सावली माऊली (जि. नागपूर) येथील रेड्डी बंधूंनी स्वतःच्या हॉटेलसाठी पूरक म्हणून छोटा गोठा सुरू केला होता. त्यात हळूहळू जनावरांच्या संख्येत वाढ होत दुग्धोत्पादनाचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे. केवळ दर्जेदार दुधाची विक्री करून न थांबता ते प्रक्रिया पदार्थ निर्मिती आणि विक्रीतून चांगला फायदा मिळवत आहेत.
सावली माऊली (ता. कळमेश्वर, जि. नागपूर) येथील मनवर ऊर्फ मुन्ना रेड्डी नागपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आहेत. हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या ताज्या भाज्या आणि दूध यांचे उत्पादन आपणच करावे, या उद्देशाने सुरवातीला शेती आणि नंतर पशुपालनाकडे वळले. शेतीसाठी त्यांनी सावली माऊली येथे 22 एकर शेती विकत घेतली, त्यामध्ये ते पारंपरिक पद्धतीने भाजीपाल्याचे उत्पादन घेत असत. त्यातून जमीन आहे, पाणी आहे, मजूर आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी दूध उत्पादनाकडे वळले. हॉटेलपुरते दूध उत्पादन हाच त्यांचा मुख्य उद्देश होता, त्यासाठी त्यांनी आठ मुऱ्हा म्हशी आणि दहा हरियाणवी गाई विकत घेतल्या. टुमदार गोठा बांधून त्यांनी म्हशी- गाईंचे संगोपन सुरू केले. आपल्या हॉटेलमध्ये लागणारे 40 लिटर दूध इथपर्यंतच हा दुग्धव्यवसाय त्यांनी मर्यादित ठेवला.
वृत्तीने व्यावसायिक असलेले रेड्डी बंधू शेतीत नवीन पीक आणि तंत्र राबविण्याविषयी कृषी अधिकारी आणि तज्ज्ञांकडे सातत्याने चाचपणी करीत होते. मात्र, त्यांचे पशुपालन पाहिलेल्या तज्ज्ञांनी त्यांनी दुधाचाच व्यवसाय वाढविण्याचा सल्ला दिला. दर्जेदार दुधाला असलेली मागणी पाहून त्यांनी या व्यवसायात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मग त्यासाठी त्यांनी एकदम 25 मुऱ्हा म्हशी विकत घेत आपल्या गोठ्यात वाढ केली. मजुरांची संख्या वाढविली.
जनावरांचे व्यवस्थापन...
रेड्डींनी शेतातील पाण्याचे नियोजन करत चाऱ्यासाठी नेपियर गवताचे क्षेत्र पाच एकर, मका पिकाचे चार एकरपर्यंत वाढविले. या हिरव्या चाऱ्यासोबत अन्य पशुखाद्याचाही मेळ बसवला. पशुखाद्य बनविण्यासाठी पिठाची चक्की घेतली आहे. त्यात धान्यापासून पशुखाद्य बनविले जाते. कडबा, हिरवा चारा आणि पशुखाद्य यांचा योग्य वापर ते जनावरांसाठी करतात.
- जनावरांतील आजार कमी राहण्यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ असलाच पाहिजे, हा त्यांचा दंडक आहे. वेळच्यावेळी लसीकरण करतानाच पशुवैद्यकांच्या मदतीने जनावरांवर बारीक लक्ष ठेवले जाते.
- प्रत्येक जनावराने रोजच्या प्रमाणात दूध दिले की नाही, याकडे त्यांचा कटाक्ष असतो.
- दिवसातून दोन वेळा जनावरांना पाण्याने स्वच्छ केले जाते.
गोठा व संगोपनगृह...
आता त्यांच्याकडे एकूण 48 जनावरे आहेत. त्यांच्या निवाऱ्यासाठी त्यांनी दोन गोठे बांधले आहेत. जनावरांना मोकळे फिरता यावे, यासाठी त्यांनी तीन एकर शेती तारांचे कंपाउंड टाकून बंदिस्त केली आहे. सकाळी दूध काढणी झाल्यावर या सर्व जनावरांना मोकळ्या जागेत सोडण्यात येते. या कंपाउंडमध्ये काही प्रमाणात खाद्य आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे.
आणि व्यवसाय फायद्यात आला...
दुग्धोत्पादनाची सुरवात जरी हॉटेलच्या दूध गरजेसाठी झाली असली, तरी व्यवसाय वाढविल्यानंतर त्यांच्याकडील दुधाचे प्रमाण वाढले. बाहेरील डेअरी आणि अन्य मार्गांचा अवलंब त्यांनी विक्रीसाठी करून पाहिला; मात्र त्यातून त्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुधाच्या प्रक्रियेकडे लक्ष दिले. शहरात डेअरी सुरू करतानाच दुधापासून पनीर आणि दही तयार करण्याचे युनिट चालू केले. त्यांची विक्री सुरू केली, तरीही दूध शिल्लक राहत असल्याने त्यांनी बासुंदी, चक्का तयार करण्याचे काम सुरू केले. त्यांनी तयार केलेल्या पदार्थांना चांगली मागणी येऊ लागली. या पदार्थांच्या सोबतच दुधाचीही मागणी वाढली, त्यामुळे रेड्डी बंधूंची दुधाच्या विक्रीसाठीची काळजी संपली. आता ग्राहकच त्यांच्या दुधाची आणि दुधापासून तयार केलेल्या पदार्थांची वाट पाहत असल्याचे दिसून येते.
गोठा तंत्रज्ञान...
- जनावरांसाठी शेण-मूत्राचा निचरा होण्यासाठी योग्य उतार व गटरची सोय असलेला गोठा तयार केलेला आहे, तरीही गोठ्याची नियमित सफाई, शेण लगेच उचलण्यासाठी मजुरांना ते तत्पर ठेवतात.
- दूध काढणी आणि अन्य कामांसाठी त्यांचा मजुरांवरच विश्वास आहे. अद्याप दूध काढणीचे यंत्र घेतलेले नाही. यंत्राचा वापर आणि स्वच्छता यासाठी स्वतः गोठ्याच्या परिसरामध्ये थांबण्याची आवश्यकता त्यांना वाटते, कारण दूध काढण्याच्या यंत्राची स्वच्छता योग्य प्रकारे न झाल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.
- सध्या चारा कटाई आणि मिक्सिंग यासाठी यंत्राचा वापर केला जातो.
दर्जेदार उत्पादन...
मनवर ऊर्फ मुन्ना रेड्डी यांनी आपल्या उत्पादनाच्या दर्जावर विशेष लक्ष दिले आहे.
- विनाकारण रासायनिक औषधांचा वापर टाळला जातो. नैसर्गिक चारा आणि पशुखाद्य देण्यावर त्यांचा भर असतो.
- जनावरांचे दूध काढताच ताजे दूध ग्राहकांपर्यंत पोचते केले जाते.
- प्रक्रिया उद्योगातही कुठल्याही अन्य पदार्थांचा वापर केला जात नाही. उत्पादनाचा दर्जा व चव सातत्याने स्थिर ठेवली जाते. ग्राहकांची वाढती मागणी हेच त्यांच्या मालाच्या गुणवत्तेचे निदर्शक ठरत आहे.
प्रगतीच्या दिशेने वाटचाल...
रेड्डी बंधूंनी महाराष्ट्रातील अनेक अत्याधुनिक डेअरी प्रकल्पांना भेटी दिल्या असून, त्यांच्या व्यवस्थापन आणि पद्धतींचा आपल्या गोठ्यावर वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
कृषी प्रदर्शनांना भेट देणे हा त्यांच्या आवडीचा विषय असून, महाराष्ट्रात कुठेही चांगले प्रदर्शन ते शक्यतो चुकवीत नाहीत. त्यातून आपल्याला नवे काही करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे ते सांगतात.
उत्पन्नाचे अर्थशास्त्र...
- सध्या त्यांच्याकडील 48 म्हशींपैकी 18 गाभण आहेत. अन्य म्हशींपासून 10 ते 12 लिटरप्रमाणे सुमारे 300 लिटर दूध मिळते.
- गाई दहा असल्या तरी जास्त दुधाची एकच होलस्टिन फ्रिजीयन गाय आहे, ती दिवसाला 25 लिटर दूध देते. इतर जर्सी आणि गावरानी गाईंचे मिळून रोज 75 लिटर दूध होते.
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री ते स्वतःच्या रेड्डीज गोकुळ डेअरीतून करतात. गाईचे दूध 45 रुपये लिटर, तर म्हशीचे 55 रुपये लिटरने विक्री केली जाते. या दराबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. शिल्लक दुधापासून विविध प्रकारची मिठाई बनवली जाते. त्याचप्रमाणे ऑर्डरप्रमाणे बासुंदी, दही, पनीर तयार करून विकत असल्याने अधिक नफा मिळतो.
- खाद्यासाठी तूर, मका, गव्हांडा, चना कुटार यांचा ते वापर करतात. हिरवे गवत जनावरांना दोन्ही वेळेस दिले जाते. यासाठी त्यांना 58 जनावरांसाठी 5800 रुपये खर्च येतो.
- जनावरांच्या कामासाठी दहा मजूर त्यांच्याकडे आहेत, त्यांच्या रोजच्या मजुरीसाठी दोन हजार रुपये खर्च होतो.
- दूध विक्रीतून त्यांना साधारणपणे म्हशीच्या दुधाचे 16,500, तर गाईच्या दुधाचे 3375 रुपये रोज मिळतात. एकूण 19,875 रुपये मिळतात. यातून मजुरी, चारा, औषध व वाहतुकीचा खर्च साधारणपणे 9 हजार होतो. हा खर्च वजा केल्यास दहा हजार रुपये निव्वळ नफा उरतो.
- जनावरांचे गोळा होणारे शेण आणि मूत्र यांचा वापर स्वतःच्या शेतासाठी खत म्हणून करतात, त्याची विक्री केली जात नाही.
संपर्क -
मनवर ऊर्फ मुन्ना रेड्डी, संचालक, रेड्डीज गोकुळ डेअरी
9326666382
माहिती संदर्भ : अॅग्रोवन