काले (ता. कराड, जि. सातारा) येथील वैभवी स्वयंसहायता महिला बचत गटाने आवळा प्रक्रिया उद्योगातून आर्थिक प्रगतीची वाट धरली आहे. दर्जेदार आणि आरोग्यवर्धक उत्पादनांमुळे शहरी बाजारपेठेत वैभवी गटाच्या "ब्रॅंड'ने स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे.
कराडपासून उंडाळे मार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूरकडे जाताना काले हे गाव लागते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ याच गावात रोवली. अशा ऐतिहासिक ओळखीबरोबर ऊस आणि भाजीपाला पिकाचे माहेरघर म्हणूनही हे गाव परिसरात ओळखले जाते. या गावात समविचारी महिलांनी एकत्रित येऊन सप्टेंबर, 2009 मध्ये वैभवी स्वयंसहायता महिला बचत गट सुरू केला. सौ. आशा मारुती पाटील (अध्यक्षा), शोभा शिरीषकुमार यादव (सचिव) आणि सदस्या हिरा अशोक यादव, सुनंदा चंद्रकांत साठे, माया सचिन मोहिते, शैला अशोक यादव, नंदा मानसिंग देसाई, सुनंदा गोविंद लांजेकर, शोभा दिनकर हिनुकले, मंगल दिलीप मांगले, नंदा बाळकृष्ण लोहार, भारती प्रदीप डाके, सुरेखा विष्णू गुरव, सुवर्णा पांडूरंग सुपनेकर, माधवी महादेव देसाई या गटात कार्यरत आहेत. या गटाने परिसरातील बाजारपेठेचा अंदाज घेत ऑक्टोबर 2012 पासून आवळा कॅंडी, सुपारी, सिरप त्याचबरोबर टोमॅटो, नाचणी, तांदूळ, पालक पापड निर्मितीला सुरवात केली.
बाजारपेठेत प्रक्रियायुक्त पदार्थांची मागणी लक्षात घेऊन गटाने पहिल्यांदा आवळा प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करण्याचे ठरविले. गटाने कालवडे येथील कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान विषयतज्ज्ञ सौ. माधवी गायकवाड यांच्याकडे आवळा प्रक्रियेबाबत पाच दिवसांचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणामधून आवळा कॅंडी, सिरप, सुपारी, लाडू, मूखवास, लोणचे, मोरावळा इत्यादी पदार्थांच्या निर्मितीची प्रक्रिया समजावून घेतली. परिसरातील बाजारपेठेचा अभ्यास करून गटाने पहिल्या टप्प्यात आवळा प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली.
1) सुरवातीला भांडवली खर्च कमी करण्यासाठी गटातील 15 सदस्यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे रक्कम जमा केली. रकमेतून पातेली, वजन काटा, पॅकिंग मशीन, कापड, नेट, इत्यादी वस्तू खरेदी केल्या.
2) परिसरातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून प्रतवारी केलेला चांगल्या दर्जाचा आवळा सरासरी 25 रुपये किलो या दराने खरेदी करण्यास सुरवात केली.
3) प्रशिक्षणाचा पुरेपूर वापर करीत पहिल्यांदा 20 किलो आवळा कॅंडी, 30 लिटर सिरप आणि चार किलो सुपारी तयार केली. उत्पादित पदार्थांची विक्री कराड येथील यशवंत कृषी व औद्योगिक प्रदर्शनात करण्यात आली. प्रदर्शन कालावधीत सर्व पदार्थांची विक्री झाली. ग्राहकांची मागणी लक्षात आली. त्यानुसार पुढील नियोजन गटाने केले.
4) गटातील सदस्य सौ. शोभा यादव यांच्या घरचा हॉल पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरला जातो.
5) उद्योगाला खेळते भांडवल उपलब्ध होण्यासाठी गटाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या गावातील शाखेकडून 50 हजार रुपये कर्ज घेतले आहे. या रकमेतून ब्रीक्स मीटर, फॅन, मोठी पातेली, गॅस, शेगडी, इत्यादी वस्तू खरेदी केल्या.
6) सुरवातीला जमिनीवर कापड अंथरून त्यावर आवळा कॅंडी वाळविली जायची, त्यामुळे कॅंडी वाळविण्यास उशीर होत होता. कॅंडीच्या गुणवत्तेवर परिणाम व्हायचा. या अडचणीवर मात करण्यासाठी गटाने घरगुती पद्धतीचा सोलर ड्रायर विकत घेतला, त्यामुळे आवळा कॅंडी वाळविणे सोपे जाऊ लागले. गुणवत्ता चांगली राहू लागली.
7) पावसाळ्यात कॅंडी सुकवण्याची समस्या असते. त्यासाठी पावसाळ्याआधी बाजारपेठेतील मागणीचा विचार करून कॅंडी निर्मिती पूर्ण केली जाते.
8) आवळा प्रक्रिया उत्पादनांची माहिती आसपासच्या भागात झाल्याने ग्राहक जागेवरून उत्पादनांची खरेदी करू लागले.
1) गटाची दरमहा दहा तारखेदरम्यान मासिक बैठक.
2) प्रत्येक सदस्याकडून दरमहा शंभर रुपयांची बचत.
3) एकत्रित बचतीचा वापर प्रक्रिया उद्योगासाठी.
4) गटातर्फे आवळा कॅंडी, सुपारी, सिरप निर्मिती. त्याचबरोबर टोमॅटो, नाचणी, तांदूळ, पालकाचे पापड. हंगामी स्वरूपात मागणीनुसार रवा कुरडई निर्मिती.
महिलांनी प्रशिक्षण घेऊन प्रक्रियाउद्योग सुरू केला तर नक्कीच यश मिळेल. आपल्याबरोबर कुटुंबाचीही प्रगती साधता येईल. कृषी विज्ञान केंद्रातर्फे फळे व भाजीपाला प्रक्रिया, सोयाबीन प्रक्रिया, कुक्कटपालन, शेळीपालन, महिलांसाठी सुधारित शेती अवजारांची ओळख, गांडूळखत निर्मिती अशी व्यावसायिक प्रशिक्षणे देतो. त्याचा परिसरातील शेतकरी महिलांना फायदा होतो.
- सौ. माधवी गायकवाड, विषयतज्ज्ञ (गृहविज्ञान),
संपर्क - 9423865495
(छायाचित्रे - अमोल जाधव आणि कृषी विज्ञान केंद्र, कालवडे )
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...