<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; "><span>जगातील अनेक समुद्रकिना-यावर आढळणारी खारफुटीची वणे अनियंत्रित किनारी ‘विकासा’ मुळे नष्ट होत आहेत. आपण ज्या फांदीवर बसलो आहोत तीच तोडण्यासारखा हा प्रकार असल्याने याबाबत जनजागृती आणि खारफुटी संरक्षण – संवर्धन करणे आवश्यक झाले आहे.</span></p> <h3 style="text-align: justify; ">मूळ संकल्पना व सुरुवात</h3> <p style="text-align: justify; ">संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमातून मानवासहित सर्व जीवसृष्टीच्या संवर्धनातली खारफुटी ही महत्त्वाची भूमिका सन २००० सालानंतर सातत्याने मांडली जात आहे.</p> <h3 style="text-align: justify; ">अधिक माहिती</h3> <p style="text-align: justify; ">खारफुटीची झाडे - झुडपे किनारी दलदलीत पाय रोवून उभी राहात असल्याने समुद्राचे आक्रमण थोपवणे, किनारी जमीन क्षारयुक्त (खारपड) होण्यापासून वाचवणे, इतर जैवविविधतेला अधिवास पुरवणे, पुराचे पाणी तसेच मोठ्या लाटांपासून मानवी वस्तीला संरक्षण देणे अशी अनेक कामे ती करतात. नैसर्गिकरीत्या कार्बन शोषण्याची सर्वाधिक क्षमता खारफुटीमध्ये आढळते.परंतु, किनारी प्रदेशातील बांधकामे, भराव टाकणे (रिक्लेमेशन), प्रदूषण, चुकीच्या ठिकाणी उभारलेली मत्सशेती यांसारख्या कारणांनी खारफुटी नष्ट होत आहे.</p> <p style="text-align: justify; ">कोलकात्याजवळील सुंदरबन हे अशा स्थितीचे उदाहरण आहे. कारण, त्या जंगलाचे क्षेत्र दर वर्षी कमीच होत चालले आहे ! आपल्याकडील मुंबई-ठाणे परिसरातही हीच समस्या आढळते. खारफुटी दिनाच्या निमित्ताने खारफुटी वनाचे महत्त्व जाणून घेऊन त्यांची जोपासना करण्यासाठी होईल तेवढे प्रयास करावेत.</p> <p style="text-align: justify; "> </p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६</p> </div>