অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मान्सूनसाठी मोजमापन

मान्सूनसाठी मोजमापन

मॉन्सून’ ही इंग्रजीतील संज्ञा ‘मोन्सो’ (पोर्तुगीज), ‘मावासिम’ (अरबी), ‘मौसम’ (िहदी) आणि ‘मोन्सुन’ (डच) अशा विविध शब्दांपासून तयार झालेली आहे. पृथ्वीवरील ध्रुवीय प्रदेश वगळता सर्व खंडात मॉन्सूनचा पाऊस आणि वारे वर्षांच्या वेगवेगळ्या काळात सक्रिय असतात. भारतासाठी आशियातील दक्षिण-पश्चिम मॉन्सून अतिशय महत्त्वाचा आहे. भारताच्या भौगोलिक रचनेमुळे त्याच्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन शाखा निर्माण होतात.

अरबी समुद्र शाखेचा मॉन्सून केरळच्या सुदूर किनाऱ्यावर सहसा १ जूनला येतो आणि सप्टेंबरअखेपर्यंत सक्रिय असतो. तो भारताचा दक्षिण-पश्चिम किनारी पट्टा ते पश्चिम घाट या मार्गाने उत्तरेकडे पुढे सरकतो. बंगाल उपसागर शाखेचा मॉन्सूनही त्याच सुमारास बंगालवरून पूर्व हिमालयाला धडक देऊन पश्चिमेकडे वळतो आणि वाटेतील गंगेच्या पठारातील प्रदेशांवर सक्रिय राहतो. याप्रकारे अगदी तुरळक भाग वगळता (उदा. राजस्थान) सर्व देशभर सदर चार महिन्यांत मॉन्सूनचा पाऊस पडतो.

उत्तर-पूर्व किंवा परतीचा मॉन्सून सप्टेंबरनंतर िहदी महासागराकडे येत असतानाही भारताच्या काही भागात पाऊस पडतो. उदाहरणार्थ तामिळनाडू राज्यात डिसेंबर ते मार्च या काळात दक्षिण-पश्चिम मॉन्सूनपेक्षाही अधिक पाऊस पडतो.

मॉन्सूनमुळे दुष्काळ किंवा ओला दुष्काळ या दोन्ही स्थिती निर्माण होऊ शकतात. तसेच आपले कृषिक्षेत्र प्रामुख्याने या पावसावर अवलंबून असल्याने मॉन्सूनबाबत अंदाज वर्तवणे, हे अतिशय महत्त्वाचे असते. या उद्देशाने १८७५ मध्ये भारतीय हवामान खाते स्थापन करण्यात आले. त्याचे पहिले संचालक एच. पी. ब्लॅनफोर्ड  यांनी हिमालयातील बर्फाच्या पातळीच्या मापनावरून मॉन्सूनबाबत अंदाज बांधण्यास सुरुवात केली. जॉन इलीयट यांनी १८९५ मध्ये त्या जोडीला भारतातील मॉन्सूनपूर्व काही विशिष्ट स्थानिक स्थिती आणि िहदी महासागरावरील बदलांना विचारात घेऊन पूर्वानुमानाची ती पद्धत सुधारली. गिल्बर्ट वॉकर यांनी त्यापुढे जात जागतिक स्तरावरील तापमान, हवेचा दाब आणि पावसाची पातळी हे घटक समाविष्ट करून सदर्न ओसिलेशन निर्देशांक (एसओआय) विकसित करून सांख्यिकीय सहसंबंध आधारित एक वस्तुनिष्ठ पद्धत भारतातील मॉन्सूनचे दूरगामी अंदाज मांडण्यासाठी १९२०च्या दशकात रुजवली. त्यांनी  ईशान्य (उत्तर-पूर्व), उत्तर-पश्चिम (वायव्य) आणि द्वीपकल्प अशा भारताच्या तीन क्षेत्रांसाठी स्वतंत्र अंदाज देण्यासही सुरुवात केली. विशेष म्हणजे वॉकर यांची ती पद्धत १९८०च्या दशकापर्यंत थोडय़ाफार फरकाने वापरात होती.

लेखक : डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate