डोंगरावरची माती मोठ्या प्रमाणात खाली आल्यामुळे नैसर्गिक नाले, नद्या, माती-दगड-धोंडे यांनी भरतात. परिणामी पाण्याच्या नैसर्गिक प्रवासाची दिशा बदलते. नेमके असेच उत्तराखंडमध्ये झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती कोसळली.
उत्तराखंडमध्ये झालेली वित्त आणि मनुष्यहानी कमी करणे तसेच लोकांपर्यंत तातडीने मदत पोचविण्यासाठी पूर परिस्थितीमध्ये ठोस निर्णय घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी करणे, या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शोध, बचाव आणि मदतकार्य, तसेच पुरामुळे संकटात सापडलेल्यांना मदत करून वाचविणे यासाठी बिगरसरकारी संघटना आणि समुदाय यांची भूमिका अत्यंत प्रभावी ठरते. यासाठी अशा संघटना, समुदायांची स्थानिक पातळीवर बांधणी करणे अत्यंत हितावह ठरते. पुरामुळे प्रभावित झालेल्यांना तातडीने चिकित्सा साह्य उपलब्ध करून देणे, तसेच पुरानंतर येणारी महामारी-रोगराई थोपविण्यासाठी उपाययोजना करणे हे पूरपरिस्थितीचा सामना करण्यासारखे आहे. समन्वयाचा दृष्टिकोन आणि त्यानुसार प्रयत्न करण्यासाठी तांत्रिक कारणे आणि ठोस कार्यवाहीच्या हेतूने घटना नियंत्रण प्रणालीची आवश्‍यकता आहे.
पुराची पूर्वसूचना आणि सर्वांना सावध करण्याच्या प्रणालीचा विस्तार आणि तिचे आधुनिकीकरण करणे, या हेतूने अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. शैक्षणिक संस्थांच्या पाठ्यक्रमामध्ये पूरनियंत्रण व्यवस्थापनाबाबत बदल व अंतर्भाव करणे, पुनर्निरीक्षण हेतूने जलाशय शोधणे, त्या पूर क्षेत्रातील इमारतींना भविष्यात सुरक्षितता प्रदान करणे, तसेच भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या इमारतींना पुरापासून सुरक्षित बनविण्यासाठी बिल्डिंग बायलॉज (इमारत बांधकाम नियमावली) मध्ये सुधारणा करणे, विस्तृत परियोजना अहवाल तयार करणे, तसेच राष्ट्रीय पूर मदतकार्य प्रशासन परियोजना स्वीकृत करणे आवश्‍यक आहे. नद्यांमधील पाण्याच्या विसर्गात असणारे अडथळे जाणणे व ते पुन्हा नद्यांमध्ये वाहून गेल्याने पूरपरिस्थिती त्वरित गंभीर होऊ शकते. अशा वेळी सर्वांना सावधान करण्यासाठी तांत्रिक विभागीय समिती स्थापना करणे, केंद्रीय मंत्रालयातून तसेच त्यांच्या विभागातून आणि राज्य सरकारची पूरनियंत्रण योजना तयार करणे, क्‍लोज कॉन्टअर-मॅपस, डिजिटल एलिवेशन मॉडेल आणि पुराच्या धोक्‍याची मानचित्रे तयार करणे आवश्‍यक आहे.
वेटलॅण्डर्स, तलाव किंवा नैसर्गिक सखल प्रदेशात रिक्‍लेमेशन (भराव घालणे) ची कामे करण्यास प्रतिबंध करण्याचा कायदा, नियम तयार करणे गरजेचे आहे. प्राधान्याने करावयाची पूर संरक्षणाची कामे, तसेच पुरातील संकटातून सुटका करण्यासाठी केली जाणारी कार्यवाही सक्षम करणे, पूरपरिस्थितीतील निवारे (फ्लड शेल्टर्स) निर्माण करणे, आंतरराज्य नद्यांवर असलेल्या धरणांची संयुक्त प्रशासकीय तांत्रिक यंत्रणा निर्माण करणेही आवश्‍यक आहे.
पुरामुळे संकटात सापडणाऱ्या क्षेत्रात जलसंचय प्रबंधन (कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट) त्याचबरोबर वनरोपण योजनांचे नियोजन मान्सूनपूर्व आणि मान्सूनपश्‍चात बांधबंधारे यांची पुनर्बांधणी करणे, त्याचबरोबर पायाभूत सुविधा वापरून उपाययोजना करणे व त्यांचे निरीक्षण करणे आवश्‍यक असून पूरपरिस्थितीची पूर्वसूचना आणि सावधानतेच्या सूचना देणारा नेटवर्क आणि डिसिजन सपोर्ट सिस्टिम्सचा विस्तार आणि त्याचे आधुनिकीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
या काही नियोजनाच्या बाबी पूर्णत्वास गेल्यास पुरासारख्या आपत्तीला तोंड देण्यास आपण सज्ज राहू. उत्तराखंडसारखी परिस्थिती देशातील अनेक भागांत होऊ शकते. तेथील भौगोलिक रचना, हवामानातील बदल, मानवाने केलेले अतिक्रमण, वृक्षतोड, डोंगर नष्ट करून इमारती उभारणे अशा अनेक कारणांमुळे आपत्ती येऊ शकते. म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन अधिक सुसज्ज असणे गरजेचे आहे.
आपत्तीपूर्व जनतने काही बाबींचे पालन केले पाहिजे ते पुढील प्रमाणे -

आपत्तीपूर्व काळजी

1. ज्यावेळी आपण दूरच्या धार्मिक स्थळी जात असतो त्या वेळी आपण कोठे जाणार, कुठे थांबणार, कुठल्या धर्मशाळेत, लॉज-हॉटेल, होस्टेलमध्ये अथवा मंदिरात व्यवस्था केली ते प्रारंभीच जाणून घेणे गरजेचे आहे. 
2. टूर्स आणि ट्रॅव्हल्सने जात असताना सोबत असणारा गाईड, वाहनचालक यांना त्या भूप्रदेशाची व्यवस्थित माहिती असल्याबद्दल खात्री करून घेणे आवश्‍यक आहे. 
3. अशा ठिकाणी जाताना ट्रॅव्हल्सच्या कंपन्यांनी भाविक/प्रवाशांची नावे, पत्ता, दूरध्वनी/मोबाईल क्रमांक यांची नोंद व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. 
4. आपत्कालीन परिस्थिती केव्हाही निर्माण होऊ शकते. तेव्हा सोबत जास्तीचे अन्नधान्य, कपडालत्ता, औषधे, जास्तीचे पैसे जवळ ठेवणे आवश्‍यक आहे. 
5. पावसाळ्याच्या दरम्यान जाणार असाल तर रेनकोट, छत्री, बॅटरी, मेणबत्ती अशा वस्तू सोबत ठेवणे आवश्‍यक आहे. 
6. आपण ज्या भूप्रदेशात जाणार आहोत तेथे मोबाईल, दूरध्वनी यंत्रणा कार्यरत आहे, त्याची खात्री ट्रॅव्हल्स कंपनीकडून केली पाहिजे. त्यासाठी एखादे वेगळे सिमकार्ड, जास्तीची मोबाईल बॅटरी-चार्जर सोबत ठेवणे गरजेचे आहे. ज्यांना शक्‍य आहे त्यांनी सोबत क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, लॅपटॉप, रेडीओ, फ्लॅश लाईट सोबत नेणे गरजेचे आहे. 
7. आपला टूर किती दिवसांचा, दररोज कोणकोणती ठिकाणे पाहणार, जाण्याचा मार्ग यांची माहिती घरच्यांना देणे गरजेचे आहे. 
8. आपण ज्या ट्रॅव्हल्सने जाणार आहोत त्या ट्रॅव्हल्सची माहिती, पत्ता, दूरध्वनी क्रमांक घरच्यांकडे ठेवणे आवश्‍यक आहे. 
9. प्रवासात सकाळी, दुपारी आणि रात्री झोपण्यापूर्वी घरच्यांना दूरध्वनी/मोबाईलद्वारे आपली खुशाली कळविणे आवश्‍यक आहे. 
10. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढील मार्ग सुरक्षित आहे ना, दरड अथवा भूस्खलन झाले नाही ना, अतिवृष्टी होऊन नद्यांना पूर नाही ना, याची खात्री करून पुढे मार्गक्रमण करणे आवश्‍यक आहे. 
11. नदीला पाणी असेल तर वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करून धोका पत्करू नये. 
12. प्रवासात वाहनचालकाची पूर्ण झोप होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आपत्तीनंतरची काळजी

1. ढगफुटी अथवा मोठा पाऊस आल्यामुळे दरडी कोसळतात. डोंगर खाली येतो. मोठ्या प्रमाणात दगड-माती खाली येते. तेव्हा डोंगराच्या पायथ्याशी थांबू नका. 
2. प्रचंड पावसामुळे नदीला पूर येतो. तेव्हा नदीकाठच्या हॉटेलात, घरात, मंदिरात, लॉजवर न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी अथवा उंचावर थांबावे. 
3. पावसामुळे रस्त्याला तडे जातात. पूल वाहून जातात, रस्त्यावर दगड, माती मोठ्या प्रमाणात येते तेव्हा आहे तेथेच थांबून मदतीची वाट पाहा. वाहन पुढे नेऊ नका. 
4. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित आहे ना, कुठलीही आपत्ती नाही ना, हे पाहिले पाहिजे. 
5. आपण जेथे थांबलो त्या ठिकाणी रेडीओ, टीव्हीवरील बातम्यांकडे लक्ष ठेवून असले पाहिजे. त्याचबरोबर हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत. 
6. प्रचंड प्रलयामुळे रस्ते वाहतूक कोलमडते, वीज जाते, मोबाईल टॉवर उद्‌ध्वस्त होतात. फोन लागत नाहीत, अशा वेळी धीराने संकटाशी सामना करा. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने उभारलेल्या मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या. 
7. अशा आपत्तीच्या काळात लुटालूट होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी मोठ्या संख्येने एकत्रितपणे व ग्रुपने राहावे. 
8. औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी मिळण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या मदत केंद्राच्या संपर्कात राहावे. 
9. आपत्तीप्रवण क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी लष्कराचे जवान मदत करीत असतात. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मदत करीत असतात तेव्हा त्यांना सहकार्य करून त्यांची मदत घ्यावी. 
10. अशा आपत्तीच्या वेळी स्वत:च्या काळजीबरोबरच आपल्या सहकाऱ्यांचीही काळजी घेतली पाहिजे. पैसे नसल्यास, आजारी पडल्यास तातडीने सहकार्य केले पाहिजे. 
11. ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपल्या टूर्समार्फत गेलेल्या पर्यटकांची माहिती, नावे आपत्ती व्यवस्थापन केंद्र, तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा पोलिस यंत्रणेला द्यावी. 
12. आपल्या ट्रॅव्हल्सने गेलेले प्रवासी कोठे आहेत, त्यांची सद्य:स्थिती काय आहे, ते सुरक्षित आहेत ना, याची माहिती प्रवाशांच्या नातेवाइकांना देऊन त्यांना आधार द्यावा. 
13. नातेवाईकांनी मदत कक्षाशी संपर्कात राहून तातडीने सुरू केलेल्या हेल्पलाइनवरून संपर्क साधण्याचा, माहिती घेण्याचा प्रयत्न करावा. 
14. नातेवाईकांनी शासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य केले पाहिजे. शांतता राखून संयम पाळला पाहिजे. 
15. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी, जागरूक नागरिकांनी अशा काळात मदत करताना प्रशासन, लष्कराबरोबर त्यांच्या सूचनेनुसार काम केले पाहिजे. शांतता, शिस्त पाळून सेवाभावी वृत्तीने मदतकार्यात सहभागी झाले पाहिजे. 
16. प्रसारमाध्यमांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सत्य, अचूक बातम्या, वृत्तान्त देऊन नागरिकांना माहिती पोचवली पाहिजे. 
17. आपत्ती काळात अनेक अडचणी येतात. मदत लवकर पोचू शकत नाही. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कुणावर दोषारोपण करणे, चुकीचे निष्कर्ष काढणे व अफवा पसरवणे टाळावे.

 

-आपत्कालीन वृत्त कक्ष जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार

माहिती स्रोत: महान्यूज, सोमवार, २९ जून, २०१५

अंतिम सुधारित : 1/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate