অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ढगाळ वातावरणात कीड-रोग

गहू

  1. ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. नियंत्रणासाठी थायोमेथोक्‍झाम 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  2. पानावर दव टिकून राहिल्याने पानांवर नारिंगी तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. - डॉ. कल्याण देवळाणकर : 02550-241023 कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक

हरभरा

  1. सध्याच्या काळात घाटे अळी (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) प्रादुर्भाव वाढणार आहे. अळी लहान अवस्थेत असेल, तर नियंत्रणासाठी हेलिओकील 500 मि.लि. 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारावे किंवा क्विनॉलफॉस दोन मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अळी मोठ्या अवस्थेत असेल, तर रॅनॅक्‍झीपार दोन मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  2. दाट धुक्‍यामुळे हरभरा फूलगळ होऊ शकते. या काळात तुषार सिंचनाने पाणी द्यावे किंवा फवारणी पंपाने पिकावर पाणी फवारावे. त्यामुळे पानावरील धुके निघून जाईल. - डॉ. एल. बी. म्हसे 9420752137 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ज्वारी

ढगाळ वातावरणामुळे ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. मावा कीड पाने खरवडते. त्यातून साखरयुक्त द्रव बाहेर येतो. या चिकट द्रवावर बुरशी वाढते. त्यामुळे धान्य आणि कडब्याची प्रत खालावते. या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 10 मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रीड (17.8 टक्के प्रवाही) तीन मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संपर्क : आर. एल. औंढेकर : 9096368539 कृषी सहायक, ज्वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

डाळिंब सल्ला

सध्या अनेक ठिकाणी ढगाळ व पावसाळी वातावरण आहे. अशा वातावरणात डाळिंब बागेमध्ये तेलकट डाग रोगाचा प्रसार होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी महात्मा फुल कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. बुरशीनाशक --- बहर धरलेला असताना --- बाग विश्रांती अवस्थेत असताना - बॅकट्रीनाशक (2 ब्रोमो 2 नायट्रो 1-3 डायोल)--- 25 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी --- 50 ग्रॅम प्रति 100 लिटर - कॅप्टन --- 250 ग्रॅम प्रति 100लि. --- 500 ग्रॅम प्रति 100 लिटर - बोर्डो मिश्रण --- अर्धा टक्के (फळे सुपारी अवस्थेच्या पुढे असतील तरच) --- एक टक्का दरवेळी ढगाळ वातावरण असताना शक्‍यतो यापैकी एका बुरशीनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी. - या व्यतिरिक्त बागेमध्ये ब्लिचिंग पावडर एकरी 20 किलो किंवा कॉपर डस्ट एकरी 8 किलो या प्रमाणात धुरळणी करावी किंवा एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी जमिनीवर घ्यावी. - प्रा. संतोष मरभळ, 02555- 235555 (डाळिंब संशोधन व प्रसार केंद्र, लखमापूर, जि. नाशिक)

मोसंबी

ज्या मोसंबी बागांमध्ये गारपीट झाली त्या बागांमधील मृग बहराच्या फळांना इजा होऊन मोठ्या प्रमाणात फळगळ होईल, तसेच ताणावर सोडलेल्या बागांना ताण न बसता ताण तुटल्यामुळे त्याचा परिणाम आंबे बहराच्या उत्पादनावर हाईल. इजा झालेल्या फळांवर बुरशीची वाढ वाढून बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढेल.याचे नियंत्रण करण्यासाठी कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून तत्काळ फवारणी करावी.

आंबा

आंबा पिकामध्ये अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्‍झाकोनॅझोल (20 ईसी) 5 मि.लि. किंवा डिनोकॅप 7 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. - डॉ. संजय पाटील, 9822071854 (प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद) संत्रा सल्ला : सध्या सगळीकडे गारपीट व अवकाळी पाऊस झाला आहे. तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यासाठी तातडीची म्हणून खालील फवारणी घ्यावी. कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम अधिक इथिऑन 2 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी. - डॉ. दिनकरनाथ गर्ग, 9822369030 (राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूर)

अंजीर

अंजिरावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानाच्या खालच्या बाजूने तांबूस विटकरी रंगाच्या पुळ्या आलेल्या सहज नजरेस दिसतील. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढलेली आहे. त्यामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढेल. ज्या भागामध्ये अंजिराची फळ (खट्टा बहर) झाडावरती आहेत, त्या फळांच्या वरतीसुद्धा तांबेरा रोगाची लक्षणे दिसतील. त्यामुळे फळांची प्रत खराब हाईल. पानावर आलेल्या तांबेरा रोगामुळे मोठ्या प्रमाणात पानगळ हाईल. याचा दुष्परिणाम फळ पोसण्यावर होईल. उपाययोजना : रोगनियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम आणि क्‍लोरथॅलोनिल 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारावे. पावसाची शक्‍यता असल्यास त्यामध्ये सर्फेक्‍टंटचा वापर करावा.

सीताफळ

ऍन्थ्रॅकनोज या बुरशीजन्य रोगाची तीव्रता वाढेल. याच्या प्रादुर्भावामुळे कोवळे शेंडे काळे झालेले दिसतील. उपाययोजना : रोगाच्या नियंत्रणासाठी एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

डॉ. श्रीहरी हसबनीस

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate