অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केळी पीक व्यवस्थापन सल्ला

राज्याच्या बऱ्याच भागात आता थंडी सुरू झाली आहे, त्यामुळे तापमान कमी होत आहे. मागील मृगबाग लागवड केलेल्या केळी बागेची मुख्य वाढीची अवस्था आहे. कांदे बाग लागवड झालेली आहे. केळीसाठी 16 ते 40 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. हिवाळ्यात तापमान 16 अंश सेल्सिअसच्याही खाली जाते. अशा तापमानाचा केळीच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

थंडीचा परिणाम

लागवडीवर होणारा परिणाम

उती संवर्धित रोपे जमिनीत रूजण्यासाठी 16 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान लागते. सध्या कांदेबाग लागवड झालेली आहे. जसजसा या लागवडीस उशीर होईल, तसतसे थंडी वाढल्याने रोपांच्या वाढीवर परिणाम होईल.

मुळावर होणारा परिणाम

उती सवंर्धित रोपाची कांदेबाग लागवड झालेली आहे; पण कमी तापमानामुळे मुळांची संख्या व लांबी कमी होते. तसेच कमी तापमानामुळे मुळांच्या अन्न व पाणी शोषणाची कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

पानांच्या वाढीवर होणारा परिणाम

केळीला सरासरी 3 ते 4 पाने प्रति महिन्याला येतात. थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग मंदावतो, त्यामुळे प्रति महिना 2 ते 3 पाने येतात, कमी तापमानामुळे पाने कमी अंतरावर येतात, त्यामुळे पानांचा गुच्छ तयार होतो. अशा परिस्थितीत पानांचा फारच कमी भाग सूर्यप्रकाशच्या संपर्कात येतो, त्यामुळे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. परिणामी झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादनावर परिणाम होतो.

केळीच्या झाडाच्या वाढीवार होणारा परिणाम

कमी तापमानामुळे झाडाची वाढ मंदावते, वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो. परिणामी केळी निसवण्याचा कालावधी लांबतो त्यामुळे एकूण उत्पादन खर्च वाढतो.

बुंध्यावर व घडावर होणारा परिणाम

कमी तापमानामुळे केळीच्या बुंध्यावर व घडाच्या दांड्यावर काळपट तपकिरी चट्टे दिसून येतात हे चट्टे वाढत जातात व घड सटकतो.

फळवाढीवर होणारा परिणाम

थंडीच्या काळात घडातील केळीची वाढ फार हळुवार होते. परिमाणी घड पक्व होण्याचा कालावधी 30 ते 40 दिवसांनी वाढतो, त्यामुळे घड काढणीस वेळ लागतो.

रोगाच्या प्रादुर्भावावर परिणाम

थंडीच्या काळात प्रामुख्याने केळीवर सिगाटोका व जळका चिरुट या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते.

उपाययोजना

  1. बागेच्या चोहोबाजूंनी वारा रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. काही शेतकऱ्यांनी कडेने गजराज, शेवरी, गिरीपुष्प या वनस्पतींची लागवड केली आहे, त्याचा चांगला परिणाम दिसतो आहे. यामुळे थंड वारे अडवले जाऊन केळी पिकाचे अति थंड वाऱ्यापासून संरक्षण होते.
  2. शेतात शिफारशीप्रमाणे शेणखत अथवा कंपोस्ट खत वापरावे.
  3. रासायनिक खतांचा शिफारशीनुसार वापर करावा. प्रामुख्याने पालाशचे प्रमाण योग्य असावे.
  4. खोडालगत आच्छादन करावे जेणेकरून, कमी तापमानाचा मुळांच्या वाढीवर परिणाम होणार नाही.
  5. थंडीच्या काळात शक्‍यतो रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे.
  6. रात्रीच्या वेळेस बागेच्या चोहोबाजूंनी काडीकचरा जाळून धूर करावा.
  7. रोपांचे वय 4 ते 7 महिने असताना बुंध्याजवळ घडाची सूक्ष्म निर्मिती होत असते. त्यामुळे तापमान 20 अंश से. ते 23 अंश सेल्सिअसपर्यंत संतुलित ठेवले तर घडाची निर्मिती चांगली होते. त्याकरिता सल्फरयुक्त खते वापरावीत. मॅग्नेशिअम सल्फेट व शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबकमधून द्यावीत. शक्‍यतो या काळात खांदणी करू नये.

 

डॉ. जी. एम. वाघमारे 
डॉ. एस. व्ही. धुतराज : 7588612632 
प्रा. आर. व्ही. देशमुख : 9421568674 
केळी संशोधन केंद्र, नांदेड.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate