অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय कृषी प्रकल्पास प्रारंभ

राष्ट्रीय कृषी प्रकल्पास प्रारंभ

हवामानातील बदलाचा अन्नधान्य, पशुपालन आणि मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास व कृषी विस्ताराकरिता "राष्ट्रीय कृषी प्रकल्पा'ची अं मलबजावणी करण्यात येत आहे. देशातील 100 जिल्ह्यांची याकरिता निवड करण्यात आली असून, यात महाराष्ट्रातील पुणे, नगर, नंदुरबार, औरंगाबाद, अमरावती, भंडारा, रत्नागिरी या सात जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रामाफर्‌ त हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषद (नवी दिल्ली) आणि केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (हैदराबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने हवामानातील बदलावर आधारित "राष्ट्रीय कृषी प्रकल्पा'ची संकल्पना पुढे आली आहे.

याकरिता निवडण्यात आलेल्या 100 जिल्ह्यांत प्रतिकूल हवामानामुळे कृषी आणि कृषिपूरक व्यवसायावर नेहमी होणारे परिणाम तसेच या बदलास अनुकूल असणाऱ्या कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने पथदर्शक प्रकल्प राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. किमान सात वर्षे हा प्रकल्प राबविण्यात येणार असून वर्षभरातील यासंदर्भातील अभ्यास अहवाल संबंधित संस्थांना पाठविण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात राहाता तालुक्‍यातील पिंप्री निर्मळ येथे हा प्रकल्प बाभळेश्‍वर (ता. राहाता) येथील पायरन्स कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पात केवळ अभ्यास व कृषी विस्तारच नसून निवडलेल्या गावात विविध कृषी आणि ग्रामविकास योजना राबविल्या जाणार आहे. याकरिता गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन, पीक पद्धतीचा अवलंब, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय, चारा पिके, इतर सेवा सुविधांची उपलब्धता आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. हवामान बदलाला सामोरे जाताना देशातील कृषी संशोधन उपयुक्त ठरत आहे का, याची पडताळणी व अभ्यास या प्रकल्पान्वये करण्यात येणार आहे. तसेच या बदलास सामोरे जाण्याकरिता शेतकऱ्यांकरिता अनुकूल तंत्रज्ञानाचा विस्तारही करण्यात येणार आहे.

प्रकल्पाचा उद्देश

  • हवामान बदलाचा शेतीवर होणाऱ्या परिणामाबाबत जागृती करणे
  • कृषी उत्पादन, पूरक व्यवसायातील अडचणींची कारणे शोधणे
  • गावात शाश्‍वत उत्पादनाचे स्रोत शोधून ते राबविण्यासाठी प्रयत्न
  • नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन आणि विकास करण्यावर भर
  • प्रतिकूल हवामानाला सहनशील पीक पद्धत, जातींचा प्रचार
  • पूरक व्यवसाय आणि चारापिकात नव तंत्रज्ञानाचा अवलंब
  • गट शेती, विक्री व्यवस्था, भाडे तत्त्वावर कृषी अवजारे उपलब्ध करणे
  • हवामान केंद्राची स्थापना करून तंत्रज्ञान प्रसार संकल्पना राबविणे
  • विविध ग्रामविकास योजना संलग्नित करून गावाचा विकास करणे

 

- डॉ. भास्कर गायकवाड, प्रमुख शास्त्रज्ञ,  कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्‍वर

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate