অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलयुक्त शिवारमुळे आली समृद्धी

जलयुक्त शिवारमुळे आली समृद्धी

महाराष्‍ट्र शासनाचा महत्‍त्‍वाकांक्षी व मुख्‍यमंत्र्यांच्‍या अतिमहत्‍त्‍वाच्‍या योजनांपैकी जलयुक्‍त शिवार अभियान ही एक योजना आहे. राज्‍यात सन २०१५-१६ पासून राबविण्‍यास सुरुवात केलेली ही योजना लोकाभिमुख योजना म्‍हणून ओळखली जात आहे. मागील दोन वर्षापासून जनतेच्या मिळणाऱ्या लोकसहभागामुळे ही योजना राज्‍यातील जनतेला दुष्‍काळमुक्‍त करण्‍यासाठी उपयुक्त सिद्ध होत आहे.

शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारण अंतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करुन राबविल्यास पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे करता येईल. ही बाब लक्षात घेऊन टंचाईमुक्त महाराष्ट्र-2019 अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्याबाबत शासनाने निर्णय घेतला. या अनुषंगाने, अभियान राबविण्याबाबत सर्वंकष सूचना 2014 मध्ये निर्गमित करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने अभियानाचा उद्देश, अभियानाची व्याप्ती, अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणा म्हणून विभागीय समन्वय समिती तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती, अभियानाअंतर्गत हाती घ्यावयाची कामे, अभियान कालावधी, निधीची उपलब्धता, गावासाठी पाण्याचा ताळेबंद तयार करणे, अभियानाचा आराखडा करणे, अभियानाचे संनियंत्रण, प्रगती व फलनिष्पत्ती इ. बाबींचा समावेश आहे. राज्यात जवळजवळ 82% क्षेत्र कोरडवाहू व 52% क्षेत्र अवर्षणप्रवण आहे, ही बाब पाहता, जलयुक्त शिवार अभियानाचे महत्त्व अधोरेखित होते.

मागील तीन वर्षांपासून अकोला जिल्ह्यात विविध यंत्रणांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. अकोला जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16 पासुन सुरु आहे. हा जिल्हा जरी निश्चित पावसाच्या क्षेत्रामध्ये येत असला तरी गेल्या 5 वर्षांतील वार्षिक पाऊसमानामध्ये बराच चढ उतार दिसून येतो.

सन 2015-16 या वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 200 गावे निवडण्यात आली होती. यापैकी एकूण 6748 कामे पूर्ण झाली असून यासाठी एकुण 93.15 कोटी रु. निधी खर्च करण्यात आला आहे. निवडलेल्या गावांपैकी सर्व गावांतील कामे नियोजनानुसार पुर्ण झालेली आहेत. पूर्ण झालेल्या कामांमुळे 22592 टी.सी.एम. एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे.

सन 2016-17 या वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 125 गावे निवडण्यात आली होती. सदर गावांमध्ये विविध यंत्रणांद्वारे एकूण 1307 कामे पूर्ण झाली असून यासाठी एकूण 29.24 कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे व उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण झालेल्या कामांमुळे 11938 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाला आहे.

सन 2017-18 या चालू वर्षात जिल्ह्यातील एकूण 144 गावांची निवड करण्यात आली आहे. आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून काही गावांमध्ये कामे सुरु झाली आहेत.

राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने धरणातील गाळ काढून शेतात वापरण्यासाठी गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गावतलाव, पाझर तलाव, इत्यादी तलावांतील गाळ स्थानिक शेतकऱ्यांना मोफत मिळणार असून तो स्वखर्चाने वाहून न्यावा लागणार आहे. गाळ उपसण्यासाठी लागणारी यंत्र सामग्रीवरील इंधनाचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात एकूण 47 प्रकल्पांतून 106182 घ.मी. गाळ काढण्यात आला आहे. साधारण 323.77 हे. क्षेत्र गाळ युक्त झाले आहे.

या योजनेसाठी तलावालगतच्या शेतकऱ्यांना गाळ काढण्याच्या मागणीचे प्रस्ताव संबंधित गावातील सरपंच, प्रशासकीय संस्था किंवा स्थानिक मंडळामार्फत संबंधित तहसिलदारांना सादर करता येतील. जलयुक्त शिवारमुळे पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असून शेतकरी राजा सुखी होण्याबरोबरच गावांमध्ये समृद्धी नांदू लागली आहे.

-जिल्हा माहिती कार्यालय, अकोला

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate