অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नाशिक जिल्ह्याची ‘लाख’मोलाची कामगिरी

नाशिक जिल्ह्याची ‘लाख’मोलाची कामगिरी

नाशिक जिल्हा सौंदर्य आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. ही दोन्ही गुणवैशिष्ट्ये जपण्यासाठी जिल्ह्याने ‘स्वच्छ भारत’ अभियान प्रभावीपणे राबविले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले असून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झालेल्या ‘दरवाजा बंद माध्यम अभियाना'च्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षभरात एक लाखापेक्षा अधिक शौचालय बांधल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला.

'स्वच्छ भारत' अभियानात जिल्ह्याने भरीव कामगिरी केली आहे. ग्रामीण भागात एकूण 3 लाख 36 हजार 998 शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट असताना दोन लाख 36 हजार 937 शौचालय बांधण्यात आली. एकूण 1368 पैकी 808 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या. यापैकी 508 ग्रामपंचायती एका वर्षात हागणदारीमुक्त झाल्या.

केवळ 2016-17 या एका वर्षात जिल्ह्यात एक लाख 4 हजार 319 शौचालये बांधण्यात आलीत. 2016-17 या वर्षात सर्वाधिक शौचालय बांधण्यात पुण्यानंतर नाशिक जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. जिल्ह्यातील देवळा, कळवण आणि नाशिक हे तीन तालुकेदेखील हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

शौचालय बांधकामाचे सूक्ष्म नियोजन, प्रभावी संनियंत्रण, ग्रामस्थांशी थेट संवाद, लोकसहभाग, दृकश्राव्य माध्यमांचा उपयोग आणि अभियानातील सांघिक भावना ही या यशामागची मुख्य कारणे आहेत. सूक्ष्म नियोजनांतर्गत प्रत्येक आठवड्यात आढावा बैठक घेण्याबरोबरच सोशल मीडियाचा दैनंदिन कामकाजात प्रभावी वापर करण्यात आला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांचे मतपरिवर्तन करण्यासाठी गृहभेटीच्या माध्यमातून केलेले प्रयत्न उल्लेखनीय असेच आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गूड मॉर्निंग पथक, टमरेल मुक्त गाव अभियानात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे अधिकारी - कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. मालेगाव आणि सुरगाणा येथे शौचालय बांधकामासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी आयोजित गवंडी प्रशिक्षणामुळे गावात रोजगारही उपलब्ध झाला. एक ग्रामपंचायत निवडून तेथे परिसराच्या गावातील 25 ते 30 गवंड्यांना शौचालयाबाबत तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. याच गवंड्यांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आणि शौचालयाच्या बांधकामालादेखील गती मिळाली. श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता चळवळीला गती देण्यात आली. स्वत: अधिकारी-कर्मचारी श्रमदानात सहभागी झाले. अनेक ठिकाणी महिलांनी पुढाकार घेऊन गाव हागणदारीमुक्त केले.

जिल्ह्याची वाटचाल आता संपूर्ण हागणदारीमुक्तीकडे सुरू आहे. उर्वरीत 560 ग्रामपंचायतीपैकी 94 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून एक लाख 35 हजार 915 शौचालयांपैकी 54 हजार शौचलयांचे बांधकाम झाले आहे. उर्वरीत शौचालयांसाठी जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. प्रत्येक महिन्यात किमान दोन तालुके हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणर आहे. फेब्रुवारी 2018 अखरे संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुका हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे.

स्वच्छतेसाठी जिल्ह्यातील हजारो हात पुढे सरसावल्याने सामूहिक कामगिरीच्या बळावर जिल्ह्याचा राज्यस्तरावर गौरव झाला आहे. 'स्वच्छ भारत ' अभियानातील जिल्ह्याची ही कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे. यात सातत्य ठेवीत हागणदारीमुक्तीचे उद्दीष्ट नागरिकांच्या सहकार्याने निश्चितपणे पूर्ण केले जाईल यात शंका नाही.

अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवकांचा पुढाकार विशेष ठरला आहे. हिवरे गावचे ग्रामसेवक किशोर विभुते यांनी गाव हागणदारीमुक्त झाल्यावरच लग्नाचे मुहुर्त ठरविले. वनिता वर्पे या महिला असूनही गुडमॉर्निंग पथकाचा उपक्रम त्यांनी नेटाने राबविला. ग्रामस्थांकडूनही अशा प्रयत्नांना साथ मिळाल्याने अभियानाला गती मिळाली आहे.

ग्रामीण आदिवासी भागात बांधकामासाठी मजूर उपलब्ध होत नाही. त्यामुळे श्रमदानाला चालना देण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तोरंगण या आदिवासी गावात शोषखड्डे खोदण्यासाठी श्रमदान केले. इतरही जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर श्रमदानात सहभाग घेतल्याने ग्रामस्थांमध्ये परिवर्तन घडून आले.

टमरेल मुक्त गाव अभियान विशेष प्रभावी ठरले आहे. अभियानांतर्गत पहाटेच्यावेळी गावात फिरून बाहेर टांगलेले टमरेल तसेच बाहेर शौचालयास जाणाऱ्या ग्रामस्थांचे टमरेल जप्त करण्यात आले. या टमरेलांची गावातून फेरी काढण्यात येऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात आले. ही बाब ग्रामस्थांना शरमेची वाटू लागल्याने चांगली जनजागृती होण्यास मदत मिळाली.

लेखक: डॉ.किरण मोघे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate