অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परभणी जिल्ह्यातील जननी सुरक्षा अभियान

परभणी जिल्ह्यातील जननी सुरक्षा अभियान


आठ ते दहा वर्षांपूर्वी महिलांची प्रसूती रुग्णालयाऐवजी घरी दायीच्या हाताने होत होती. त्यामुळे प्रसूतीदरम्यान महिलांचे मृत्यू होत होते. मात्र शासनाने जननी सुरक्षा योजना राबविल्याने महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात येऊ लागल्या. परिणामी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती होत असल्यामुळे माता मृत्यूच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. 

नागरिकांच्या आरोग्याला शासनाने विशेष प्राधान्य दिले आहे. त्यातच माता मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रत्येक प्रसुती शासकीय संस्थेतच झाली पाहिजे, यासाठी शासन स्तरावरून महिलांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. परभणी जिल्ह्यातही जननी सुरक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. शासनाने जिल्हा, ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध करून दिल्याने तसेच आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आल्याने प्रसूतीदरम्यान मातांच्या मृत्यूच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. 

जननी सुरक्षा योजनेद्वारे रुग्णालयात प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आदी कुशल व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे माता मृत्यू व नवजात अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी उपयोग होत आहे. तसेच रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील महिलांना 700 रुपये तर शहरी भागातील महिलांना 600 रुपये अनुदान देण्यात येते. शासनाच्या नावीण्यपूर्ण योजनेमुळे ग्रामीण व शहरी भागातील महिला प्रसूती व उपचारासाठी रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील माता मृत्यूच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. 

जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत प्रसूतीसाठी वाहनाची व्यवस्था, औषधी, रक्त आदी रुग्णालयात मोफत उपलब्ध करून देण्यात येते. आजारी बालकांवर तीस दिवसांपर्यंत शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतात. परभणी येथील जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिकांसह यंत्रसामुग्री उपलब्ध असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील महिला प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणावर येथे येत आहेत. 

स्त्रियांसाठी आई होण्यासारखा आनंद व अभिमानाचा दुसरा क्षण असूच शकत नाही. गरोदरपणात स्त्रियांनी आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी तसेच प्रसूती चांगल्या प्रकारे होण्यासाठी व बाळ सुरक्षित जन्माला येण्यासाठी सकस व समतोल आहार, वेळेवर झोप, मन आनंदी ठेवावे. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा आहारामध्ये नियमित वापर करावा, असे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री देशपांडे यांनी सांगितले. 

मातृत्व हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. त्यामुळे गरोदरपणात तिने व तिच्या कुटुंबीयांनी योग्य ती काळजी घ्यावयास हवी. गरोदरपणातील प्रत्येक महिन्यात तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या तसेच इतर औषधी वेळच्या वेळी घेणे आवश्यक आहे. केवळ औषधोपचार करूनच प्रश्न सुटत नाही तर गरोदपणामध्ये योग्य आहार आणि संतुलित व्यायामही आवश्यक आहे, असे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना धानोरकर यांनी सांगितले. 

गरोदर स्त्रियांमध्ये मातेच्या आहाराला प्रथम प्राधान्य देणे एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मला वाटते. मातेच्या आहारामध्ये सर्व पाच घटकांचा समावेश असावा. त्यात प्रोटिन्स, काब्रोहायड्रेट, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि फॅट या पाच घटकांचा संतुलित वापर होणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे आपल्याकडे गरोदर राहिल्यानंतरच महिलेच्या आहाराकडे लक्ष दिले जाते. काही प्रमाणात आपल्या देशात सुपर बेबीची संकल्पना रुजते आहे. ज्यामध्ये त्या स्त्रीच्या गरोदपणाआधीच्या आहाराला सुद्धा महत्त्व दिले जात आहे. जेणे करून बाळाला मिळणारे पोषक द्रव्य मातेच्या शरीरात योग्य प्रमाणात त्यास मिळतील आणि गरोदपणी उद्भवणाऱ्या अनेक गुंतागुंती टाळता येऊ शकतील, असे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विद्या पाटील यांनी सांगितले.

 

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate