अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाने विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान विकसित केले आहे, त्यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत 1.5 ते 2 मीटरपर्यंत वाढ 2 ते 3 वर्षे कालावधीत झाल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या काळात विहीर पुनर्भरणाची तयारी करावी.
मागील काही वर्षांपासून पाऊसमान कमी झाल्यामुळे पिकांसाठी विहिरीतून पाण्याचा उपसा वाढलेला आहे. विहिरीत पाणी असल्यास त्याचा उपसा अनियंत्रित होत आहे; परंतु त्या प्रमाणात पाण्याचे पुनर्भरण होत नसल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्यात बहुतांश विहिरी कोरड्या झालेल्या दिसतात. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्याच्या काळात विहीर पुनर्भरणाचे नियोजन करणे आवश्यक आहे.
1) शेतकऱ्यांनी शेतजमिनीतून वाहणारे पावसाचे पाणी एकत्रितपणे वळवून विहिरीजवळ आणावे. या पाण्याचा उपयोग विहीर पुनर्भरणासाठी करावा; परंतु हे पावसाचे वाहणारे पाणी सरळ विहिरीत सोडू नये, कारण वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात माती, गाळ मिश्रण असते. जर असे पाणी सरळ विहिरीत सोडले तर विहिरीत गाळ साठत जातो.
2) या सयंत्रात दोन प्रकाराच्या गाळण यंत्रणा आहेत. यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर येणारा गाळ अडविला जातो. शुद्ध पाणी विहिरीत सोडले जाते.
3) शेतकऱ्याने आपल्या शेताच्या रचनेनुसार पावसाचे वाहते पाणी गाळण यंत्रणेकडे वळवावे.
4) शेतातील पाणी सरळ टाक्यात घेण्याऐवजी टाक्याबाहेर एक साधा खड्डा करून त्यात रेती, दगड गोटे टाकावेत. त्यातून एका पीव्हीसी पाइपचे पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे.
5) शेताकडील चारीद्वारा वाहणारे पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे.
मुख्य गाळण यंत्रणेच्या अलीकडे 1 मीटर x 1 मीटर x 1 मीटर आकाराची दुसरी टाकी बांधावी. त्याला प्राथमिक गाळण यंत्रणा असे म्हणतात.
6) शेतातून वाहत येणारे पाणी प्रथम या टाकीत घ्यावे. तेथे जड गाळ खाली बसून, थोडे गढूळ पाणी पीव्हीसी पाइपच्या माध्यमातून मुख्य गाळण यंत्रणेत सोडावे.
7) विहीर पुनर्भरण मॉडेलच्या दुसऱ्या भागाला मुख्य गाळण यंत्रणा असे म्हणतात. ही यंत्रणा विहिरीपासून 2 ते 3 मीटर अंतरावर बांधावी. यासाठी 1.5 मी. लांब x 1.5 मी. रुंद आणि 1.5 मी खोल खड्डा करावा. याला आतून सिमेंट विटाचे बांधकाम करून टाकीसारखे बांधून घ्यावे.
8) मुख्य गाळण यंत्रणेच्या खालील भागातून चार इंच व्यासाचा पीव्हीसी पाइप विहिरीत सोडावा. या टाकीत 30 सें.मी. उंचीपर्यंत मोठे दगड नंतर 30 सें.मी. उंचीपर्यंत छोटे दगड व त्यानंतर 30 सें.मी. जाडीचा वाळूचा थर टाकावा. असे 90 सें.मी. जाडीचे गाळण थर असावे. त्यावरील 60 सें.मी. भागात पाणी साठते. या गाळण यंत्रणेमार्फत पाणी गाळले जाऊन विहिरीत जाते.
1) साधारणतः दोन एकर क्षेत्रातून वाहणारे पावसाचे पाणी विहीर पुनर्भरणासाठी वापरले तर निश्चितच 2 ते 3 वर्षांत विहीर पाणीपातळीत 1.5 ते 2 मीटरपर्यंत वाढ दिसून येते.
2) पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकतो. उपलब्ध पाण्याचा वापर तुषार सिंचनाच्या माध्यमातून केल्यास पिकांचे शाश्वत उत्पादन मिळू शकते.
3) शेतकऱ्यानी स्वतः वाळू, विटा, सिमेंट खरेदी करून बांधकाम केल्यास 12,000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. एकदा हे बांधकाम व्यवस्थित केले, तर त्याचे आयुष्यमान 12 ते 15 वर्षे राहते. फक्त दर दोन वर्षांनी गाळण टाकी आणि साहित्याची स्वच्छता करावी.
संपर्क - मदन पेंडके, 9890433803.
(लेखक अखिल भारतीय समन्वीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्र,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत - अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
भात रोपांचे वय आठ ते बारा दिवसांचे म्हणजे रोपे दोन...
यावर्षी खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे ब-याच क...
कर्ण रोपण तंत्रज्ञान (Cochlear Implant) हे एक अत्य...
विविध सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी सेवांचे वितरण अ...