<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; "><span>लोकसंख्येत होणारी वाढ सर्वार्थाने घातक आहे. पृथ्वीवरील मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर होण्याचा धोका यातून वाढतो. या समस्येची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा ‘पॉप्युलेशन डे’ जगभर पाळला जातो.</span></p> <h3>मूळ संकल्पना व सुरुवात</h3> <p style="text-align: justify; ">१९५० साली जगाची लोकसंख्या २.५ अब्ज होती. अवघ्या ३७ वर्षात ११ जुलै १९८७ रोजी ती बरोबर दुप्पट म्हणजे ५ अब्ज झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १९८७ सालापासून, युनोच्या विकास कार्यक्रम (युएनडीपी) समितीने ठरविल्यानुसार ११ जुलै हा दिवस इशारा – दिन म्हणून पाळला जातो.</p> <h3>अधिक माहिती</h3> <p style="text-align: justify; ">पृथ्वीची लोकसंख्या २०११ मध्ये ७ अब्ज होती आणि २०५० पर्यंत ९.६ अब्ज होण्याची शक्यता आहे. यामध्ये, चीनपेक्षाही भारताची ‘प्रगती’ वेगाने होत आहे ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे ! या अभूतपूर्व वाढीमुळे फक्त भारतच नाही; संपूर्ण जगापुढेच बकाल शहरीकरण, बेरोजगारी, अपुरे अन्न- पाणी- आरोग्य, प्रदूषण यांसारख्या मुलभूत समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्तीचा बेबंद आणि असंतुलित वापर पाहता ही वाढ सर्वांनाच जड जाणार आहे.</p> <p style="text-align: justify; ">मध्य आशिया आणि आफ्रिकेतील युद्धस्थिती तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे विस्थापित होणा-यांची संख्या (६ कोटींपेक्षा जास्त) लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने २०१५ सालासाठी ‘बिकट स्थितीतील संवेदनशील लोकसंख्या’ ही थीम ठरवली आहे. या गोष्टीचे भान ठेवणे हे आपणा सर्वांनाच आवश्यक आहे.</p> <p style="text-align: justify; "> </p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६</p> </div>