नोकऱ्यांच्या जगात अनुभवाअभावी नोकरी नाही आणि नोकरी अभावी अनुभव नाही याचा विदारक अनुभव नोकरी इच्छुक युवक-युवतींना पदोपदी येतो. या दृष्टचक्राचा भेद करण्यासाठी रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना सन 1973 पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विविध व्यवसायांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे युवकांमध्ये कसब व पात्रता वाढवून त्यांना नियमित रोजगार उपलब्ध करुन देणे अथवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना स्वतंत्रपणे स्वयंरोजगार सुरु करणे शक्य व्हावे हा या रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेचा उद्देश होय. या योजनेअंतर्गत सेवायोजन कार्यालयात नाव नोंदविलेले सुशिक्षित उमेदवार खाजगी उद्योग धंद्यामध्ये अथवा शासकीय स्वंयरोजगार करु शकतात. योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून यासाठी पाठ्यवेतनाचे दरामध्ये वाढ करुन ते दरमहा रुपये 300/- ते दरमहा रुपये 1000/- असे केले आहे.
शालांत परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्रधारक आणि वंशपरंपरेने स्वत:च्या व्यवसायचे ज्ञान असलेले व हस्तशिल्पी ज्ञान अवगत असलेले कारागीर यांना 300 रुपये. पदवीधर (कला, शास्त्र आणि वाणिज्य) यांना 500 रुपये. अभियांत्रिकी (तंत्रज्ञान, कृषी, पशु, वैद्यकीय, वास्तुशास्त्र आणि व्यावसायिक अभ्यासक्रम यांचे पदवीधारक यांना 700 रुपये. कला, शास्त्र व वाणिज्य शाखेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार, कृषी, पशुवैद्यकीय, वैद्यकीय, दंत शल्य चिकित्सक, औषधनिर्मिती पदवीधर आणि बी.एड. बी.ए., बी.कॉम किंवा यासारखे पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर यांना 800 रुपये. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व वास्तुशास्त्र शाखेतील पदविधरांना 100 रुपये मासिक दर देण्यात येतात.
पाठ्यवेतनाची रक्कम संबंधित नियोक्ते प्रशिक्षणार्थींना देतात व नंतर सेवायोजन कार्यालये त्याची परतफेड नियोक्त्यांना करतात. या योजनेची माहिती असलेली मराठी व इंग्रजीतील पुस्तके नियोक्त्यांना पाठविली जातात. समक्ष भेटीत पाठपुरावा केला जातो. या योजनेमुळे उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्राप्त होतो. उद्योजकांकडे रिक्तपदे निर्माण झाल्यावर या प्रशिक्षीत उमेदवारांना नोकरीवर घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जातो. काही करणास्तव प्रशिक्षणानंतर नियमित स्वरुपाच्या नोकरीत उमेदवारास घेता आले नाही तरी मिळालेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर उमेदवार अन्यत्र नोकरीस लागू शकतो.
10 वी नापास उमेदवारांना अनुभवाअभावी खाजगी क्षेत्रात रोजगार मिळत नाही. ज्यामुळे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतल्यानंतर अशा उमेदवारांना किमान स्वयंरोजगार सुरु करता यावा या हेतूने अशा उमेदवारांना गॅरेज, वर्कशॉप, इलेक्ट्रीक फिटींग इत्यादी तांत्रिक व्यवसायाचे प्रशिक्षणासाठी खाजगी उद्योजकांकडे (उदा. गॅरेज, इलेक्ट्रीक, काँन्ट्रॅक्टर वर्कशॉप इ.) पाठवून सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येते. अशा उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत विद्यावेतन देण्याची तरतूद नाही. तथापी प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांने संबंधित व्यवसायाचे ज्ञान आत्मसात करुन प्रशिक्षणानंतर स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याबाबत प्रयत्न करणे अपेक्षित आहे. यासाठी 25 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या खाजगी आस्थापनेत पाठवण्याची अट शिथिल करून 25 पेक्षा कमी कामगार असलेल्या खाजगी आस्थापनेतही या योजनेअंतर्गत उमेदवार पाठवावे तसेच सेवाक्षेत्रात उमेदवारांना प्रामुख्याने पाठविण्यात येते.
संकलन - जिल्हा माहिती कार्यालय,
अमरावती
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 4/22/2020