<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; ">कोंबड्यांमध्ये आढळणारे बाह्य परोपजीवी म्हणजेच उवा, पिसवा. यांना नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक असते. हे बाह्यपरोपजीवी कोंबड्यांचे रक्त पितात. यामुळे कोंबड्यांची वाढ खुंटते, त्वचा विकार होतात. बाह्य परोपजीवींमुळे इतर आजारांचा प्रादुर्भाव होतो. कोंबड्यांमध्ये बाह्य परोपजीवींचे नियंत्रण करणे कठीण जाते. कारण हे परोपजीवी त्वचेवर असतात. पिसांमुळे औषध त्यापर्यंत पोचणे कठीण जाते. अशा वेळी केवळ डीपिंग पद्धतीचा वापर होतो म्हणजेच पाण्यामध्ये औषधी मिसळून प्रत्येक कोंबडी त्यात बुडवून बाहेर काढली जाते. या वेळी कोंबडीच्या तोंडात औषध जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. <br />परंतु ही पद्धत कोंबड्यांमध्ये ताण वाढविते, तसेच यात मनुष्यबळाचा जास्त वापर होतो. <br />सध्या बाह्य परोपजीवींचे नियंत्रण करण्यासाठी उपलब्ध असणारी सर्व औषधे ही विषारी असल्यामुळे त्यापासून कोंबड्यांना धोका होऊ शकतो. अशा वेळी औषधी वनस्पतींचा वापर उपयुक्त ठरतो.</p> <h3 style="text-align: justify; ">बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त वनस्पती</h3> <p style="text-align: justify; ">1) कडुलिंब <br />कडुलिंबाच्या बियांचे तेल किंवा पानांचा वापर अत्यंत उपयुक्त आहे. <br />बी किंवा पानांचा उपयोग बाहेरून लावण्यास करावा. यासाठी बी किंवा पाने बारीक करून घ्यावीत. ही बारीक पूड कोंबड्यांच्या अंगावर पिसांच्या विरुद्ध दिशेने लावावी. <br />2) करंज ः <br />ही करंजी या नावानेदेखील ओळखली जाते. <br />या वनस्पतीचे तेल किंवा बियांची पावडर बाह्यकृमींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. <br />3) सीताफळ ः <br />सीताफळाचे बी किंवा पानांचा उपयोग बाह्य कृमींच्या नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यात शक्यतो बियांचाच वापर करावा. बी उपलब्ध नसेल तर पानांचा वापर करावा. <br />4) ज्येष्ठमध ः <br />या वनस्पतीचे खोड, मुळे वापरली जातात.</p> <h3 style="text-align: justify; ">औषधींचा एकत्रित वापर</h3> <p style="text-align: justify; ">1) कडुलिंब - 15 ग्रॅम <br />2) करंज बियांची पावडर - 15 ग्रॅम <br />3) सीताफळ बी - 10 ग्रॅम <br />4) ज्येष्ठमध ः 10 ग्रॅम <br />मात्रा ः <br />1) सर्व वनस्पती एकत्र करून बारीक कराव्यात. <br />2) ही पावडर कोंबड्यांच्या अंगावर पिसाच्या विरुद्ध दिशेने लावावी. <br />पाण्यातील मात्रा ः <br />1) एकत्रित मिश्रणामध्ये पाणी मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात कोंबड्या बुडवून काढाव्यात. तोंडात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. <br />2) साधारणपणे 200 मि.लि. पाण्यात आधी 20 ग्रॅम साबण मिसळावा. त्यात कडुलिंब व करंज तेल पाच मि.लि. मिसळावे म्हणजे योग्य मिश्रण तयार होईल. याचा वापर करावा. <br />वरील औषधी विषारी नसल्यामुळे यापासून कुठलाही धोका होत नाही.</p> <p style="text-align: justify; ">स्त्रोत: <a class="external-link ext-link-icon" href="http://www.agrowon.com/Agrowon/20150111/4767852401586745172.htm" target="_blank" title="नवीन विंडो मध्ये ओपन होणारी बाह्य साईट ">अग्रोवन</a></p> <p style="text-align: justify; "><img alt="" title="" class="image-inline" src="https://static.vikaspedia.in/media/images_mr/agriculture/animal-husbandry/SakalAgrowonLogo.jpg" /></p> </div>