जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने शासन विविध योजना राबविते. या योजनांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून शासनाच्या योजनांच्या प्रसार व प्रचारात आघाडीवर आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘संवादपर्व’ उपक्रमातून शासन जनतेच्या दारी पोहचले आहे. यात महत्वाकांक्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून ऐतिहासिक महाकर्जमाफीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
सरकार सत्तेची तीन वर्षे पूर्ण करीत आहे. या कालावधीत अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. देशातील सर्वांत मोठा असा 34 हजार कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय महाराष्ट्राने घेतला. यापूर्वी पंजाब सरकारने 10 हजार कोटी, आंध्रप्रदेश सरकारने 15 हजार कोटी, कर्नाटक आठ हजार कोटी व तेलंगणाने 10 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. या राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राने केलेली 34 हजार कोटींची कर्जमाफी देशभरात सर्वाधिक आहे. यात दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ होऊन 36 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. या ऐतिहासिक महाकर्जमाफीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘संवादपर्व उपक्रम’ उपयुक्त ठरला आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या कालावधीत ठिकठिकाणी संवादपर्व कार्यक्रमाचे आयोजन करून शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यात महाकर्जमाफीसंबंधाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय, शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण, शासननिर्णयाची माहिती देऊन शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे जनतेला पटवून देण्यात आले. याशिवाय संकल्प सिद्धी या उपक्रमातून जनतेच्या दारी शासन पोहोचून तीन वर्षांत केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील वंचित घटकाला व्हावी, योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, या मुख्य उद्देशाने संवादपर्व उपक्रम राबविण्यात आला असला तरी शासन राज्यातील जनतेच्या दारी पोहोचविले, हे तितकेच खरे.
संवादपर्व उपक्रमातून महाकर्जमाफीसह महाअवयवदान, कौशल्य विकास याशिवाय अनेक योजनांची माहिती जनतेला देण्यात आली. भंडारा जिल्हा माहिती कार्यालयाने काही शासकीय विभागाच्या सहकार्याने नकळत झालेल्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कारागृहातील कैद्यांना शासनाच्या कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देवून सुटकेनंतर रोजगाराची संधी मिळवून देण्याचा अभिनव उपक्रम राबविला, असे जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा रवी गिते यांनी सांगितले.
लेखक: श्रीकांत पनकंटीवार
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/28/2020