उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरासह मनालाही थंडावा देणाऱ्या उसाचा ताजा रस पिण्यासाठी उड्या पडतात. ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील लक्ष्मण व दिनेश पाटील हे पिता-पुत्र आपल्या उसाला साखर कारखान्याचे "मार्केट' मिळत नाही म्हणून रडत बसले नाहीत, तर रसवंतिगृह सुरू करून कोणाच्या मध्यस्थीशिवाय आपल्याच उसाच्या ताज्या रसाला थेट ग्राहकांची बाजारपेठ मिळवली.
जळगाव जिल्ह्यात केळीसह कपाशीसारखी प्रमुख पिके असल्याने, उसाचे लागवड क्षेत्र तसे कमीच असते. त्यातही मोजून दोनच साखर कारखाने सद्यःस्थितीत गाळप करीत आहेत. त्यामुळे लागवड केलेला ऊस वेळेवर तुटतो की नाही, याबद्दलची साशंकता दर वर्षी निर्माण होत असते. ऊसलागवडीचे क्षेत्र कमी झाल्याच्या स्थितीत ऊस न तुटण्याची वेळ शक्यतो येत नाही. तरीही कमी प्रमाणात ऊसलागवड करणाऱ्यांना साखर कारखान्यांकडून फारशी चांगली वागणूक मिळत नसल्याचा अनेकांना अनुभव आला आहे. ममुराबाद (ता.) येथील लक्ष्मण बाबूराव पाटील यांच्यावर 2007 मध्ये तसा प्रसंग गुदरला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील चालकाची नोकरी सांभाळून शेती करणाऱ्या पाटील यांनी दोन एकरांवर ऊसलागवड केली होती. साखर कारखान्याने मजूरटंचाईचे कारण पुढे करून उन्हाळ्याची चाहूल लागली तरी त्यांचा ऊस तोडला नाही. अशा पेचप्रसंगी नेमके काय करावे, असा विचार मनात घोळत असताना जळगाव- चोपडा रस्त्यालगत आपल्या शेताच्या बांधावर रसवंतिगृह सुरू करण्याची कल्पना पाटील यांना सुचली. त्यानुसार 25 हजार रुपयांचे रसकाढणी यंत्र खरेदी केले. वीज भारनियमनावर मात करणसाठी अजून 25 हजार रुपयांचे डिझेल इंजिन खरेदी केले. मुलगा दिनेश याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते. मात्र घरची शेतीही सांभाळण्याची गरज होती. त्याप्रमाणे रसवंतिगृह चालविण्याची जबाबदारी सद्य परिस्थितीत दिनेश याच्यावर सोपविण्यात आली.
रसवंतिगृह पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत कडक उन्हाळा जाणवू लागला होता.
साहजिक जळगावहून चोपडा, शिरपूर, यावल मार्गाकडे जाणारे वाहनधारक उष्णतेमुळे होणारी काहिली कमी करण्यासाठी उसाचा ताजा रस पिण्यासाठी पाटील यांच्या "राम-ऋषी' रसवंतिगृहाजवळ आवर्जून थांबू लागले. कारखान्याने न तोडलेला ऊस उन्हाळा संपेपर्यंत रसवंतिगृहासाठी वापरला गेला. कारखान्यास ऊस दिल्यानंतर 50 हजार रुपयेसुद्धा मिळाले नसते; मात्र शेताच्या बांधावरच रसवंतिगृह सुरू केल्याने उसाचे अर्थकारण बदलवणे पाटील पिता-पुत्र यांना शक्य झाले.
रसवंती व्यवसाय पहिल्या वर्षी आश्वासक वाटल्यानंतर पाटील यांचा आत्मविश्वास वाढला. पुढील वर्षी खास रसासाठी म्हणून को-419 जातीच्या उसाची लागवड केली आणि संपूर्ण ऊस रसवंतीसाठी वापरला. सर्व खर्च वजा जाता, प्रति टन साडेपाच ते सहा हजार रुपयांप्रमाणे भाव त्यांना पडला. तेव्हापासून आजतागायत एकदाही साखर कारखान्याला ऊस पाठविलेला नाही. मागणी लक्षात घेऊन एक एकरावर नुकतीच उसाची लागवड केली आहे.
पाटील यांच्या रसवंतिगृहातील रसात आवश्यकतेनुसार लिंबू, आले मिसळले जाते, बर्फाचा वापर ग्राहकाच्या मागणीनुसारच करण्यात येतो. या रसवंतीवरील रसाच्या उत्तम चवीची लोकप्रियता जाणून असलेले वाहनधारक चोपडा, शिरपूर, यावलकडे जाताना व जळगावकडे येताना आवर्जून या "स्पॉट'वर थांबतात. रसवंतिगृहापासून हाकेच्या अंतरावर फार्मसी कॉलेज आहे. तेथील प्राध्यापक व विद्यार्थीही रसपानासाठी येथे नियमित येतात.
दमलेले वाटसरू रस्त्यालगतच्या निंबाच्या झाडाखाली सावलीत टाकलेल्या खुर्च्यांवर बसून क्षणभर विश्रांती घेतात. थंडगार रस पिऊन तृप्त होतात.
ममुराबादसह परिसरात महिलांचे हळदी-कुंकू कार्यक्रम, साखरपुडा तसेच अन्य घरगुती कार्यक्रमांसाठी पाटील यांना उसाच्या रसासाठी मोठ्या प्रमाणावर "ऑर्डर' मिळते. काही जण रविवारी सुटीच्या दिवशी "स्पेशल रस' पिण्यासाठी पाटील यांच्या रसवंतिगृहाला सहकुटुंब भेटदेखील देतात.
शिक्षण घेत असताना पुढे जाऊन नोकरी करावी की एखादा व्यवसाय, असा प्रश्न मनात रुंजी घालत होता. तशात वडिलांनी शेताच्या बांधावर रसवंतिगृह सुरू केले. त्याला मिळालेल्या प्रतिसादाने माझ्या मनातील कल्पनेला उभारी मिळाली. शेतीकडे 12 तासांपेक्षा जास्त काळ लक्ष देणे शक्य झाले.
-दिनेश पाटील, ममुराबाद, ता. जि. जळगाव
(संपर्क-9604923919)
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...