অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महिला ग्रामसभा

ग्रामसभेमध्ये महिलांचा सहभाग

ग्रामसभेमध्ये सदस्य या नात्याने महिला ह्या ग्रामसभेच्या घटक आहेत. त्यांच्या उपस्थिती आणि सहभागाशिवाय ग्रामसभा उचित कार्य प्रभावीपणे करू शकणार नाहीत. ग्रामसभेच्या नियमित सभांना उपस्थित राहून महिलांनी निर्णय घेण्याचा आपला हक्क बहावला पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्रवृत्त व्हावे याची विशेष व्यवस्था नव्या दुरुस्तीने केली आहे.

महिला ग्रामसभा अनिवार्य 

महाराष्ट्र शासनाने गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या विकास कार्यक्रमात महिलांचाही सहभाग असावा म्हणून महिलांसाठी स्वतंत्र ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक केले आहे. महिला ग्रामसभेला जरी हजर असल्यातरी पुरुषांपुढे बोलण्यास तसेच आपली मते मोकळे पणाने न मांडण्यामागे त्यांच्यावर दबाव [मानसिक] असतो. त्यामुळे महिलांची स्वतंत्र ग्रामसभा घेऊन त्यांनी खुली चर्चा करून त्यांचे प्रश्न/ समस्या मांडल्या पाहिजेत व त्याप्रमाणे त्यांच्या हिताचे व सोईस्कर निर्णय त्यांना घेता आले पाहिजेत या उद्देशाने महिला ग्रामसभांना अतिशय महत्व आहे. अशा रितीने महिला ग्रामसभेमध्ये महिलांनी मांडलेले विचार, प्रस्ताव ग्रामसभेमध्ये विचारात घेणे आवश्यक आहे. महिला ग्रामसभा प्रत्येक नियमित ग्रामसभेपुर्वी घेणे बंधनकारक आहे. [पोट कलम ५]

महिलांनी गावाच्या विकास कार्यक्रमात फक्त निर्णयापुरते मर्यादित राहू नये, तर संपूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये पुढे असावे आणि त्यांची निर्णय प्रक्रियेतील क्षमता वाढावी हा हेतू महिला ग्रामसभेचा आहे. अर्थातच यातून महिलांना त्यांच्या अस्मितेची, कर्तृत्वाची खऱ्या अर्थाने जाणीव होणार आहे.

महिला ग्रामसभासाठी केल्या गेलेल्या विशेष तरतुदी

महिला ग्रामसभासाठी सर्व निर्णय प्रक्रियांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होण्यासाठी महिला ग्रामसभांची तरतूद केली गेली आहे.

  • प्रत्येक ग्रामसभेपुर्वी महिला ग्रामसभेचे आयोजन केले पाहिजे.
  • महिला ग्रामसभेची वेळ व ठिकाण महिलांच्या सोयीनुसार ठरविण्यात यावी.
  • महिला ग्रामसभेसाठी कोरमची कुठलीही अट नाही.
  • महिला ग्रामसभेचे स्वतंत्र इतिवृत्त असले पाहिजे.
  • शासनाच्या महिलांच्या संदर्भातील सर्व योजनांचे लाभार्थी महिला ग्रामसभेमध्ये निवडले गेले पाहिजेत.
  • महिला ग्रामसभेत गावातील पाणी प्रश्नावर प्रामुख्याने चर्चा करणे, त्यासंबंधीचे नियोजन व धोरण ठरविणे बंधनकारक आहे.
  • महिला बाळ कल्याण योजनेतील १०% निधीच्या नियोजन व विनियोगासंबंधी सर्व निर्णय महिला ग्रामसभेमध्ये घेणे बंधनकारक आहे.
  • गाव विकास समिती कलम ४९ अंतर्गत असणाऱ्या विविध समित्यांमधील प्रतिनिधींची निवड महिला ग्रामसभेमध्ये झाली पाहिजे.
  • ग्रामसेवकाने महिला ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या आढावा सादर करावा.
  • महिला ग्रामसभेमध्ये गावपातळीवर सक्रीय असणारे बचत गट, महिला मंडळे व सांस्कृतिक मंडळाच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जावा.
  • महिला ग्रामसभेमध्ये गाव- वस्त्यांवरील आरोग्य सेविकेला विशेष आमंत्रण देऊन बोलवण्यात यावे.

प्रत्येक गावामध्ये ग्रामसभेच्या आदल्या दिवशी खरोखर महिला ग्रामसभा झाल्या तर महिलाच्या अनेक समस्या सोडविल्या जाऊ शकतील. विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शौचालयाचा प्रश्न आरोग्य, रोजगार, शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, दारूची समस्या, स्वस्त धान्य दुकानासंबंधीच्या तक्रारी इ. अनेक महत्वाच्या बाबी चर्चा करून त्या समस्या सोडविल्या जाऊ शकतील.

संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate