पौरोहित्य करताना यज्ञ, होम करावेच लागतात, त्यासाठी शेण, गोवर्या गोमूत्र लागायचे .म्हुणून निसळ गुरुजींनी एक गीर गोवंशाची कालवड घेण्याचे ठरविले . २००३ मध्ये खाटकाच्या दारातून ७००० रुपयात ही कालवड घरी आणली .या गाईच्या सहा वेतानंतर आज १५ गाईचा विस्तार झालाय.त्यात पृथ्वीवरील कामधेनु मानलेली थारपारकर जातीची देशी गाय नव्याने आलीय . आज बाजारात एका गीर गाईची किंवा थारपारकर गाईची किंमत ५० ते ७० हजार आहे. गीर गायचं का घेतली? याची माहिती देताना ते म्हणाले,गुजरात राज्यातील काठेवाडच्या दक्षिणेकडील गीर टेकड्या व जंगल हा या जनावरांचा मूळ प्रदेश होय. गायीचा दुध देण्याचा कालावधी ३०० दिवस असून सरासरी उत्पन्न २१०० लिटर व सरासरी आयुष्य १५ वर्ष असते.ह्या गाईचे गोमुत्र अत्यंत औषधी असते .या गाईच्या गोमुत्रा पासून गोमुत्र अर्क बनविण्यासाठी मी या गोवंशाची निवड केली आहे.
गुणवत्तेनुसार अग्रभागी असलेला ‘थारपारकर’ गोवंश आहे. ही गोवंश सातत्याने येणा-या दुष्काळसदृश परिस्थितीशी सामना करून तग धरतो या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजाचे वय ३२ ते ३६ महिन्यांच्या दरम्यान असते. प्रथम वेतापासून चौथ्या वेतापर्यंत दुग्धोत्पादनामध्ये सातत्याने लक्षणीय वाढ होते. दोन वेतांमधील अंतर १५ ते २० महिन्यांदरम्यान असते, भाकड काळ चार ते सात महिन्यांचा असतो . दुधाला सरासरी चार ते पाच फॅट लागते.
उत्तम गुणवत्तेमुळेच संपूर्ण भारतभर शेती महाविद्यालयं,सरकारी फार्म,मिलिटरी डेअरी फार्म यांमध्ये मूळचा गोवंश म्हणून थारपारकरची निवड करण्यात येते. निसळ गुरुजीं व त्यांच्या कुटुंबाने अत्याधुनिक गोशाळा तयार केली आहे.
अहंमदनागर येथील बॅँक कालनी भागात .आपल्या घरातच गुरुजींनी आधुनिक गोशाळा सुरु केली होती. यात गाईच्या शेणाचा वापर गोबर गॅस साठी केला. ज्यावर त्यांचा घरचा स्वयंपाक होतो. गोबर गॅसची स्लरी पाईपद्वारे जमा करून शेतात खत म्हणून वापरतात किंवा गोवर्या बनवतात. या गोशाळेत गाईंना स्वयंचलीत वाटर सिस्टिमी द्वारे हवे तेंव्हा पाणी पिता येते.गायांचे गोमूत्र एका ड्रमात जमा होते.दूध मशिनद्वारे काढले जाते.कडबा बारीक करायची कुट्टी मशीन,चारा साठवणीसाठी व्यवस्था केलीय.गाय वासरे मुक्त संचार करतात.त्यांना कुटुंबातील प्रत्येक सदस्य प्रेम देतो.अगदी बैठकीतही गाईचा वावर असतो. गोशाळेत सी सी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत, ज्याद्वारे 24 तास गाईंवर नजर ठेवली जाते.
त्यांचा या गीर जातीची प्रत्येक गाय दररोज 14 लिटर दुध देते. निसळ गुरुजींनी दुधाचा व्यवसाय केला असता तर आणखी कमाई झाली असती. पण ते गाईच्या दुधावर पहिला हक्क वासरांचा मानतात.त्यामुळे गाई व वासरे दिवसभर मोकळे असतात .रात्री त्यांना बांधून फक्त सकाळचे दूध काढले जाते.बाकी दिवसभर वासरे दूध पित असतात. एक वेळचे दूधच ते काढतात.आणि 50 रुपये लिटरने विकतात.आणि ज्या घरात लहान मुले आहेत अशा कुटुंबालाच विकतात.
आयुर्वेदात गाईच्या शुद्ध तुपाचे गुणधर्म सांगितले आहेत.ते तयार करण्याची खास पद्धधत आहे.जी अतिशय कष्टची आहे. पितळी,लोखंडा ची भांडी वापरून लाकडी रवीने घुसळून हे तूप त्यांच्या पत्नी सोनालीताई बनवतात.जे 2500 रु किलो या भावात विकले जाते. त्यासाठी ऍडव्हान्स बुकींग होते.
दोन वर्षे दुष्काळ पडला चारा महागला तरी गुरुजींनी गाई विकल्या नाहीत.आज या गोशाळेत त्यांचे वडील दत्तात्रेय निसळ,पत्नी सोनाली,गायत्री,रेणुका या मुली व मुलगा वेद हे सारे ‘कुटुंबच गोपालनात रंगलय’.आता या गाईंना चारा लागतो म्हणून गुरुजींनी अडीच एकर शेत जमीनही खरेदी केलीय. शेजारीपाजारीशेण गोमूत्राचा वास येतोय म्हणूनआता ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात ही गोशाळा हलवतोय.तिथेच चारा लावून तिथल्या तिथे जनावरांना घालता येईल..आज आपल्याकडे अडीच एकर शेतं,घर व सुबत्ता आहे ती या गोशाळेमुळेच,असं सिद्धेश्वर निसळ सांगत होते.
लेखन : सु. मा. कुलकर्णी, नांदेड
अंतिम सुधारित : 5/22/2020
विविध जातींच्या देशी गाईंचे जतन करण्याच्या उद्देशा...