तत्त्वज्ञान सांगणे हे विचारवंतांचे काम मानले जाते; पण तत्त्वज्ञानाचे आचरण करणे अशा पंडितांना जमेलच असे नाही. भगवद्गीतेत कृष्णाने कर्मयोग तत्त्वज्ञान सांगितले आहे. महाभारतात अनेक ठिकाणी त्याचा विस्ताराने उल्लेख आला आहे. त्यात गूढवाद वा श्रद्धा नाही, तर ते पूर्णपणे बुद्धिवादी तत्त्वज्ञान आहे. कर्म करणे आपल्या हाती आहे. कर्माचे फळ आपल्या हाती नाही. कर्माचे फळ होण्यासाठी आणखी घटक लागतात, त्यावर आपले नियंत्रण नसते. महाभारतात श्रीकृष्णाने हा कर्मयोग स्पष्ट करताना शेतकऱ्याचेच उदाहरण दिले आहे. शेतकरी जमिनीची मशागत करतो. चांगले बियाणे, चांगले खत वापरतो. मेहनत करतो, आवश्यक ते सर्व काही बरोबर करतो; पण एखाद्या वर्षी पाऊस पडत नाही. पीक येत नाही, मोठे नुकसान होते; पण अशा स्थितीतही शेतकरी हताश होत नाही. तो पुन्हा पेरणी करतो. शेतकरी हा स्वभावतःच कर्मयोगी आहे, असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. शेती हा व्यवसायच असा आहे, की यश आपल्या हातात नाही. सर्व काही निसर्गावर अवलंबून आहे.
शेतकरी हा जन्मतः स्वभावतः कर्मयोगी आहे. एखाद्या कर्माचे फळ मिळण्यासाठी अनेक घटकांचा समावेश असतो. पावसाची अनिश्चितता ही अनादी काळापासून आहे. नापिकी किंवा दुष्काळ हा काही नवीन नाही, याची जाणीव ठेवावी. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्वेग करू नये. निराश न होता परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत. आपली शेती पावसावर अवलंबून आहे. कधी अपुरा पाऊस पडतो, तर कधी पडतच नाही. जेथे पाऊस पडतो तेथे पाणी वाहून जाते. 15व्या शतकामध्ये दुर्गा देवीचा भीषण दुष्काळ आला होता. संत तुकाराम महाराज यांच्या काळातही दुष्काळ पडला होता.
दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान ।
स्त्री एक अन्न अन्न करीता मेली ।।
या शब्दात तुकोबांनी भोगलेल्या दुष्काळातील प्रसंग सांगितला आहे. दुष्काळ कुणाला चुकला नाही. तुकोबांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावे. शेतकरी हा मुळातःच झुंझार असतो. निसर्गाशी लढण्याची ताकद अंगी असते. संकटाच्या काळात खचून न जाता, वाईट विचार न करता, श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगाचे आचरण करत ठामपणे उभे ठाकले पाहिजे. या अडचणीच्या काळावरही मात करता येईल. हे दिवसही जातील.
- प्रा. डॉ. सदानंद मोरे,
अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन.
(शब्दांकन : संतोष डुकरे)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे...
या दौऱ्यामध्ये युरोपातील शेतीची आधुनिकता, पूरक व्य...
जिद्द, चिकाटी, मेहनत व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची...
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतक...