অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तपासा पाण्याची गुणवत्ता ...

सिंचनाच्या पाण्याचे परीक्षण समस्येचे योग्य निदान करणे महत्त्वाचे आहे. पाण्याची गुणवत्ता सिंचनासाठी योग्य नसल्यास शास्त्रीय उपाययोजनांचा अवलंब करावा. सिंचनाच्या पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे जमिनीचे आरोग्य टिकवता येते. पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादनात वाढ मिळेल.
1) क्षारयुक्त पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्यास पाण्यातील विद्राव्य क्षार जमिनीत शोषले जाऊन त्यांचे प्रमाण वाढत जाते. जास्त चिकणमाती असलेल्या जमिनी, उताराच्या अभाव आणि अवर्षण इत्यादीमुळे हळूहळू क्षारांचे प्रमाण वाढत जाऊन जमिनी क्षारयुक्त होतात. अशा क्षारयुक्त जमिनीत पाणी आणि अन्नद्रव्ये यांचे पिकाकडून शोषण होत नाही.
2) क्षारांचा मुळांवर विषारी परिणाम होतो. पिकांची वाढ खुंटते, बियाण्याची उगवण कमी होते, मुळांची टोके मरतात आणि त्याचा आतील परिणाम पिकांवर दिसून येतो. अशा जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होऊन सुपीकता घटते.
3) उष्ण हवामानाच्या प्रदेशात कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीतील क्षार धुऊन जाण्याचे प्रमाण कमी होऊन ते साचत जातात आणि परिणाम हळूहळू ही गंभीर समस्या उत्पन्न होते.
4) शहरातील सांडपाण्याचा सतत सिंचनासाठी वापर धोक्‍याचा ठरू शकतो. विशेषतः भाजीपाला पिकांसाठी शहरालगतच्या शेतीमध्ये या सांडपाण्याचा सिंचनासाठी वापर होताना दिसून येतो. या पाण्याचा दीर्घकाळ वापर केल्यास जमिनीत जडधातू साचून ते पिकांवाटे मानवी आहारातून प्रवेश करू शकतात, त्यामुळे या सांडपाण्याचा वावर प्रक्रिया करूनच सुरक्षित पद्धतीने करावा लागेल.
4) सिंचनाचे पाणी विम्लयुक्त असल्यास अशा पाण्यात क्षार कमी असून, सोडियमचे प्रमाण जास्त असते. अशा पाण्याचा दीर्घकाळ वापर केल्यास कॅल्शियम, मॅग्नेशिअमचे कार्बोनेट तयार होऊन ते अचल राहतात. मातीच्या कणांवरील सोडियमचे प्रमाण वाढते, त्यामुळे जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर अनिष्ट परिणाम होतो.
5) विनिमययुक्त सोडियमचे प्रमाण वाढून जमिनीची संरचना बदलते. जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी पिकांना प्राणवायू उपलब्ध होऊ देत नाही. जमिनी चोपण होऊन त्यांचा सामू वाढतच जातो.
6) पीक वाढीसाठी आवश्‍यक अशा नत्र, जस्त, लोह यांची उपलब्धता कमी होते.

इन्फो

सिंचनाच्या पाण्याची प्रत योग्य नसल्यास


1) सिंचनाच्या पाण्याची प्रत योग्य नसल्यास त्याचा जमिनीच्या गुणधर्मावर विपरीत परिणाम होतो.
2) जमिनीत निचरा चांगला होत नसल्यास अशा जमिनींना थोडे जास्त प्रमाणात पाणी दिले तर उष्ण व कोरड्या हवामानात बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा वरच्या थरावर क्षार एकवटतात.
3) जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढून कालांतराने पाण्याच्या अति वापरामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. 4) सिंचनाच्या पाण्याच्या अयोग्य वापरामुळे समस्यायुक्त जमिनींच्या क्षेत्रात वाढ होत असून, शेतीच्या शाश्‍वत उत्पादकतेस धोका उत्पन्न होत आहे.

समस्यायुक्त पाण्याचे व्यवस्थापन

1) क्षारयुक्त पाणी जमिनीच्या परिणामकारक खोलीमधून बाहेर काढणे गरजेचे असते. वालुकामय, पोयटाच्या, जाड पोताच्या जमिनीत क्षार निघून जाऊन जमिनीवर विपरीत परिणाम न होता असे पाणी वापरले जाऊ शकते; परंतु भारी चिकणमातीच्या जमिनीत हे पाणी वापरल्यास या जमिनी समस्यायुक्त होतात.
2) पाण्याची प्रत खराब असल्यास योग्य व्यवस्थापनाकरिता फारसे काही उपाय सहजासहज करता येत नाहीत.
3) अयोग्य प्रतीचे पाणी सिंचनासाठी वापरू नये. तपासणी करून सुधारित व्यवस्थापनाचा वापर करावा.

इन्फो

सिंचनाच्या सुधारित पद्धती

1) जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा आधुनिक सूक्ष्म सिंचनानुसार पाणी दिल्यास जमिनीमध्ये क्षार कमी साचतात. पाण्याच्या कार्यक्षम वापर होतो. जमिनी क्षारयुक्त चोपण होण्यापासून वाचविता येतात.
2) मर्यादित परंतु वारंवार पाणी दिल्यास पिकांची वाढ चांगली होते. एकाच वेळी जास्त पाणी न देता पाण्याच्या पाळ्या वाढवाव्यात म्हणजे त्याचा जमिनीवर विपरीत परिणाम होणार नाही.

भूसुधारकांचा वापर


1) विम्लयुक्त पाण्यात सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास म्हणजेच उर्वरित सोडियम कार्बोनेट 2.5 मिलीइक्वीव्हॅलंट प्रति लिटरपेक्षा जास्त असल्यास असे पाणी 30 सें.मी. जाडीच्या जिप्सम थरातून प्रवाहित करून सिंचनासाठी वापरावे.
2) सरासरी एक ते दोन टन जिप्सम प्रति हेक्‍टरी वापरावे. जिप्सम मातीच्या वरच्या दहा सें.मी. थरात सारखा मिसळून घ्यावा. अशा शेतावर हिरवळीच्या खतांचा वापर अत्यंत प्रभावी असतो.

क्षार सहनशील पीक घ्यावीत

1) पाण्यातील क्षारांचा दाह कमी करण्यासाठी आणि निचरा सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा नियमित वापर अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक पिकाची क्षार सहनशक्ती निरनिराळी असते.
2) क्षार सहनशील पिकांचा त्यासाठी वापर करणे महत्त्वाचे आहे. हलकी ते मध्यम जमिनीवर क्षार सहनशीलता असलेली शर्कराकंद, करडई ही अतिशय क्षार सहनशीलता असलेली, तसेच मोहरी, ज्वारी, गहू, बाजरी, कापूस ही सहनशील पिके घेता येतील.
3) जमिनीतील चोपणपणा कमी करण्यासाठी हिरवळीच्या खताकरिता धेंचाची लागवड करावी.
-------

डॉ. विलास खर्चे, डॉ. आर. एन. काटकर
(लेखक मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत)

----------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate