जे समुदाय कोणतेच धर्म किंवा कर्मकांड पाळीत नाहीत, ते सर्वांनी पाळण्याजोगे कायदे आणि मूल्यांनुसार वर्तन करणे पसंत करतात. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य ही मूल्ये जोपासतात. त्यांच्या क्रिया अधिकतर सांघिक असतात. मोर्चे,हरताळ, बंद, सभा यांतून त्या व्यक्त होतात. क्रांती, चळवळ, सत्यागह, अन्यायमूलक विरोध ही साधने त्यांना वापरावी लागतात. आतापर्यंत जगात ठिकठिकाणी समुदायांनी अन्य समुदायांवर अन्याय केले. राजे, सावकार, उच्च जाती, जमीनदार यांनी गरीब जनतेवर, पुरुषांनी स्त्रियांवर, धर्ममार्तंडांनी अडाणी भक्तगणांवर अन्याय केला; मात्र या दुष्ट प्रथांचे विचारवंतांनी खंडन केले. उद्योगाच्या क्षेत्रात आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाली. परिवहनाची आधुनिक साधने निर्माण झाल्यामुळे परदेशात व देशांतर्गत उत्पादनाच्या क्षेत्रात औद्योगिक क्रांती घडून आली. पूर्वापार चालत आलेली वस्तुविनिमयाची जागा बाजारव्यवस्थेने घेतली. बँका निघाल्या, औद्योगिकीकरणाला चालना मिळाली, भांडवलदारांची श्रीमंती वाढतच गेली आणि समाजात श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी वाढत गेली. कारखानदारांकडून कामगारांची पिळवणूक होऊ लागली. परिणामतः कामगार संघटनांचे संघटन होऊन हरताळ, बंद इ. प्रकारांनी कारखानदारांवर दबाव आणला गेला. तत्पूर्वी यूरोप खंडात ⇨कार्ल मार्क्स यांनी ‘जगातील कामगारांनो, संघटित व्हा आणि अन्याय करणाऱ्या भांडवलशाहीला विरोध करा. तुम्हाला केवळ तुमच्या पायातील बेड्या गमवाव्या लागतील; पण त्या बदल्यात तुम्हाला स्वातंत्र्य व सत्ता मिळेल’ असा उपदेश केला आणि त्याची परिणती रशियन राज्यक्रांतीत झाली (१९१७). माणूस आदान-प्रदानातून मोठे युद्घही लढू शकतो हे सत्य जगापुढे आले.
समाज आकाराने लहान होता, त्यावेळी कुटुंबामध्ये, गावांमध्ये, समुदायांमध्ये व्यक्ती परस्परांशी प्रेमाने आणि सलोख्याने वागत असत. त्यावेळी समस्यांचे प्रमाण कमी होते; परंतु जागतिकीकरणाच्या प्रक्रियेपासून लहानमोठ्या समुदायांमध्ये भांडणतंटे,सूड घेणे वाढले. ‘मी’ पणाची भावना वाढून स्वार्थ, स्पर्धा आणि संघर्ष यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. संघर्ष केवळ देशांतर्गत राहिला नाही, तर देशा-देशांमध्ये सुरु झाला.
देशांतर्गत सुरक्षा रहावी, त्या दृष्टीने शासन सतर्क असते. सुरक्षेइतकेच महत्त्व शिक्षण, आरोग्य आणि प्रतिबंधात्मक वैयक्तिक आरोग्य यांनाही आहे. यावर शासन व समाजसेवी संस्था काम करीत असतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तंत्रज्ञान व विज्ञानातील संशोधनामुळे औषधो पचारात प्रगती झाल्याने बालमृत्यू आणि स्त्रीमृत्यू यांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच दळणवळणातील प्रगतीमुळे प्राथमिक आरोग्यसेवा गावोगावी पोहोचत असून, आहार आणि कुटुंबकल्याण यांवरही भर दिला जात आहे. नेत्रदान आणि देहदान ह्या पुण्यकर्मांचे महत्त्व समाजावर बिंबवले जात आहे. ज्ञान, मानसिक प्रवृत्तींचे उन्नयन व त्यानुसार क्रि या करणे ही त्रिसूत्री जनता स्वीकारु लागली, तर सामाजिक क्रिया कल्याणकारी होतील.
नैसर्गिक आणि अन्य आपत्तींच्या वेळी सामाजिक दातृत्वाचे निखळ दर्शन घडते. जात, धर्म, वंश, आर्थिक स्थिती इत्यादींचा विचार न करता माणसे आपद्गस्तांना मदत करतात. समुदायातील सेवाभावी संस्था दुःखात सहभागी होतात. समुदायात ‘आम्ही, आपले आणि आमच्या सर्वांचे अशी भावना असते’. इतरांच्या समस्या माझ्याच समस्या आहेत असे मानून परस्परांना त्या साहाय्य करतात. आजचे ‘बचतगट’ – विशेषतः महिलांचे – स्त्रियांची संकुचित दृष्टी व्यापक करण्यास साहाय्यभूत होतात. त्यांच्या एकत्र भांडवलनिर्मितीतून उत्पादक क्रि यांना आणि बाजारहाट यांना तर वाव मिळतोच; पण त्याशिवाय कोणाही महिलेवर संकट आले, तर धावून जाण्याची क्षमताही दाखविली जाते. समाजात विविध समुदाय आपापली संस्कृती जपतात. समाज नव-अभिजात-सिद्घांतानुसार सुखलोलुप होत आहे. तो सुखकारक कृती करण्याकडे प्रवृत्त होतो आणि दुःखकारक गोष्टी करण्याचे टाळतो. यालाच विलासवादी मानसशास्त्र असे म्हटले जाते. या सिद्घांतास सुख-दुःख असेही म्हणतात. आदान-प्रदानाचे हे विविध नमुने समाजात आढळतात.
संदर्भ : 1. Parsons, Talcoat, Theoris of Society, New York, 1961.
२. बोबडे, प्रकाश, कोलाज (आर्थिक विकास व सामाजिक चळवळी),
पुणे, १९९२. काळदाते, सुधा
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/12/2020