वाळवा तालुक्याच्या पश्चिमेस इस्लामपूर-शिराळा रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर वसलेले जांभूळवाडी हे गाव. गावची लोकसंख्या अवघी 759. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास 90 टक्के क्षेत्र कोरडवाहू. बहुतांश जमीन हलक्या प्रतीची. सन 2015-16 या वर्षात गावची पैसे वारी 50 पैशापेक्षा कमी होती. त्यामुळे सन 2016-17 या सालामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावाची निवड करण्यात आली.
सर्वांसाठी पाणी- टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून टंचाई परिस्थितीवर मात करण्याची ही चांगली संधी होती. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारणांतर्गत एकात्मिक पद्धतीने सर्व विभागांच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी विशेष ग्रामसभेमध्ये चर्चा होऊन गावपातळीवर समिती स्थापन करण्यात आली. कामांची निवड करण्यासाठी प्रत्यक्षात शिवार फेरी करण्यात आली. शिवारफेरीमध्ये लोकांनी सूचविलेल्या कामांचा तांत्रिकदृष्ट्या विचार करून तसेच पाण्याचा ताळेबंद मांडून विविध कामे सूचविण्यात आली.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन तालुका कृषि अधिकारी यासीन पठाण व सध्याचे तालुका कृषि अधिकारी भगवानराव माने, मंडळ कृषि अधिकारी सुहास रणशिंग, कृषि पर्यवेक्षक श्री. पवार, कृषि सहाय्यक श्री. शिवदास यांनी सर्व यंत्रणांशी समन्वय राखला व नियोजन केले. गावात पिकासाठी 226.50 टी. सी. एम. आणि पिण्याच्या पाण्यासाठी 30.81 टी. सी. एम.अशी एकूण 393.91 टी. सी. एम. पाण्याची गरज होती. गावात पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चित करण्यात आली आणि सर्व यंत्रणा कामाला लागल्या.
जांभूळवाडी गावामध्ये दोन मुख्य ओढे आहेत. दोन ओढ्यांवर मिळून जुने 7 सिमेंट नाला बांध उभारण्यात आले आहेत. त्यापैकी 5 सिमेंट नाला बांध गाळाने पूर्ण भरले होते. त्यामुळे पाणीसाठा होत नव्हता. म्हणून त्या 5 सिमेंट नाला बांधातील गाळ काढण्याची कामे प्रामुख्याने हाती घेण्यात आली. त्यातून जवळपास 6 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे जवळपास 6 टी.सी.एम. पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. तसेच, 25 हेक्टरवरील पिकाची संरक्षित पाण्याची गरज भागवण्यात आली. त्यानंतर दोन नवीन सिमेंट नाला बांध प्रस्तावित करण्यात आले. या कामामुळे गावातून वाहून जाणारे 5.37 टी. सी. एम. पाणी अडवण्यात आले. ओघळ नियंत्रणाच्या उपचारामुळे गावातील 40 हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली. वाढीव पाण्यासाठ्यामुळे ओढ्याच्या काठावरील विहिरींच्या पाणीपातळीत एक मीटरने वाढ झाली. परिणामी भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळू लागला व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली. या सर्व कामांसाठी 13 लाख, 82 हजार, 607 रुपये रक्कम खर्ची पडली.
-संप्रदा द. बीडकर
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020