অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंद्रिय पद्धतीने पानमळा

लेहनेवाडी (ता. जामखेड, जि. नगर) या गावामधील 92 शेतकऱ्यांकडे पानमळा असून, सेंद्रिय पद्धतीने पानमळ्याची जोपासना करीत आहेत. पानमळ्याच्या माध्यमातून प्रति वर्ष 45 लाखांची उलाढाल व सुमारे 200 लोकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण खाऊच्या पानांच्या उत्पादनातून लेहनेवाडीने विविध पान बाजारपेठेमध्ये नाव कमावले आहे.
जामखेड तालुक्‍यातील लेहनेवाडी (जि. नगर) येथील चारही बाजूने डोंगर असलेले सुमारे 700- 800 लोकसंख्येचे छोटेसे गाव. या गावात मध्यम, काळी कसदार जमीन असून, बहुतांश शेतकरी आहेत. गावामध्ये 150 खातेदारांपैकी 92 शेतकऱ्यांकडे पानवेलीचे मळे सुमारे 50 एकर क्षेत्रावर आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे अकरा गुंठ्यांपासून ते सव्वा एकरपर्यंत क्षेत्र आहे. सेंद्रिय पद्धतीने पानवेलीची शेती हेच या गावाचे वैशिष्ट्य आहे. पानांच्या विक्रीतून दरमहा सुमारे 40 -45 लाख रुपयांची उलाढाल गावामध्ये होते. पानवेल मळ्यामध्ये सुमारे 200 स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

लागवडीचे नियोजन

  • लेहनेवाडीमध्ये पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे खाऊच्या पानांची म्हणजे पानमळ्यांची शेती करतात. त्यामध्ये त्यांचा सेंद्रिय पद्धतीने नियोजन करण्यावर अधिक भर असतो.
  • ऑगस्टमध्ये पानमळा लागवड केली जाते.
  • प्रथम नांगरणी करून सरी काढून घेतली जाते. दोन सरींतील अंतर साधारण दोन - अडीच फूट.
  • तीन डोळ्यांचे रोप सहा इंच जमिनीत भात रोपाप्रमाणे लावले जाते.
  • एक गुंठ्यामध्ये साधारणपणे 350 झाडे बसतात. प्रति रोप 6 ते 8 रुपये खर्च होतो. लागवडीसाठी सुमारे 5 हजार रुपये खर्च येतो. एकमेकांच्या मदतीसाठी अन्य शेतकरी येतात, त्यामुळे खर्चात बचत होते.
  • पानवेलीच्या वाढीसाठी शेवरी किंवा शेवग्याच्या बारीक काठीचा आधार द्यावा लागतो. ही काठी दहा फूट उंच असते. एकदा वापरलेली किमान पंधरा ते वीस वर्षे टिकते.

पानांच्या जातींविषयी

  • गावरान पान जातींची लागवड.
  • रोगाला किंवा प्रतिकूल परिस्थितीला काटक.
  • गावरान असलेल्या पाने चवीला थोडी तिखट असली तरी खवय्यांकडून मागणी चांगली.

सेंद्रिय खतांचे डोस

पहिला - लागवडीआधी - चांगले कुजलेले शेणखत प्रति गुंठा एक ट्रॅक्‍टर
दुसरा - लागवडीनंतर 90 दिवसांनी - शेणखत प्रति गुंठा एक ट्रॅक्‍टर
तिसरा - 150-160 दिवसांनी - शेणखत प्रति गुंठा एक ट्रॅक्‍टर
चौथा - 180 दिवसांनी - तांबडी माती प्रति गुंठा दीड ट्रॅक्‍टर
पाचवा (उतरण) 195 दिवसांनी - निंबोळी पेड प्रति गुंठा 30 ते 40 किलो.
शेणखतासाठी प्रति ट्रॅक्‍टर 2.5 ते 3 हजार रु., तर तांबड्या मातीसाठी प्रति ट्रॅक्‍टर 2 हजार रुपये खर्च होतो.

रोग नियंत्रण

  • पानमळ्यात प्रामुख्याने मर रोग, करपा आणि भुरीचा प्रार्दुभाव होतो. मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर केला जातो. सेंद्रिय खताच्या वापरामुळे वेली ताकदवान राहून कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.

बाजारपेठेनुसार पानवेलीचे हंगाम

  • हे पीक वर्षभर उत्पादन व उत्पन्न देते.
  • वर्षभरात तीन विक्रीयोग्य हंगाम घेतले जातात.
  • लागवडीनंतर दहा ते अकरा महिन्यांनी पाने मिळायला सुरवात होते. या काळात पानवेल अडीच मीटर उंच जाते. त्यानंतर वेल उतरणी केली जाते. प्रत्येक तीन महिन्यांनंतर उतरणी करावी लागते.
  • उतरणीनंतर पंधरा दिवसांनी पाने मिळायला सुरवात होते.

