पेठ तालुक्यातील उभीधोंड गावात विविध यंत्रणांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामांमुळे चांगला पाणीसाठा निर्माण झाला असून गावाची वाटचाल टंचाईमुक्तीच्या दिशेने होत आहे.
गावातील गावतळे गळतीमुळे पावसाळ्यानंतर दोन-तीन दिवसात कोरडे होत असे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांना पाण्यासाठी समस्या निर्माण होत असे. दोन वर्षापूर्वी गावात टँकरदेखील सुरू होता. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावाची निवड झाल्यावर मग्रारोहयो, कृषी विभाग, वन विभागा आदी यंत्रणांच्या माध्यमातून जलसंधारणाची विविध कामे घेण्यात आली.
ग्रामपंचायतीने या कामांसाठी विशेष पुढाकार घेतला. गावतळ्यातील गाळ काढल्याने 6 टीसीएमने क्षमता वाढली आहे. तळ्यातील गळती रोखण्यासाठी मातीचा थर देण्यात आला असून सांडव्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.एकूण 436 मनुष्य दिवस एवढे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आले आणि त्यासाठी एक लाख 21 हजार रुपये खर्च करण्यात आला. प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्तीचे कामासाठी सहकार्य मिळाले.
वन विभागाने पाच ठिकाणी वनतळे निर्माण केल्याने शिवारातच पाणी जिरणार आहे. या कामावर सुमारे 15 लाख खर्च करण्यात आला. डोंगरमाथ्यावर सीसीटीची देखील कामे घेण्यात आल्याने माथा ते पायथा पाणी अडविण्याचे काम झाले आहे.
कृषी विभागाने 5 हेक्टर क्षेत्रावर मजगीची कामे केली. तसेच 3 हेक्टरवर खोल सलग समतल चर खोदण्यात आले. या सर्व कामांवर एकूण 3 लाख रुपये खर्च करण्यात आला असून 16 टीसीएम साठवण क्षमता निर्माण झाली आहे.
जलयुक्त शिवार योजनेमुळे गावातील पाण्याची समस्या कायमची दूर होईल असा ग्रामस्थाना विश्वास वाटत असल्याचे ग्रामसेवक दीपक कोतवाल यांनी सांगितले. एकूणच जलयुक्त शिवार योजना गावासाठी वरदान ठरली आहे.
लेखक: डॉ.किरण मोघे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020