অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तुषार, ठिबक सिंचनाचा अवलंब करा...

पिकांची जास्तीत जास्त उत्पादकता, पाण्याची आवश्‍यक मात्रा आवश्‍यक त्या वेळी दिल्यानेच मिळते. सध्याच्या काळात उपलब्ध पाण्याच्या योग्य वापरासाठी तुषार, ठिबक सिंचनाने पिकांना पाणी द्यावे. फळबागांना आच्छादन करावे. 
आपत्कलीन परिस्थितीत पिकांच्या कार्यसाधक मुळांच्या कक्षेमधील ओलावा पूर्णपणे संपलेला असतो. पीक सुकण्यास सुरवात झालेली असते. मातीतील ओलावा कमी झाल्यामुळे जमिनीस भेगा पडण्यास सुरवात झालेली असते.

उपलब्ध पाण्याच्या साठ्यात अत्यल्प पाणी असते. अशा परिस्थितीत हलके पाणी देण्याचा प्रयत्न केला तरी 10 सें.मी. पेक्षा कमी पाणी बसूच शकत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा पीक सुकण्यास सुरवात होते, जमिनीला भेगा पडलेल्या असतात, पाणीसाठ्यात थोडेच पाणी उपलब्ध असते, तेव्हा हलके पाणी सर्व शेतात समप्रमाणात देऊन पीक वाचविण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा.

पीक व्यवस्थापन


  1. प्रत्येक पिकाची ताण सहन करण्याची क्षमता ही पिकाचा वाण, वाढीची अवस्था, हवामानानुसार वेगवेगळी असते. सर्व पिकांची जास्तीत जास्त उत्पादकता, पाण्याची आवश्‍यक मात्रा आवश्‍यक त्या वेळी दिल्यानेच मिळते; परंतु पाण्याच्या कमतरतेच्या परिस्थितीमध्ये बरीच पिके जुळवून घेतात व कमी पाण्यातही बऱ्यापैकी उत्पादन देतात, त्यामुळे पाण्याची उत्पादकता वाढविण्यासाठी, विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत आणि पाण्याची टंचाई असलेल्या परिसरात पिकाला नियंत्रित ताण दिला जातो.
  2. या पद्धतीमध्ये पिकाच्या पाण्याच्या जास्तीत जास्त गरजेइतके पाणी न देता कमी पाणी दिले जाते, की ज्यायोगे पीक मरणार नाही; परंतु पिकाच्या उत्पादनात थोड्या प्रमाणावर घट होईल. या पद्धतीचा हेतू जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे हा नसून, पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविणे हाच असतो.
  3. शेतीसाठी पाण्याची गरज भागविताना ठिबक सिंचन, भूमिगत सिंचन, आच्छादनाचा वापर करावा.
  4. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आहे, त्यांनी तुषार सिंचन संच विकत घ्यावा. त्याचा उपयोग फक्त या दुष्काळी परिस्थितीमध्ये पीक वाचविण्यासाठी होईल असे नाही, तर पुढील 10 ते 12 वर्षांत सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी, पिकांचे उत्पादन व प्रत वाढविण्यासाठी होतो.
  5. आच्छादनांच्या वापरामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होते. वेगवेगळ्या आच्छादनांमुळे 20 ते 29 टक्के पाण्याची बचत व जवळ जवळ 80 ते 90 टक्‍क्‍यांपर्यंत पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर वाढल्याचे आढळून आले आहे. आच्छादनासाठी पूर्वीच्या पिकांचे उरलेले अंश जसे की उसाचे पाचट, सोयाबीन काड, भाताचे तूस, पालापाचोळा, गव्हाचे काड इ. किंवा प्लॅस्टिक फिल्म यांचा वापर करावा.
  6. पिकांच्या उरलेल्या अंशाच्या आच्छादनामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, तसेच पोषण वातावरणही निर्माण होते. उसाचे पाचट हेक्‍टरी पाच टन या प्रमाणात पसरावे. आच्छादनामुळे ओलावा तर दीर्घकाळ टिकून राहतो. तणांचे चांगल्याप्रकारे नियंत्रण करता येते.

फळबागांसाठी उपाययोजना


  1. या काळात शक्‍यतो बहार धरू नये.
  2. शिफारशीनुसार छाटणी करावी.
  3. ठिबक सिंचन, आच्छादनाचा वापर करावा.
  4. पाणी खूपच कमी असेल तर मडका सिंचन किंवा डिफ्युजरचा वापर करावा.

उसाचे व्यवस्थापन

  1. एकआड एक सरीत पाणी द्यावे.
  2. पाचट किंवा पिकांच्या उरलेल्या अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर.
  3. ठिबक सिंचन, रेनगनचा वापर करावा.
  4. 50 टक्के अतिरिक्त पोटॅशची मात्रा द्यावी.


संपर्क - 02426- 243237 
(लेखक जलसिंचन व्यवस्थापन विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate