शेतमालाची किंमत ठरविण्याचे स्वातंत्र्य हा युरोप आणि आपल्या शेती व्यवस्थेतील मुख्य फरक आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, नेदरलॅंड या चारही देशांमध्ये शेतकरीच त्यांच्या शेतमालाची विक्री किंमत ठरवतात. सर्व शेतमाल पॅकिंगमध्येच विकला जातो. पॅकिंगवर मालाचे वजन, किंमत लिहिलेली असते.
काढणीपश्चात तंत्रज्ञानावर युरोपमधील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. प्रतवारी, पॅकिंग आणि लेबलिंग ही युरोपमधील शेतकऱ्यांची दैनंदिन गोष्ट आहे. शेतमाल सुट्टा विकायचा नाही, हे तेथील शेतकऱ्यांच्या रक्तात भिनलेले आहे. सर्व शेतमाल प्लॅस्टिक पॅकिंग, पेपर पॅकिंग किंवा जैवविघटनशील प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग केलेला असतो. शेतमाल आहे त्याच किमतीला विकत घ्यायचा, सौदेबाजी करायची नाही, हे तेथील ग्राहकांच्याही रक्तात भिनलेले आहे. आपल्याकडे याउलट परिस्थिती आहे. बहुसंख्य शेतकरी काढणीपश्चात बाबींकडे दुर्लक्ष करतात. थेट विक्री पद्धतीतून ही परिस्थिती बदण्यास आपल्याला मोठा वाव आहे.
युरोपच्या 10 दिवसांच्या प्रवासात चारही देशांमध्ये आम्हाला कुठे एखादा किडा किंवा चिलटं दिसली नाहीत. सर्व अवस्थांमधील पिकांवरही कुठे किडीचा, रोगांचा प्रादुर्भाव दिसला नाही. वातावरणच एवढे स्वच्छ व निर्मळ आहे, की पिकांवर कुठल्याही प्रकारची रोगराई नसावी. फुलांवर आलेले बटाटे; पण एक पानही किडीने चाटलेले नव्हते. यामुळे त्यांच्याकडे कीटकनाशके, बुरशीनाशकांचा वापर नगण्य; तर तणनाशकांचा वापर जास्त असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आपल्याकडे उत्पादनखर्चाचा मोठा भाग फक्त कीड व रोग आटोक्यात ठेवण्यासाठी होतो. हा ताण येथील शेतकऱ्यांना नाही.
शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा कशा प्रकारच्या हव्यात, याचा आदर्श वस्तुपाठ नेदरलॅंडने दाखविला आहे. या देशाचा निम्म्याहून अधिक भूभाग समुद्रात मातीचा भराव टाकून तयार केलेला आहे. या जमिनीवर त्यांनी हरितगृहे उभारली आहेत. यामध्ये भाजीपाला व फुलांचे उत्पादन घेतले जाते. फुलांच्या विक्रीसाठी अल्समीर येथे जगातील सर्वांत मोठा अत्याधुनिक फुलबाजार उभारला आहे. फुलांच्या विक्री व वितरणासाठीच्या सर्व प्रकारच्या सेवा या बाजारात अतिशय झटपट पुरवल्या जातात. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बाजारचे कामकाज पूर्ण होते. बाजारापासून अवघ्या दहा किलोमीटरवर फुलांच्या वाहतुकीसाठी विमानतळ आहे.
1) युरोपियन शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती यांत पराकोटीची भिन्नता आहे. त्यांच्या शेतकऱ्याला प्रत्येक गोष्ट त्याने मागितली तशी किंवा हवी तशी मिळते. आपली लढाई सात बारापासून सुरू होते. आयात, निर्यात, बाजारपेठ संरक्षण, अनुदाने, पायाभूत सुविधा या सर्वच आघाड्यांवर तेथील शेतकऱ्यांना शासनाचे सहकार्य मिळते.
2) बहुतांश युरोपीय शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्यावर कुठल्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. शेतीसाठी पाणी, हा विचारही त्यांना करावा लागत नाही; कारण संपूर्ण शेतीच निसर्गाधारित आहे. निसर्ग पूर्णपणे अनुकूल आहे.
1) युरोपमधील देशांनी सौर ऊर्जानिर्मितीवर खूप भर दिला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन, अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांकडे निर्माण होणारी वीज विकत घेण्यासाठीही सक्षम यंत्रणा उभारण्यात आली आहे.
2) त्यांच्याकडे सहा ते सात महिनेच सूर्यप्रकाश असतो. रात्रही मोठी असते; तरीही त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प थेट शेतकऱ्यांच्या शेतावर उभारले आहे.
3) आपल्याकडे दहा महिने चांगला प्रखर सूर्यप्रकाश असतो, दिवसाचा कालावधीही जास्त असतो. पाण्याची उपलब्धता कमी, पिके चांगली येत नाहीत, अशा भागांत सौर प्रकल्प उभारता येऊ शकतात. शेतकऱ्यांकडून जमीन विकत घेण्यापेक्षा त्यांची मालकी कायम ठेवून भागीदार म्हणून शेअर देऊनही चांगले प्रकल्प उभारले जाऊ शकतात. यासाठी युरोपीय देशांप्रमाणेच शासनाने शेतकऱ्यांना दीर्घकालीन सहकार्य देणे अत्यावश्यक ठरेल.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
येथील शेतकऱ्यांनी विजेची स्वतःच्या शेतावरच निर्मित...
शेतीतील सामुदायिक कामाचे महत्त्व शेतकऱ्यांचे हाडीम...