अहमदनगर जिल्ह्याचा पश्चिम पठारी भाग म्हंटल कि, समोर दुष्काळाचं चित्र उभं राहतं.त्यातच यंदाही कमी व वेळेवर न पडलेला पाऊस यामुळे चित्र जरा भयानकच आहे. मात्र यापरिस्थितीतही इथला शेतकरी जगतोय,या भीषण परिस्थितीवर मात करत संघर्ष करतोय.अशा प्रतिकूल परिस्थितीत यावर मात करणार अन सर्वांसाठी आदर्श ठरावं असं व्यक्तिमत्व म्हणजे गंगाराम जाधव होय.
मूळचे चास (अहमदनगर) येथील रहिवासी असलेले गंगाराम यांचं वय ८० वर्ष. पूर्वीपासूनच ते शेती करतात.जेमतेम एक एकर शेतीचे ते मालक. कोरडवाहू शेतीत पावसावर तुटपुंज पीक हातात आलं, मात्र यावर न थांबता ते कष्ट करत आहेत.खरिप पिकात योग्य उत्पन्न निघाले नाही.रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले.पण न खचता त्यांनी जगण्याचा मार्ग निवडला.कुटुंबाची रोजीरोटी चालावी याकरिता न डगमगता त्यांनी या वयात शेळीपालनाचा मार्ग निवडला.सुरुवातीस दोन शेळ्या त्यांनी पाळल्या.खिशात भांडवल कमी म्हणून चार विकत घेणेही अवघडच आहे.त्यात शेतीला पाणी नाही,त्यामुळे घरच्या शेतातील हक्काचा चाराही नाही.यामुळे शेळ्या चारायला ते माळरानावर जातात.मग उन्हातान्हाची पर्वा न करता त्यांचा हा दिनक्रम सकाळी लवकर सुरु होतो.म्हणूनच "कष्टाला पर्याय नाही" हि म्हण त्यांच्या जिद्दीला सरस ठरते.
आज एवढं वय जरी असले, तरी त्यांचा हा संघर्ष आजच्या युवकांनाही लाजवणारा आहे.आपल्या स्वतःची गुजराण स्वकष्टाने करण्यात धन्यता मानतात .परिस्थिती काहीही असो पण त्यासाठी त्यांची कष्टाची तयारी सदैव असते. वार्धक्यामुळे शहरात रोजगार मिळत मिळत नाही, म्हणून हे कारण पुढे करून ते थांबले नाहीत.अशा जिद्दी माणसाची भेट नगरकडून पुढे जात असताना झाली,एवढ्या उन्हातून आलेल्या गंगाराम जाधव यांना विचारलं,कि एवढ्या उन्हात आपण शेळ्या का चारताय ?त्यांनी उत्तर दिलं मग आता काय करणार? मागच्या महिन्यात मोठा अपघात झाला, इलाजासाठी तीन शेळ्या विकल्या,अन अपघात खर्च भागविला.त्याच पैशावर मी आज उभा राहू शकलो,आज पैसे नाहीतर तर दुसरा पर्यायही नाही.म्हणून हाच गाडा पुढे चालविताना मला उदरनिर्वाहाचा दुसरा पर्याय नाही म्हणून मी शेळीपालन करतोय.याच बिकट परिस्थितीमुळे मला रानोमाळी अनवाणी फिरावं लागत. हे शब्द ऐकून मन सुन्न झालं.
माणूस वयाने थकतो, पण मनाने कधीच नाही,याच हे जिवंत उदाहरण आहे. कारण ते सांगतात की,अवर्षण निसर्गाने दिले आहे हे खरे, पण संवेदनेचा अभाव हा आपणच निर्माण केलेला आहे. म्हणून थांबू नका कष्टाची तयारी ठेवा.अशा जगण्याचा आनंद निराळाच आहे.
लेखक - मुकुंद पिंगळे
अंतिम सुधारित : 7/5/2020
एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा ...
सन 1971 पासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मेहकर ताल...
पावसाचे पाणी हे प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रातून वा...
“पाणी साठवा-गाव वाचवा” अभियानाची माहिती येथे देण्य...