अशी आहे बाजारपेठ

  • लेहनेवाडी येथील पानांना श्रीरामपूर, नगर, लिंबगाव (ता. करमाळा जि. सोलापूर) बीड, परभणी, भूम, परांडा, औरंगाबाद या बाजारांतून विशेष मागणी असते.
  • बाजारपेठेमध्येही पानांचे दर आणि मागणीनुसार नियोजन केले जाते. थंडीच्या महिन्यांत पानांना सर्वाधिक दर मिळतो. थंडीमध्ये सावली आणि वातावरणामुळे हिरवी पाने मिळतात. या हिरव्या पानांना श्रीरामपूर, नगर, लिंबगाव येथील बाजारात चांगला दर मिळतो, तर उन्हाळा व पावसाळ्यामध्ये पिवळसर रंगाची पाने मिळतात. या पानांना मराठवाड्यातील भागामध्ये चांगला दर मिळतो.
  • मागणी व दर पाहून आठवड्याला पानांची काढणी केली जाते. प्रति आठवडा हंगामनिहाय कमी-जास्त पण सरासरी 40 हजारांपर्यंत पाने मिळतात.
  • बाजारपेठेमध्ये स्थानिक व्यापारी लिलावाद्वारा पानांची खरेदी करतात.

सेंद्रियचा फायदा - शेतकऱ्यांचे अनुभव

  • पानमळ्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे उत्पादनाचा दर्जा चांगला राहून काढणीनंतर पाने अधिक काळ टिकतात. सेंद्रिय खतामुळे मळा पंधरा ते वीस वर्षे चांगले उत्पादन देत राहते. रासायनिक खतांवरील खर्चही कमी होतो, त्यामुळे गावातील बहुतांश शेतकरी सेंद्रिय पद्धतीने पानमळ्याची जोपासना करतात.
  • तीन वर्षांपूर्वी गावातील अंकुश जगताप व काही शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर सेंद्रिय खताबरोबर केला होता. उत्पादनामध्ये काही प्रमाणात वाढ होत असली तरी करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक झाला व पाने टिकत नसल्याची बाजारपेठेतून ओरड आल्याने तेही पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.

पानमळ्याचे अर्थकारण

  • अकरा गुंठ्यांच्या पानमळ्यासाठी पहिल्या वर्षी साधारणपणे सव्वा लाख ते दीड लाख रुपये खर्च येतो, तर दुसऱ्या सरासरी वर्षी एक ते सव्वा लाख रुपये खर्च येतो.
  • लागवडीनंतर पाववेलीचे 10 महिन्यांनी उत्पादन सुरू होते. अकरा गुंठ्यींतून प्रति आठवडा 40 हजार पाने सरासरी मिळतात. दर हजारी पानांना सरासरी 800 रुपये दराप्रमाणे प्रति वर्ष 1 लाख 74 हजार चारशे रुपये उत्पन्न मिळते.

गेल्या तीन वर्षांतील दरातील तफावत -
वर्ष ----------- कमाल --------- किमान ---------- सरासरी (दरहजारी पानांचा भाव)
2014-------1,300 रु.------750 रु.----------900 रु.
2013-------1,200 रु.------700 रु.------- 800 रु.
2012-------1000 रु.-------650 रु.--------- 800 रु.

पानवेलीतील महत्त्वाचे

  • निचरा होणारी जमीन आवश्‍यक. अन्यथा रोगांचा धोका वाढतो. त्यासाठी पानमळ्यात तांबडी माती दर वर्षी वापरली जाते.
  • कमी क्षेत्रातही चांगले व बारमाही उत्पन्न देणारे पीक
  • दर्जा व टिकवणक्षमतेसाठी सेंद्रिय खतांचा अधिक वापर आवश्‍यक.
  • माझ्याकडे पाऊण एकर पानवेलीचा मळा असून, आमची तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. लागवडीनंतर 10-11 महिन्यांमध्ये पानांची काढणी सुरू होते. ती वर्षभर कायम असल्याने हाती खेळते चलन राहते. घरखर्च भागून चांगले उत्पन्न मिळते.
  • विठ्ठल रामदास मगर, 9657109029

"माझ्याकडे अर्धा एकर पानमळा आहे. अन्य पिकेही घेत असलो तरी पानमळा हेच आमचे मुख्य पीक बनले आहे. पानमळ्यामुळे कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळते.''
बळिराम मारुती जगताप, 8888522936


लेहनेवाडीमध्ये सुमारे शंभर शेतकऱ्यांकडे पानमळे आहेत. या शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय खते, ट्रायकोडर्मा आणि जैविक बुरशीनाशकांचे मार्गदर्शन विभागातर्फे केले जाते. विभागातर्फे कृषी सहलीचे आयोजन केले होते. त्याचा लाभ गावातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.
डी. टी. सुपेकर, तालुका कृषी अधिकारी,
जामखेड, जि. नगर,
----------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत:अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate