অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामान बदलाने गारांचा पाऊस

वातावरणातील बदलाने गारपीट, वादळी वारे रब्बी पिकांना फटका देतात. एक तर उभी पिके कोलमडतात आणि गारांच्या पावसाने धोपटली जातात. त्यामुळे अशा हवामान बदलाने मोठे नुकसान होते. वातावरणातील ही बदल प्रक्रिया व त्याचा पिकांवर होणारा परिणाम आपण अभ्यासू या.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडी चांगली होती. त्याचा रब्बी पिकांना फायदा झाला; मात्र फेब्रुवारीचा तिसरा आठवडा सुरू होताच काश्‍मीर आणि पाकिस्तानच्या बाजूस चक्रावात तयार झाले. त्याच वेळी विदर्भातील तापमान वाढू लागले. त्यामुळे तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि उत्तरेकडील थंडगार वारे बाष्प होऊन त्या दिशेने वाहू लागले. समुद्रावरून येणारे वारे आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यात प्रामुख्याने फरक असतो तो हवेतील धुळीच्या कणांचा आणि क्षारयुक्त कणांचा. त्यात क्षारयुक्त कणांचा भाग नसतो. त्यामुळे फेब्रुवारीतील थंड वाऱ्याबरोबर आकाशातील काही उंचीवर उणे 20 ते उणे 25 अंश सेल्सिअस तापमान होते. बाष्पाचे पाण्यात रूपांतर होतानाच त्याचे बर्फात रूपांतर होते.

बर्फाच्या गोळ्या तयार होतात. पृथ्वीच्या जवळपास एक ते दोन किलोमीटर उंचीवर हे सारे घडत असताना गुरुत्वाकर्षणाने त्या खाली पडतात. त्यालाच गारांचा पाऊस आपण म्हणतो. हा पाऊस केवळ वातावरणातील बदलाने होतो. काही वेळा सुरवातीस प्रचंड वारा, वादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने वेगात वाहणारे ढग एकमेकांवर आपटून प्रचंड मोठे आवाज होऊन विजा चमकणे आणि पाऊस सुरू होणे असे प्रकार घडतात. यात गारपीट, वादळी वारे रब्बी पिकांना फटका देतात. एक तर उभी पिके कोलमडतात आणि गारांच्या पावसाने धोपटली जातात. त्यामुळे अशा हवामान बदलाने मोठे नुकसान होते. याचा पिका ंवर होणारा परिणाम आपण अभ्यासणे गरजेचे राहील.

गहू

ओंबीवर असलेला गहू वाऱ्यामुळे कोलमडून पडतो. वरती गारपीट झाल्यास मोडलेल्या कांड्या पुन्हा तग धरत नाहीत. गहू चुड्या बांधून उभा करावयाचा झाल्यास सुतळीने अथवा घायपाताच्या पानांच्या तुकड्यांनी बांधून उभा केल्यास त्यात हवी तशी क्रियाशक्ती येत नाही आणि गव्हाचे नुकसान होते.

रब्बी ज्वारी

वाऱ्यामुळे आणि वादळामुळे ज्वारीची ताटे प्रथम कोलमडून पडतात. ज्या दिशेने वाऱ्याचा दाब वेगात असेल त्याच्या विरुद्ध बाजूस जमिनीवर पीक झोपावे तसे पसरून पडते. चक्राकार वारे असल्यास फारच वेडीवाकडी ताटे पडतात. पुन्हा चुड्यां मध्ये एकत्रित बांधून उभी केल्यास फारशी क्रियाशक्ती न राहिल्याने ती जोर धरत नाहीत व वाळतात.

हरभरा

घाट्यावर असलेल्या हरभरा पिकाचे वाऱ्यामुळे नुकसान होऊन फांद्या फि रल्याने मोडतात. घाटे भरण्यावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते.

अन्य पिकांना फटका

गारपीट झाल्यास डांगर, कलिंगड, टोमॅटो, पपई या पिकांना फ टका बसतो. वादळी वारे आणि चक्राकार वाऱ्यामुळे मोसंबी आणि संत्रा पिकाची फळगळ होते. आंबा पिकाचा मोहर गळतो. अशा प्रकारे प्रामुख्याने नुकसान होते.

द्राक्ष

द्राक्ष पिकास या कालावधीत पाऊस झाला तरी परिणाम दिसून येतो. द्राक्षामध्ये साखरनिर्मिती झालेली असते. फळे उकलतात व प्रत खराब होते.

अशा प्रकारे सन 1986 आणि सन 1994-1995 मध्ये पुणे जिल्ह्यात गारपीट होऊन गहू, ऊस, टोमॅटो, भाजीपाला, ज्वारी या पिकांना फटका बसला होता. दरवर्षी असे घडते असे नाही. मात्र थंडीचा कालावधी सुरू असताना असे प्रकार जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत घडतात. काही वेळा उन्हाळी हंगामात एप्रिल आणि मे महिन्यातही असे प्रकार घडतात.

सन 2010 च्या मे महिन्यात माण, खटाव भागांत प्रचंड गारपीट झाली होती. हवामान बदलामध्ये हवेच्या वातावरणातील बदल ज्या प्रकारे घडतात त्यावर हे सारे अवलंबून राहते. तरी पण प्रामुख्याने ज्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते, त्या भागात पावसाला अनुकूल वातावरण निर्माण होते. ढग तेथे दाटून जमतात. त्यांच्या तापमानावर पुढील क्रिया घडून पाऊस अथवा गारपीट होते. या वर्षी 20 जानेवारीस वाऱ्याचा वेग वाढून ढगांवर ढग आदळून विजा चमकल्या. त्यानंतर पाऊस आणि काही काळ गारपीट हा प्रकार यवत माळ जिल्ह्यातील महागाव आणि वर्धा जिल्ह्यांतील आर्वी आणि आष्टी तालुक्‍यांत झाला. विदर्भात काही भागांत नागपूरपर्यंत पावसाळ्यातील पावसाप्रमाणे पाऊस झाला. मात्र गारा आणि चक्राकार वाऱ्यामुळे नुकसान पातळी वाढली.

पश्‍चिम महाराष्ट्रात त्याच दरम्यान नगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्‍यांत 1000 हेक्‍टरवरील गहू, कांदा, हरभरा, ज्वारी, आंबा या पिकांचे नुकसान झाले, तर कर्जत तालुक्‍यात आणि त्या सभोवालतीच्या तालुक्‍यात 27 फेब्रुवारीला रात्री एक ते दोनच्या दरम्यान झालेल्या पावसाने ज्वारी, गहू, आंबा पिकांचे नुकसान झाले. 23 फेब्रुवारी रोजी सांगली जिल्ह्यात मिरज, कवठेमहांकाळ, जत, तासगाव, आटपाडी, खानापूर येथील द्राक्ष, आंबा, रब्बी ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांचे नुकसान झाले. त्याच दरम्यान मराठवाड्यातील सिल्लोड, औरंगाबाद, बीड. परभणी, जिल्ह्यांतील कपाशी, गहू, ज्वारी आणि आंबा पिकांचे नुकसान झाले. त्या भागातील टरबूज, टोमॅटो, संत्रा, मोस ंबी पिकांचेही नुकसान झाल्याचे आढळले आहे. आता अद्याप त्या भागात कपाशी वेचणीच्या कामात व्यत्यय येऊन नुकसान होणे शक्‍य आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्‍यांतील रब्बी पिकांचे तसेच सातारा तालुक्‍यातील काही पिकांचे नुकसान झाले. सातारा तालुक्‍यात सध्या हळद पीक काढणी झाली असून ती शिजवणे आणि उन्हात वाळवण्याचे काम सुरू आहे. मात्र आता त्या कामात बरेच प्रश्‍न निर्माण झालेत. कारण सातारा भागात पुन्हा 27 तारखेस पाऊस चांगलाच झाला आहे. रात्री नऊ वाजता वारा, वादळ व गारपिटीने सातारा भागातील वाळत ठेवलेली हळद भिजली. उन्हाळी हंगाम सुरू होण्याच्या दरम्यान हे सारे घडले आहे. त्यामुळे या उन्हाळी हंगामात अधूनमधून वातावरण तयार होऊन पाऊस होणे ही क्रिया घडणे स्वाभाविक आहे. वातावरणातील बदलाचा हा परिणाम असून फेब्रुवारी, मार्च महिन्यांत तापमानवाढ होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याबाबत शेतकरी वर्गाने हवामान अंदाजाकडे लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे. हातातोंडाशी आलेली पिके हातची जाऊ शकतात. यातून मोठे नुकसान होणे स्वाभाविक आहे.

बदल लक्षात घेऊन सावध राहू या

यंदाच्या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच भागांत विशेषतः नगर, परभणी, सातारा, सांगली, पुणे भागांत पावसाळी वातावरण निर्मिती होऊन आकाशात ढगांची दाटी वाढली. सूर्यप्रकाश बहुतेक ठिकाणी अल्पशा प्रमाणात कमी झाला. त्याचे प्रमुख कारण बं गालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडील भागात सरकले. थंडीचा कालावधी आणखी टिकला असता तर गव्हाच्या पिकास फायदा झाला असता. तसाच फ ायदा द्राक्ष, ऊस आणि हरभरा पिकांनाही झाला असता. आता वेळ आहे रब्बी पिकांच्या काढणीची. वातावरणातील बदल लक्षात घेऊन काढणी वेळेवर करून पावसापासून संरक्षण करणे आवश्‍यक ठरणार आहे.

डॉ. रामचंद्र साबळे

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate