• बारा गावे टॅंकरमुक्त
• लोकसहभागातून उभारली जलचळवळ
• नदीचे झाले पुनरुज्जीवन
एके काळी औरंगाबाद शहराला लाकडाच्या मोळ्या व गवताचे भारे पुरवण्यात चित्ते खोऱ्यातील लोक स्वत:ला धन्य मानत. पाणी टंचाईमुळे माणसांबरोबरच पशुधनाचे देखील मोठे हाल होत असत. परंतु सतत दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या चित्ते नदी खोऱ्यातील, परिसराचा खऱ्या अर्थाने कायापालट करणारे अभियान म्हणजे चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान होय. शासनाच्या जलयुक्त शिवार योजना, ग्रामविकास संस्थेचा पुढाकार, लोकसहभाग, वसुंधरा, सकाळ माध्यम समूह, केअरींग फ्रेंड्स यांच्या सहकार्याने हे काम पुर्णत्वाकडे जात आहे. औरंगाबाद शहरापासून दक्षिणेला 12 किलोमीटर्सवर असणारे चित्ते नदी खोऱ्यात भुरचनेचा शास्त्रोक्त अभ्यासातून माथा ते पायथा असे जलव्यवस्थापन शाश्वत ग्रामविकासाचे मॉडेल उभे राहिले आहे. या मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे 12 प्रमुख गावांचा समावेश असलेले एक नदीचे खोरे केंद्रस्थानी ठेवून हे अभियान राबविण्यात येत आहे. जाणून घेऊया या लोक चळवळीविषयी…..
काही वर्षांपासून मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामुळे या भागाचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन दशकात मराठवाड्यात दुष्काळा निवारणाचे विविध प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत. दुष्काळा कायमचा संपवायचा असल्यास एका गावाचा विचार न करता एका नदी खोऱ्याचा किंवा कल्सटरचा विचार झाला पाहिजे. औरंगाबादच्या दक्षिणेला 12 कि.मी. अंतरावर असलेल्या चित्ते नदी खोऱ्यात वसुंधरा प्रकल्पाच्या माध्यमातून ही संधी चालुन आली. या संधीचे सोने करायचेच या इराद्याने आजतागायत एखाद्या मृतप्राय नदीला पुनरुज्जीवन करायचे या सुप्त इच्छाशक्तीला अंकुर फुटले. चित्ते नदी खोऱ्याच्या सर्वांगीण विकासाकरीता वसुंधरा प्रकल्पाचा अपुरा असलेला निधी यावर मात करण्यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासह सकाळ माध्यम समूह, केअरींग फ्रेंड्स मुंबई यांची मोलाची साथ लाभली आणि यामळे अशक्य काम शक्य झाले.
चित्ते खोऱ्याविषयी -
चित्ते नदी खोऱ्याचे क्षेत्रफळ 6427 हेक्टर एवढे आहे. माथ्यावरील सिंदोन भिंदोन ते पायथ्याकडील एकोड, पाचोड, चित्तेगाव अशा प्रकुख 12 गावांचा या खोऱ्यात समावेश आहे. यात 19 लघु पाणलोटांचा समावेश असून 15000 लोकसंख्येची उपजिवीका या भागातून वाहणाऱ्या चित्ते नदीवर अवलंबून आहे. चित्ते नदी या भागातून साधारणत: 17 किमी पर्यंत वाहत जावून सुखना धरणांत विसर्जीत होते. या भागात जमिनीचा उतार तीव्र असून भुस्तरामध्ये काळा पाषाण, मांजऱ्या खडक, गेरु यांचा समावेश आहे. समुद्रसपाटीपासून माथा उंची 793 मीटर तर पायथा उंची 537 मीटर एवढी आहे. खरीप पीकांमध्ये बाजरी, मका, कापूस तर रब्बीमध्ये ज्वारी, गहू, कांदा तर उन्हाळ्यामध्ये मोसंबी, डाळींब, भाजीपाला ही पीके घेतली जातात. वन व पडिक जमीनीचे क्षेत्र मोठे आहे.
चित्ते नदी पुनरूज्जीवन म्हणजे काय ?
“चित्ते नदी पाणलेाट क्षेत्रात माथा ते पायथा या क्रमाने मृद व जलसंधारणाचे विविध उपचाराव्दारे सर्व जलस्त्रोत समृध्द करुन पाण्याचा कार्यक्षम व उत्पादक वापर करुन, पर्यावरणपुरक साधनांव्दारे पशुधन व मनुष्य यांचे जिवनमान उंचावणे म्हणजे चित्ते नदी पुनरुज्जीवन हो”
अशी झाली सुरूवात-
चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या माध्यमातून लोकाभिमुख जलचळवळ उभी करुन चित्ते नदी खोऱ्याचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता 6 फेब्रुवारी 2015 रोजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली चित्ते खोऱ्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांची बैठक होवून दहा कलमी कार्यक्रम निश्चीत करण्यात आला. यामध्ये माथा ते पायथा उपचार व शाश्वत ग्रामविकास याचा अतर्भाव होता. प्रथम टप्प्यात ग्रामसभा, समाजप्रबोधन, क्षमताबांधणी प्रशिक्षण, हिवरे बाजार येथे ग्रामस्थांची सहल व गाव तेथे प्राधान्यक्रमाने लोकांच्या प्रमुख गरजेवर आधारीत कॉक्रीट रोड, सोलार लाईट, जनरेटर या मुलभुत कामाबरोबरच जलव्यवस्थापनासाठी कंपार्टमेंट बंडींग, डीप सी.सी.टी, शेततळे ही कामे केल्यामुळे झपाट्याने भूजल पातळी वाढली व खऱ्या अर्थाने चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानास सुरूवात झाली.
आजपर्यंत माथा ते पायथा चित्ते नदी खोऱ्यात झालेली जलव्यवस्थापनाची कामे
1 डीप सी.सी.टी 168 हे.
2 कंपार्टमेंट बंडींग 2500 हे.
3 साखळी सिमेंट बंधारे 25
4 चित्ते नदी रुंदीकरण व खोलीकरण 15 कि.मी.
5 शेततळे 31
6 पाझर तलावातील गाळ काढणे 70000 घ.मी.
दृष्यपरिणाम-
चित्ते नदी खोऱ्यातील भुगर्भाचा शास्त्रोक्त अभ्यास करुन माथा ते पायथा या तत्वानुसार कामे झाल्यामुळे जलसमृध्दी उपलब्ध झाली आहे.
• पूर व मातीचे धूप नियंत्रण
• भूजलपातळीत 4 मी. ने वाढ
• संरक्षीत सिंचन क्षेत्र 2308 हे.
• बारमाही सिंचन क्षेत्र 1220 हे.
• दुध उत्पादनात 46950 लीटरने वाढ
• भाजीपाला, व फळबागा क्षेत्रात वाढ आणि पीक पध्दतीत बदल
• पाण्याचा कार्यक्षम वापराकरिता ठिंबकचावापर
• बारा गावे टॅकरमुक्त
लोकसहभाग-
चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानात लोकसहभाग ही सर्वात जमेची बाजू आहे. 29 पैकी 12 पाझर तलावातील गाळ काढणे, 15 कि.मी. नदीचे रुंदीकरण व खोलीकरण ही दीड कोटीचे कामे लोकसहभागातून झालेली आहेत. यामध्ये जलयुक्त शिवार अभियान, देवगिरी महाविद्यालयाच्या प्राध्यापकाचा एक दिवसाचा पगार, गोसंवर्धन सहकारी दुध व्यवसायिक संस्था, सिंदोन येथील जलमित्रांनी होळीसाठी पळसाच्या फुलापासून नैसर्गिक रंग तयार करुन विक्रीतून उभारलेला निधी व गाळ-मुरूम वाहून नेणारे ग्रामस्थ यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.
मान्यवरांच्या भेटी-
चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान या दुष्काळ निवारणाच्या पथदर्शी प्रकल्पाची दखल घेवून आजतागायत विधान सभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गा्रमविकास मंत्री पंकजा मुंडे, जलपुरूष राजेंद्रसिंह राणा, इस्त्रायलचे राजदुत डेव्हिड अकाव, यासाह गा्रमविकास व पाणी क्षेत्रातील अनेक मान्यवरानी भेटी देवून कामाचे कौतुक केलेले आहे.
आगामी कार्य-
जलसमृध्दीतून आर्थिक समृध्दी साधण्यासाठी या पुढच्या काळात चित्ते नदी खोऱ्यात उर्वरित जलव्यवस्थापनासाठी कामे करणे, पाण्याच्या कार्यक्षम वापराकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, पीक पध्दतीत बदल, कृषी पुरक व्यवसाय- उद्योग, मुलभुत सुविधा, स्थानीक पातळीवर रोजगार, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, या विष्ज्ञयात काम करुन या खोऱ्याचा सर्वांगीण विकास करणे हे नियोजित असून प्रत्यक्षात कामाला सुरूवातही झाल्याचे गा्रमविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी सांगितले.
लेखक: मुकुंद एम. चिलवंत
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020