हवामानात जागतिक स्तरावरील होत गेलेल्या बदलांमुळे मॉन्सूनच्या अंदाजाची गिल्बर्ट वॉकर यांची पद्धत १९८० च्या दशकात भारतासाठी अनेकवेळा अयशस्वी झाली.
१९८८ साली वसंत गोवारीकर यांच्या नेतृत्वाखाली विकसित केलेली ‘पॉवर रिग्रेशन’ आधारित एक गणिती प्रतिकृती भारतीय हवामान खात्याने वापरण्यास सुरुवात केली. त्यात १६ घटकांचा समावेश होता. त्यातील ६ घटक हवामान, ५ घटक हवेचा दाब, ३ घटक वाऱ्याचा वेग आणि २ घटक हे बर्फाच्या व्याप्तीशी संबंधित होते. उदा. अरबी समुद्राच्या पृष्ठावरील तापमान, पूर्व आशियातील हवेचा दाब आणि युरो-आशियातील बर्फाची व्याप्ती. त्या प्रतिकृतीला ‘गोवारीकर मॉडेल’ असे म्हटले जाते. त्यातील चार घटक २००० साली गणिती कारणांमुळे बदलणे भाग पडले. या पद्धतींनी केलेला मॉन्सूनचा अंदाज २००१ पर्यंत समाधानकारक होता. म्हणजे वर्तवलेल्या आणि प्रत्यक्षात पडलेल्या पावसाच्या मात्रेतील तफावत सांख्यिकीय दृष्टीने लक्षणीय नव्हती.
मात्र २००२ मध्ये तसा केलेला अंदाज सपशेल फसला – सामान्य मॉन्सून असेल असा अंदाज होता; पण प्रत्यक्षात अतिशय कमी पाऊस देशभर पडला. त्यामुळे २००३ साली मोठय़ा प्रमाणात या प्रतिकृतीत बदल करण्यात आले.
नवीन प्रतिकृतीत १० घटकांचा समावेश करण्यात आला असून त्यापकी आठ घटकांबाबत माहिती मार्च महिन्यापर्यंत मिळते, तर दोन घटकांबाबत माहिती जूनपर्यंत मिळवावी लागते. म्हणून भारतीय हवामान खाते आता मॉन्सूनबाबत पहिला अंदाज एप्रिलमध्ये आणि दुसरा अंदाज जूनमध्ये जाहीर करते. हे अंदाज एकूण भारत आणि त्याचे उत्तर-पूर्व, उत्तर-पश्चिम आणि व्दीपकल्प भाग अशा तिन्ही क्षेत्रांसाठी आतापर्यंत समाधानकारक आढळलेले आहेत.
जुल महिना हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण एकूण मॉन्सूनमधील पावसाचा एक तृतीयांश (३३ टक्के) पाऊस या महिन्यात पडतो. तरी जुल महिन्यासाठी एक विशेष प्रतिकृती निर्माण केली गेली आहे; जिचा वापरही समाधानकारक आढळलेला आहे.
मॉन्सूनच्या दूरगामी आणि इतर अंदाजाचे काम भारतीय हवामान खाते आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मीटिअरॉलॉजी, पुणेमधील हवामानशास्त्रज्ञ आणि इतर वैज्ञानिक करतात. त्या कामात महासंगणकाची मदतही घेतली जाते.
मात्र मॉन्सून प्रणाली मुळातच अति-जटिल असल्यामुळे त्याचा अंदाज सतत बदलत असलेल्या वातावरणात बिनचूकपणे वर्तवणे, हे आव्हान बराच काळ राहणार आहे.
लेखक :डॉ. विवेक पाटकर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२