संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामानात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणाऱ्या इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेंट चेंज (IPCC) या संस्थेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालामध्ये माणूस आणि नैसर्गिक पर्यावरणावर हवामानातील बदलांच्या परिणांमाची अभ्यासपूर्ण मांडणी केली असून, या बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी संभाव्य उपाययोजनांविषयी माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यामध्ये जपान येथील योकोहोमा या शहरामध्ये पाच दिवसांच्या परिषदेमध्ये या अहवालाला अंतिम स्वरूप देण्यात आले. हवामानातील बदलाचे परिणाम पृथ्वीतलावरील प्रत्येक घटकावर आणि समुद्रावर मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, या धोक्यापासून वाचण्यासाठी जग तेवढे तयार किंवा तत्पर नसल्याचे मत या संशोधकांच्या गटाने व्यक्त केले आहे.
उष्णतेची लाट, दुष्काळ, पूर परिस्थिती,चक्री वादळे आणि वणवे यांसारख्या घटनांमध्ये गेल्या दशकामध्ये वाढ होत असून, त्याचे पर्यावरण आणि मानवी जनजीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. गरीब लोकांच्या आयुष्यावर या बाबींचा मोठा परिणाम होणार असून, त्यांच्या हालअपेष्टांमध्ये भर पडणार आहे.
या अहवालाला अंतिम स्वरूप देणाऱ्या संशोधकांच्या गटाचे सहसदस्य व्हिसेन्टे बारोस यांनी सांगितले, की मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होत असलेल्या हवामानबदलाच्या कालखंडामध्ये आपण राहत आहोत. त्याचा सर्वाधिक धोका मानवी सुरक्षेला आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान घरे, स्थावर मालमत्ता यांना होणार असून, अन्न आणि पाण्याच्या समस्येमध्ये वाढ होणार आहे. त्याचे पर्यवसान स्थलांतरितांच्या संख्येमध्ये वाढ होण्यात होत आहे. या प्रकारच्या घटनांना सामोरे जाण्यासाठी आपण अद्याप तयार नसल्याचे स्पष्ट होते.
आयपीसीसीचे सदस्य राजेद्र पचौरी यांनी सांगितले, की या पृथ्वीतलावरील कुणीही हवामान बदलाच्या परिणामापासून अलिप्त राहू शकणार नाही. सध्या या परिणामाशी जुळवून घेणे आणि प्रमाण कमी करणे, इतकेच आपल्या हाती आहे. त्यातूनच हवामानबदलाचे धोके कमी करणे शक्य आहे. जर पूर्व औद्योगिक पातळीच्या तापमानामध्ये चार अंश सेल्सिअसची वाढ झाल्यास हवामानबदलाचे धोके हे अधिकपासून उच्चतम मर्यादेच्या पलीकडे जातील. तापमानामध्ये १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास धोक्यांच्या असम प्रमाणात वाढ होणार आहे.
भूतकाळातील घटनांचा मागोवा घेत भविष्यातील बदलांसाठी तयार राहण्याकडे आपले अधिक लक्ष असले पाहिजे. या बदलांशी जुळवून घेण्यातून धोक्यांचे प्रमाण कमी होऊ शकेल, असे मत ख्रिस फिल्ड यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, की विविध देशांतील शासन, संस्था आणि जगभरातील समुदाय त्यांच्या अनुभव आणि अभ्यासावर आधारित हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या अनुभवातून पुढील मार्ग दिसण्यास मदत होईल. अधिक महत्त्वाकांक्षी सुधारणांसाठी हवामान आणि समाजामध्येही बदल होणे आवश्यक आहेत.
‘ग्रीनपीस इंटरनॅशनल’चे अधिकारी कैसा कोसोनेन यांनी सांगितले, की सध्या आपण एका अरुंद चिंचोळ्या रस्त्यावरून मार्गक्रमण करीत आहोत. हवामानातील बदलाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हवामानातील प्रदूषणामुळे मानवी सुरक्षेबरोबरच सागर आणि जंगले व त्यांतील विविध प्रजातींना धोका पोचत आहे. हे टाळणे शक्य असून, या प्रजाती नष्ट होण्यापासून वाचविता येतील.
गेल्या सप्टेंबरमध्ये ‘आयपीसीसी’ने प्रसारित केलेल्या अंतरीम अहवालामध्ये मानवाला जागतिक तापमानवाढीसाठी प्राथमिक दृष्ट्या कारणीभूत ठरवले होते. या तापमानातील वाढीमुळे अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होत असून, बर्फ वितळत आहे. हा ‘आयपीसीसी’चा दुसरा अहवाल असून, येत्या एप्रिल महिन्यामध्ये ‘मिटिगेशन ऑफ क्लायमेंट चेंज’ या विषयावरील तिसरा अहवाल बर्लिन (जर्मनी) येथे प्रकाशित करण्यात येईल.
पॅरिस (फ्रान्स) येथे २०१५ मध्ये नव्या आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक नियमांच्या निर्मितीसाठी परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे नियम २०१२ मध्ये मुदत संपलेल्या १९९७ च्या क्योटो प्रोटोकॉलची जागा घेतील.
हवामानातील बदलाचे मापन करण्यासाठी सरळ निरीक्षणे आणि उपग्रहाच्या माध्यमातून व विविध व्यासपीठांवरून मिळवलेल्या माहितीचा वापर केला गेला.
अंतिम सुधारित : 10/7/2020
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...
हवामान अत्यंत बेभरवशाचे झाले आहे. दुष्काळ, गारपीट,...
हवामानातील बदलामुळे दुष्काळ,गारपीट, थंडी या रूपांन...
हवामानाच्या परिस्थितीत सध्या सातत्याने बदल जाणवत आ...