पेठ तालुक्यात जोगमोडी गावातील दुर्गम भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे झाल्याने पीक पद्धतीत बदल घडून आला आहे. रब्बीचे क्षेत्र 40 हेक्टरने वाढले असून आदिवासी ग्रामस्थांच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जोगमोडी गावाचा समावेश 2016-17 च्या आराखड्यात करण्यात आला होता. अवघ्या तेराशे लोकसंख्येच्या या गावात ग्रामस्थांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. डोंगराचा उताराचा भाग असल्याने अधिक पाऊस होऊनही येथे ऑक्टोबर नंतर पाणी टंचाई जाणवत असे. त्यामुळे कृषी उत्पादनालाही मर्यादा होत्या. शेतकऱ्यांना बहुतेकवेळा खरीपावरच अवलंबून राहावे लागे. भात, नागली, वरई ही येथील प्रमुख पीके होती. अल्प प्रमाणात उडीद, तूर, खुरसणीचे पीक घेण्यात येईल.
विविध यंत्रणांमार्फत जलयुक्तची कामे करण्यात आल्यानंतर परिस्थितीत बराच बदल झाला. गावात कृषी विभागामार्फतएक दगडी बांध तयार करण्यात आला. मजगीची 18 कामे केल्याने ज्याठिकाणी केवळ गवत वाढले होते त्याचठिकाणी शेत बहरलेले दिसत आहे. लघु सिंचन विभागामर्फत 4 साखळी सिमेंट बांध तयार करण्यात येत आहेत.
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत बंधारा दुरुस्तीची चार कामे करण्यात आली आहेत. वन विभागामार्फत सात वनतळे तयार करून पाणी जिरविण्यात आल्याने विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. ग्रामपंचायतीनेदेखील या कामात पुढाकार घेत वृक्ष लागवड, भात खाचर दुरुस्ती, गाळ काढणे आणि विहिरी पुर्नभरणाची कामे केली आहेत. अशी एकूण 37 कामे झाल्याने शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले असून ग्रामस्थांमध्ये त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.
पावसाळ्यानंतर लगेच अटणारा नाला नोव्हेंबर महिन्यातही वाहता झाला आहे. वहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. पाण्याची उपलब्धता झाल्याने रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. तर भुईमुग, टोमॅटो, भोपळा, मिरची अशी पीके इथला शेतकरी घेऊ लागला आहे.
तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार आणि कृषी सहाय्यक सुरेश शेळके यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला पीकासाठी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर रब्बीतील गव्हाच्या पीकासाठी 50 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आदिवासी शेतकऱ्यांना पिकाबाबत माहिती मिळत असल्याने ते उत्साहाने रब्बीकडे वळले आहेत. खरीपातदेखील एक हेक्टरवर भुईमुग, दहा हेक्टवर टोमॅटो, सात हेक्टरवर भोपळा आणि तीन हेक्टरवर मीरचीचे पीक घेण्यात आले आहे.
अभियान राबविण्यापूर्वी अभियान राबविल्यानंतर |
अभियान राबविल्यानंतर |
||
रब्बी हंगामातील क्षेत्र (हे.) |
रब्बी हंगामातील क्षेत्र (हे.) |
||
गहु |
00 |
गहु |
10.30 |
हरभरा |
8.80 |
हरभरा |
14.90 |
भोपळा |
00 |
भोपळा |
13.500 |
टोमॅटो |
00 |
टोमॅटो |
5.15 |
मिरची |
00 |
मिरची |
3.08 |
भेंडी |
00 |
भेंडी |
1.25 |
एकूण |
8.80 |
एकूण |
48.23 |
यादव भोये, वडबारी- पूर्वी सगळी पडीत जागा होती. सर्वत्र गवत मोठे व्हायचे. केवळ पावसाच्या पाण्यावर कुळीथ, नागली अशी थोडी शेती व्हायची. उत्पन्न काहीच मिळायचे नाही. कृषी विभागाने गट तयार करून शेतीसाठी सहकार्य केले. जलयुक्तमुळे पाणीदेखील उपलब्ध झाले. आता भोपळा, टोमॅटोमुळे उत्पन्न वाढले आहे. मे महिन्यापर्यंत पाण्याची समस्या जाणवत नाही. |
-डॉ.किरण मोघे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020