<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; ">औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवरील प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा विपरीत परिणाम माणसांबरोबर इतर जीवसृष्टी, नैसर्गिक संसाधने आणि हवामानावरही होत आहे. प्रदूषणाच्या दुष्परिणांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढली पाहिजे याची गरज आता जगभरातच निर्माण झाली आहे. २ डिसेंबर १९८४ च्या रात्री भोपाळजवळील युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेची आठवण, विशेषतः औद्योगिक क्षेत्राला राहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, म्हणून हा दिवस भारतात पाळला जातो.</p> <h3 style="text-align: justify; ">अधिक माहिती</h3> <p style="text-align: justify; ">जगातील औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाशी संबंधित दुर्घटनांमध्ये भोपाळ वायू दुर्घटना सर्वात भीषण आहे. अशाच आणखी दिन घटना अणू केंद्राशी संबंधित आहेत. अमेरिकेतील ‘ थ्री माईल आयलँड (१९७९)’ आणि रशियातील ‘चेर्नोबिल (१९८६)’ , औद्योगिक क्षेत्राने प्रदूषणकारक पदार्थाबाबत किती काळजी घेतली पाहिजे हे यातून अधोरेखित होते. कारण, निष्काळजीपणाचे परिणाम फारच भयंकर होतात. आपल्याकडे विविध प्रकारच्या प्रदूषणांवर नजर आणि नियंत्रण ठेवणारी महामंडले (पोल्युशन कंट्रोल बोर्ड) आहेत. तसेच प्रदूषक कच-याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात. त्यांमध्ये मैलापाण्यापासून अणुभट्टीतील राखेपर्यंत अनेक प्रदूषकांचा समावेश आहे.!</p> <h3 style="text-align: justify; ">आपण काय करू शकतो ?</h3> <ul> <li><span>प्रदूषण नियंत्रणाबाबतच्या नियमांना प्रसिद्धी देणे.</span></li> <li><span>नियमांची अंमलबजावणी करणे, स्वच्छ औद्योगिक प्रक्रियांना प्रोत्साहन देणे.</span></li> <li><span>प्रदुषणाच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता वाढविणे.</span></li> <li><span>प्रदूषण होताना आढळल्यास योग्य त्या संस्थेला कळविणे.</span></li> <li><span>कारखान्यातून निघणारे सांडपाणी नदीत न सोडणे.</span></li> </ul> <p style="text-align: justify; ">शक्यतो सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करून प्रदूषण टाळणे. या अतिशय साध्या वाटणा-या गोष्टी सुध्दा आपण आपल्या जीवनात रुजवल्या तरी सुध्दा प्रदूषण कमी करण्यासाठी आपला हातभार लागू शकतो. शिवाय, आपल्याकडून संस्कारातूनच पुढच्या पिढीला हा विचारांचा ठेवा मिळेल, जो अतिशय मौल्यवान आहे. या गोष्टी पाळल्या तरच थोड्या प्रमाणात का होईना पण पुढच्या पिढीसाठी निसर्ग उरेल तरी !</p> <p style="text-align: justify; "> </p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६</p> </div>