অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंद्रिय शेतीला प्राधान्य पर्यावरणाला जीवदान

सेंद्रिय शेतीला प्राधान्य पर्यावरणाला जीवदान

प्रस्तावना

रासायनिक कीडनाशकांच्या असंतुलित वा बेसुमार वापराने जैवविविधता, पक्षी यांना हानी पोचत आहे, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. सेंद्रिय शेतीवर अधिकाधिक भर देऊन पर्यावरण सुरक्षा साधली पाहिजे. त्यातूनच देशाच्या शेती अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.

सेंद्रिय शेतीला प्राधान्य

निसर्गात प्रत्येक जीव जगण्याची धडपड करण्यात गुंतलेला असतो. यात जो प्रबळ ठरतो तोच यशस्वी होतो. दुर्बल घटक नामशेष होतात, अशीच परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून जगातील काही देशांची अर्थव्यवस्था कोलमडल्याने झालेली दिसत आहे. भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मात्र अलीकडील काळापासून देशातील शेती अर्थव्यवस्था ढासळायला सुरवात झाली आहे. याचे मुख्य कारण शेतीतील दुष्काळ, गारपीट आदी समस्या. रासायनिक कीडनाशकांच्या प्रदूषणामुळे शेतातील पक्ष्यांची संख्या घटत चालली आहे, त्यामुळे पक्ष्यांद्वारा होणारे कीड नियंत्रण कोलमडले आहे. साहजिकच किडींचा प्रादुर्भाव वाढत असलेला दिसून येत आहे. पक्ष्यांद्वारा होणाऱ्या पीक परागीभवनाचा वेगही मंदावल्यामुळे पिके मरणयातना भोगत आहेत.

पक्ष्यांच्या घटलेल्या संख्येमुळे कीड नियंत्रणाच्या नियोजनावर भरमसाठ खर्च करावा लागत आहे. खर्च करून उपयोग तर होताना दिसत नाही. या उलट फवारणी केलेल्या रसायनांचे दुष्परिणाम जैवविविधतेबरोबर मानवी आरोग्यावर होताना दिसत आहेत. देशात सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत असताना दुसरीकडे शेतीसाठी उपयुक्त असलेल्या गोधनाची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे, त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. पाणीवापरावर बरेच शेतकरी म्हणावे तसे लक्ष देत नाहीत; परंतु पाणी आणि जमीन यांचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणाल तर ते दोघे भाऊ-बहीण आहेत. पंजाब हे देशाचे धान्याचे कोठार आहे. या कोठारातील जमीन आता मरणयातना भोगते आहे. रासायनिक खते, कीडनाशके, पाण्याचा असंतुलित वापर यामुळे पंजाबात मोठ्या प्रमाणात जमीन खराब होत चालली आहे. या जमिनीचा पोत मृत होत गेल्यावर भविष्यातील संकट न सांगण्यासारखे ठरेल. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतील नदीकाठांवरील जमिनीही अतिशय क्षारयुक्त व चोपण झालेल्या दिसत आहेत. यामुळे जमिनीच्या पोटामध्ये असलेली गांडुळे, सूक्ष्मजीव सृष्टीवर त्याचा परिणाम जाणवू लागलेला आहे. या सर्वांचा ठेवा जपून ठेवण्याचा सल्ला काही वर्षांपूर्वी अनुवंशशास्त्रज्ञ चार्लस्‌ डार्विन यांनी संशोधनाअंती जगाला दिला आहे.

लाभकारक सूक्ष्मजीव, गांडूळ, मधमाशी, पक्षी, देशी गाय यांचा समतोल पूर्ण गेल्यास जीवसृष्टीचे चक्र बदलेल व विनाशाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. म्हणून दिशादर्शक उपाययोजना करण्यासाठी शासनाने व जनतेनेही त्वरित पाऊले उचलायला हवीत. ढासळलेला पर्यावरणाचा समतोल सुधारणे व घटलेली पक्ष्यांची संख्या वाढविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यातूनच जैविक कीड नियंत्रण होईल, त्यामुळे पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पादनात वाढ झालेली दिसेल. याचाच फायदा देशातील प्रत्येक नागरिकास होऊन देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यावर झालेला दिसून येईल.

पक्ष्यांच्या कार्याची ओळख खालील चार ओळींतून देण्याचा प्रयत्न केला आहे.

काळ्या भुईवरील किडे-मकोडे 
वेचूनी निरोगी ठेवतो इवलासा पक्षी 
पृथ्वीवरील देवदूत तू 
तुला माय भूमी कवटाळे ! 
विष पिते ही अनाथ भुई 
तेव्हा तूच तिला सांभाळे...!

खालील उपाययोजना ठरतील प्रभावी

  1. पक्ष्यांच्या शिकारीतून असंख्य पक्षी मारले जातात. अशा पद्धतीने होणारी शिकार त्वरित थांबवावी. अन्यथा, पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्यास उशीर लागणार नाही.
  2. रासायनिक कीडनाशके वापरताना जैवविविधतेची हानी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
  3. रासायनिक कीडनाशक कंपन्या कीडनाशक नियमांचे उल्लंघन करणार नाहीत यावर शासनाने लक्ष ठेवावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक व कायमस्वरूपी कार्यवाही करण्याची नितांत गरज आहे.
  4. शासन स्तरावर स्वतंत्र विभाग स्थापन करून सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार करण्यावर भर देण्याची गरज.
  5. कीडनाशकांच्या अनियंत्रित फवारण्या शेतात केल्या जातात. फवारणी केलेल्या पिकावर पक्षी येतात व विषबाधा होऊन त्यांना हानी पोचते. यावर जनजागृती होणे गरजेचे आहे.
  6. कीडनाशकांचा वापर लेबल क्‍लेमनुसार होणे आवश्‍यक आहे.
  7. प्रत्येक शेतकऱ्याने थोड्या प्रमाणात का होईना पक्ष्यांना खाण्यासाठी अंगणात धान्य व पाणी ठेवावे.

 

संपर्क : दत्तू ढिकले - 7588551117
(लेखक (जि. नाशिक) येथील प्रयोगशील सेंद्रिय उत्पादक शेतकरी आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate