অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उत्तम स्वास्थ्यासाठी पोषक आहार

उत्तम स्वास्थ्यासाठी पोषक आहार

शेतकरी शेतात राबतो, चटणी, भाकरी खाऊन दोन वेळची भूक भागवितो, मात्र या आहारातून त्याच्या शरीराला आवश्‍यक ते पोषक घटक खरंच मिळतात? पुरेसे नाही. मग त्यासाठी आहारात काय हवे, ते माहिती करून घ्यायलाच पाहिजे. कारण पोषक आहार घेतला तरच स्वास्थ्य उत्तम राहील.

देशाच्या संरक्षणाची धुरा जशी आपल्या जवानांवर असते, त्याचप्रमाणे संपूर्ण देशाच्या आरोग्याची व पोषणाची धुरा शेतकऱ्यांवर आहे, म्हणूनच शेतकऱ्याला सर्वांचा अन्नदाता असे म्हटले जाते. शेतकरी निसर्गावर आणि दैवावर हवाला ठेवून शेतात राबतो आणि आपल्या घामाचे मोती पिकवतो, तेव्हा कुठे तमाम जनतेला अन्नधान्य मिळते. सर्वांसाठी राबणारा हा महत्त्वाचा घटक आपल्या स्वतःच्या आहाराबाबत तितकी काळजी घेतो का? उत्तर कदाचित नाही असे असेल. तर मग याविषयी जाणून घ्यायला हवे.

सकाळी उजाडल्यापासून ते सूर्यास्तापर्यंत शेतकरी शेतात राबत असतो. दुपारचे जेवण शेतावरच घेतो. विविध भाग म्हणजे मावळ, विदर्भ, नगर, कोकण इथे काही ठिकाणी भात उत्पादन जास्त होते, तर काही ठिकाणी ज्वारी किंवा बाजरी! त्याच प्रकारची धान्ये शेतकऱ्यांच्या आहारात असतात. कोकणातील शेतकरी सकाळी न्याहारीला तांदळाची भाकरी घेतो आणि त्याचबरोबर झुणका! दुपारी जेवणालादेखील तांदळाची भाकरी, भात, डाळ आणि कडधान्याची उसळ, क्वचित एखादी फळभाजी असते. जिथे ज्वारी, बाजरी होते ते भाकरीसाठी तांदळाऐवजी ज्वारी, बाजरीचा वापर करतात. रात्रीचे जेवणदेखील दुपारसारखेच घेतले जाते. शेतकऱ्यांचा हा आहार तसा सात्त्विक आणि साधा असतो. या आहाराची तुलना जर शहरवासीयांच्या आहाराशी केली तर आपल्याला काही गोष्टींतील फरक लगेचच जाणवेल. पहिली गोष्ट म्हणजे शहरवासीयांप्रमाणे शेतकऱ्यांना अनेकविध पदार्थ सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि एका मर्यादेतच त्यांचा आहार राहतो. बऱ्याचदा जे काही उपलब्ध आहे त्यावरच त्यांचा आहार अवलंबून असतो.

एक चांगली गोष्ट म्हणजे शारीरिक श्रम आणि साधा आहार यामुळे शहरी जीवनशैलीशी संबंधित विकार (जसे - मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार) यांना "पूरकता' इथे असत नाही. याउलट हा आहार काही प्रमाणात एकांगी आणि कुपोषण निर्माण करणारा किंवा अपूर्ण असा असू शकतो.

आहार कुठे कमी पडतोय?

  • आहारातील उष्मांक किंवा कॅलरीज : भरपूर शारीरिक श्रम करणाऱ्या शेतकऱ्याला दिवसभरात साधारण ३५०० ते ३८०० कॅलरीजची गरज आपल्या रोजच्या अन्नातून भागायला हवी असते, परंतु काही शेतकऱ्यांशी बोलून वरीलप्रमाणे त्यांचा आहार लक्षात घेतला तर त्यांच्या एकूण कॅलरीज दिवसाला जेमतेम २००० ते २५०० एवढ्याच झाल्या.
  • आहारातील प्रथिने : साधारण ६० ग्रॅम प्रथिनांची गरज दररोज असते आणि जे शेतकरी आहारात झुणका, डाळी व कडधान्ये घेतात त्यांचीही गरज दररोज भागली जाते. मांसाहार आठवड्यातून दोन-तीन वेळा केला जात असेल, तर उच्च दर्जाची प्रथिनेदेखील मिळू शकतात. दूध-दह्याचा मात्र अभाव असल्याने त्यातून मिळणारी उच्च प्रथिने आणि जीवनसत्त्व बी-१२ यांची कमतरता होऊ शकते.
  • ताज्या फळभाज्या, फळे, पालेभाज्या यांचा अभाव : काही शेतकऱ्यांकडे या पदार्थांचे नियमित सेवन केले जाते, पण अनेकांकडे मात्र यांचे सेवन अभावानेच होते असे दिसते. यामुळे आहारात लोह, फॉलिक ऍसिड, रायबोफ्लेविन, जीवनसत्त्व "अ' यांची कमतरता निर्माण होते. काही ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणातून १७ टक्के पुरुषांमध्ये, तर ५० टक्के मुले आणि स्त्रियांत ऍनिमिया किंवा अंगात रक्त कमी असण्याचा दोष आढळून आला आहे. याचे मुख्य कारण आपला अपूर्ण आहार आहे याची नोंद घ्यावी.
  • आहारात कमी असणारी विविधता : विविध पदार्थांतून विविध पोषक घटक आपणास मिळत असतात आणि शरीराची ती गरज असते. जवळपास विविध पदार्थांची नसलेली उपलब्धता आणि एकाच प्रकारचे जेवण यातून परिपूर्ण आहार मिळणे कठीण होते. यासाठीच सर्वप्रथम स्त्रियांनी आहार पोषणाविषयी जाणून घेणे आवश्‍यक आहे. जवळपास ५० टक्के महिलांमध्ये रक्त कमी असते, यामुळे त्यांना थकवा जाणवणे, भूक मंदावणे, चक्कर येणे असा त्रास होतो.

सर्वेक्षणात असे आढळले आहे, की शहरामध्ये अति बारीक स्त्रियांचे प्रमाण २७ टक्के, तर गावात ते ४६ टक्के आहे. याउलट शहरवासी स्त्रियांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण गावाकडच्यापेक्षा जवळजवळ तिप्पट आहे. पुरेसा आहार न मिळाल्याने कुपोषण तयार होते, त्यातून अनेक गोष्टी घडू शकतात. लोह कमी झाल्याने थकवा जाणवतो. अंगातील कॅल्शिअम कमी झाले तर हाडे ठिसूळ होऊ शकतात. पूर्ण आहार मिळाला नाही तर एकंदरच रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन संसर्गजन्य आजार पटकन होतात. एवढेच नव्हे तर शरीरास व्यवस्थित पोषण मिळाले नाही तर आजारी पडल्यास "बरे होण्याचा काळ' लांबणीवर पडू शकतो.

आहारात काय हवे?

  • शरीरातील उष्मांक वाढविण्यासाठी आहारात फळे, केळी, चिकू, भाज्या, बटाटे, रताळी यांचा समावेश करावा, तसेच प्रथिनयुक्त पदार्थ जसे - दूध, दही, अंडी. चिकन, कडधान्ये यांचे आहारातील प्रमाण वाढवावे.
  • आहारात नाचणी, बाजरी, मका, ज्वारी, गहू, सोयाबीन पोह्यांचा आलटून-पालटून वापर करावा.
  • अंगणात, परसात छोटीशी "परसबाग' तयार करावी. त्यातून घरासाठी पालेभाज्या, टोमॅटो, भेंडी मिळू शकतील.
  • नाचणीचे पापड, सांडगे, तिळाची चटणी आहारात वापर करावा.

 

(लेखिका मानवी आहारविषयक तज्ज्ञ आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate